[२]
धार्मिक व अधार्मिक चर्या

कोणे एके समयी बुद्धगुरू कोसल देशांत धर्मोपदेश करीत फिरत असता शाला नांवाच्या ब्राह्मणांच्या गांवीं आला. बुद्ध तेथें पोहोंचण्यापूर्वीच त्याची कीर्ति सर्व गावभर पसरली होती. शालेंतील ब्राह्मणांनां बुद्ध आपल्या गांवीं आला, हे वर्तमान समजल्याबरोबर ते सर्व बुद्धदर्शनाला गेले. त्यांपैकीं कांहीजण बुद्धाला नमस्कार करून एका बाजूला बसले व कांहीजण बुद्धाला कुशलप्रश्न विचारून आणि आपलें नामगोत्र सांगून एका बाजूला बसले.

ते ब्राह्मण आपापल्या आसनावर बसल्यावर बुद्धाला म्हणाले “भो गौतम, कांहीं प्राणी मरणोत्तर नरकाला जातात व कांही स्वर्गाला जातात, याचें कारण काय?”

बुद्ध म्हणाला “ब्राह्मणहो, अधार्मिक चर्येमुळे मनुष्य मरणोत्तर नरकाला जातो आणि धार्मिक आचरणामुळें स्वर्गाला जातो.”

ब्राह्मण म्हणाले “भो गौतम, आपल्या या संक्षिप्त भाषणाचा आम्हांला बरोबर अर्थ समजला नाही. तेव्हां विस्तारानें याचा अर्थ सांगाल, तर फार उपकार होतील.”

बुद्ध म्हणाला “गृहस्थहो, कायेनें घडणारें अधर्माचरण तीन प्रकारचें आहे, वाचेने घडणारें चार प्रकारचें आहे, व मनाने घडणारें तीन प्रकारचें आहे. प्राण्याचा घात करणें, परधनाचा अपहार करणें, आणि परदाराभिलाष करणें, हीं तीन कायेनें घडणारीं पापकर्मे होत. असत्य बोलणें, च-हाडी करणें, शिवीगाळ करणें आणि वृथा बडबड करणें, ही चार वाचेनें घडणारीं पापकर्मे होत. परद्रव्याचा लोभ धरणें, दुसर्‍याच्या नाशाची इच्छा असणें, आणि नास्तिकदृष्टि असणें, ही तीन मानसिक पापें होत. गृहस्थहो, या दहा प्रकारच्या अधार्मिक आचरणामुळें मनुष्यप्राणी मरणोत्तर दुर्गंतीला जातो.”

“पण गृहस्थहो, एकादा मनुष्य प्राणघातापासून निवृत्त होतो; सर्व भूतमात्राविषयीं त्याच्या अंत:करणात दया वास करते;’ तो दुसर्‍याच्या वस्तूंचा अपहार करीत नाही; व परदाराभिलाष करीत नाहीं. याप्रमाणें त्याचे कायकर्म धार्मिक होत असतें. तो कधींहि खोटें बोलत नाही; न्यायासनासमोर साक्षी देण्यास बोलाविलें असतां पाहिलेली गोष्ट पाहिली आहे असें सांगतो, व न पाहिलेली गोष्ट पाहिली नाहीं असें सांगतो, तो चहाडी करीत नाही, एवढेंच नव्हे तर होतां होईल तों इतर लोकांची भांडणे मिटविण्याची खटपट करितो; व ज्यांची भांडणें मिटली असतील त्यांची ती पुन: होऊं नयेत असा प्रयत्न करितो; त्याला लोकांच्या एकीनें आनंद होतो, आणि त्याच्या वचनामध्यें इतकें माधुर्य असतें, कीं, त्यामुळे भिन्न झालेली मनें मिलाफ पावतात. तों कधीं शिवीगाळ करीत नाही; कोणाला कर्कश शब्द बोलत नाही; त्याचे हृदयंगम भाषण लोकांनां फार आवडतें. तो वायफळ भाषण करीत नाही; योग्यवेळी मितभाषण करितो. याप्रमाणे तो वाचेनं पुण्याचरण करितो. तो मनानें दुसर्‍याच्या धनाचा लोभ करीत नाही. परघात त्याच्या मनाला शिवत नाहीं. एवढेंच नव्हें, रात्रं-दिवस सर्व प्राणी सुखी असावे, अशी वासना त्याच्या मनामध्यें जागृत असते. नास्तिक दृष्टि त्याच्या मनाला शिवत देखील नाही;  सत्कर्मावर आणि सद्धर्मावर त्याचा पूर्ण विश्वास असतो. याप्रमाणें तो मनाने पुण्याचरण करितो. गृहस्थहो, असा पुण्यशील प्राणी देहावसानानंतर सुगतीला जातो.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel