[६]
चित्ताचेंच रक्षण केलं पाहिजे

बुद्धगुरू श्रावस्तीमध्यें रहात असतां अनाथपिंडिकाला म्हणाला “हे गृहपति, मनुष्यानें चित्ताचें जर रक्षण केलें नाही, तर त्यांचे कायकर्म, वाक्कर्म, आणि मानसिक कर्मं अरक्षित होत असतें; आणि त्यामुळें त्याचीं हीं तिन्हीं कर्मे विकारवश होतात. एवढेंच नव्हे, तर हळुहळू त्याची काया, वाचा, आणि मन हीं तिन्हीं बिघडत जातात, आणि त्याला मरणदेखील सुखानें येत नाहीं. एखाद्या घराचें छप्पर जर वाईट असलें, तर त्या घराच्या भिंती वगैरे सर्व काहीं अरक्षित होंते, व हळुहळू सर्व घर विकृत होऊन नष्ट होतें. याप्रमाणे हे गृहपति, जर एक चित्त संभाळलें नाहीं, तर त्यामुळें माणसाची सर्व कर्में विकृत होऊन त्याचा अत्यंत अनिष्ट परिणाम होतो. तेंच जर चित्त संभाळलें गेलें, तर सर्व कर्मे सुरक्षित होत असतात, व त्यामुळे मनुष्याला सुखानें मरण येतें. घराचें छप्पर जर सुरक्षित असलें, तर भिंती वगैरे सर्व काहीं सुरक्षित रहातें. त्याप्रमाणे मनुष्याचें चित्त सुरक्षित असलें, तरच त्याचीं सर्व कर्में सुरक्षित रहातात.

यथागारं दुच्छन्नं वुट्ठि समतिविज्झति
“एवं अभावितं चित्तं रागो समतिविज्झति।”
यथागारं सुच्छन्नं वुट्ठि न समतिविज्झति
“एवं सुभावितं चित्तं रागो न समतिविज्झति।”
-धम्मपद.


[७]
सात धनें

भगवान् बुद्ध श्रावस्तीमध्यें रहात असतां उग्र नांवाचा राजाचा मंत्री त्याजवळ आला, आणि नमस्कार करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला “भगवन्, हा आमचा मिगार सावकार कितीतरी श्रीमंत आहे म्हणून सांगूं! त्याच्याजवळ केवळ सोन्याचेंच नाणें लाखांनी निघेल, मग रुप्याची गोष्ट काय सांगावी!”

बुद्ध म्हणाला “हे उग्र, अशा प्रकारच्या धनाला महत्त्व नाहीं असें मी म्हणत नाही; तथापि त्याला अग्नि, उदक, राजेलोक, चोर, लुटारू, आणि आपले दायाद यांच्यापासून भीति असतेच. म्हणून त्याला श्रेष्ठ धन म्हणतां येत नाहीं. पण हे उग्र, श्रद्धा, शील, लज्जा, अवत्रप्य, श्रुत, त्याग, आणि प्रज्ञा, हीं सात धनें सोन्यारुप्यासारखीं चंचल नाहींत. त्यांचा अग्नीनें किंवा उदकानें नाश होण्यासारखा नाहीं; दुष्ट राजे, दरोडेखोर किंवा आपले अहितचिंतक दायाद या धनांचा अपहार करूं शकणार नाहींत.”

आतां या सातांचा अर्थ सांगतों. श्रद्धा म्हणजे आर्यश्रावकाचा तथागतावर पूर्ण विश्वास असणें. शील पांच प्रकारचें आहे. आर्यश्रावक प्राणघातापासून निवृत्त होतो, अदत्तादानापासून निवृत्त होतो, व्याभिचार-कर्मापासून निवृत्त होतो. असत्यभाषणापासून निवृत्त होतो, आणि मादक पदार्थांपासून निवृत्त होतो. या पांच नियमांचे यथार्थतया पालन करणें हेंच शीलधनाचें रक्षण होय. लज्जा म्हणणे पापकर्म करण्याविषयीं लाजणें. ‘आपण चांगल्या कुलांत जन्मलों असून, सद्धर्माचे आपणाला ज्ञान झालें असून पापकर्माला प्रवृत्त होणें हें आपणाला शोभेल तरी कसें! अशा विचारानें पापकर्माचा कंटाळा करणें यालाच लज्जा म्हणतात. अवत्रप्य म्हणजे लोकापवादाचें भय. आपण पापाचरण केलें असतां लोक आपल्याला काय म्हणतील, याची मनांत भीति बाळगणें, यालाच अवत्रप्य असें म्हणतात. ज्यांपासून जगाचें कल्याण होईल अशा गोष्टींचे श्रवण करणें, व अशा गोष्टीं चांगल्या माहीत असणें, याला श्रुतधन असे म्हणतात. यथाशक्ति दानधर्म करणें, याला त्यागधन म्हणतात. चार आर्यसत्त्यांचे व इतर सद्धर्माचे अप्रतिहत ज्ञान असणें, याला प्रज्ञाधन असें म्हणतात. ज्या स्त्रीजवळ किंवा पुरुषाजवळ हीं सात धनें आहेत, तीच स्त्री अथवा तोच पुरुष खरा श्रीमंत असें मी समजतों. कांकी, इहपरलोकीं त्यांच्या या धनाचा कोणीच अपहार करूं शकत नाही.

सद्धाधनं सीलधनं हिरिओत्तापियं धनं
सुतधनं च चागो च पत्र्त्रा वे सत्तमं धनं।
यस्स एते धना अत्थि इत्थिया पुरिसस्सवा
अदळिद्दो ति तं आहु अमोघं तस्स जीवितं।
-अंगुत्तर- सत्तनिपात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel