[१०]
बुद्धीचीं पांच आवरणें

बुद्धगुरू श्रावस्ति येथें जेतवनउद्यानांत अनाथपिंडिकाच्या आश्रमांत रहात असतां, संगारव ब्राह्मण त्याजपाशी आला, आणि कुशल प्रश्नादिक विचारून एका बाजूला बसल्यावर त्याला म्हणाला “भो गौतम, एकाद्या वेळी पुष्कळ काळपर्यंत परिचित असलेले देखील वेदमंत्र मला आठवत नाहींत; मग तोंडपाठ येत नसलेल्या मंत्रांची गोष्ट काय सांगावी! पण असें होण्याचें कारण कोणतें, तें आपण सांगाल काय?”

बुद्ध म्हणाला “हे ब्राह्मण, ज्या वेळी कामविकारानें मनुष्याचें चित्त व्यग्र होऊन जातें, व कामविकाराच्या उपशमाचा मार्ग त्याला माहीत नसतो, त्या वेळीं त्याला आत्मार्थ काय हें समजत नाहीं, परार्थ काय हें समजत नाहीं, आणि पुष्कळ दिवस परिचत असलेले मंत्रदेखील त्याला आठवत नाहींत.  ज्या वेळी त्याचें चित्त क्रोधाने पराभूत झालें असतें, किंवा संशयग्रस्त झालें असतें, तेव्हां आपलें किंवा परक्याचे हित कशांत आहे हें तो यथार्थतया जाणत नाहीं, आणि चिरकाल परिचित असलेले मंत्रदेखील त्याला आठवत नाहीत.

“हे ब्राह्मणा, भांड्यांतील पाण्यामध्यें निळा किंवा काळा रंग टाकला असतां, त्यांत आपली पडछाया दिसत नाहीं, त्याचप्रमाणे ज्याचें चित्त कामविकारानें व्यग्र झालें असेल, त्याला आपल्या हिताहिताचें ज्ञान होत नाही. तेच पाण्याचें भांडे संतप्त झाले असंता त्यातून वाफा निघतील, व पाणी उकळूं लागेल. अशा वेळीं मनुष्याला आपलें प्रतिबिबं त्या पाण्यामध्यें दिसणे शक्य नाहीं. त्याचप्रमाणें मनुष्य क्रोधाभिभूत झाला असतां त्याला  आत्महित कशांत आहे हें समजणें शक्य नाहीं. त्या भांड्यांतील पाणी जर शेवाळाने भरलें असलें, तर देखील माणसांनां आपलं प्रतिबिंब त्यांत दिसणार नाहीं. त्याचप्रमाणें ज्याच्या मनाला आळसाने ग्रासलें, त्याला आपलें हित समजण्यासारखे नाहीं, मग परक्याचें हित समजणें तर बाजूलाच राहिलें! ते पाणी जरी वार्‍याने हालूं लागलें, तरी देखील त्यांत आपले प्रतिबिंब दिसणार नाहीं. त्याचप्रमाणें ज्याचें चित्त संशयग्रस्त झालें असेल, त्याला आपलें किंवा परक्यांचें हिताहित समजणार नाहीं. तेंच पाणी जर स्वच्छ व शांत असलें, तर त्यांत मनुष्याला आपलें प्रतिबिंब स्पष्टपणें पहातां येतें. त्याचप्रमाणें ज्यांचे चित्त कामच्छंद, व्यापाद (क्रोध) आळस, भ्रांतता आणि संशयग्रस्तता या पांच आवरणांपासून विमुक्त झालें असेल, त्यालाच आत्मपरहित यथार्थतया समजतें.”

“हे ब्राह्मण, या पांच आवरणांच्या परिहाराचा उपाय म्हटला म्हणजे सात बोध्यंगांची (ज्ञानाच्या अंगांची) भावना होय. (१) स्मृति (जागृति किंवा विवेक), (२) धर्मप्रविचय (मनोवृत्तींचे पृथक्करण करण्याचें सामर्थ्य किंवा प्रज्ञा, (३) वीर्य (सत्कर्में करण्याविषयी मानसिक उत्साह), (४) प्रीति (सत्कर्मांमुळें प्राप्त होणारा आनंद), (५) प्रश्रब्धि (चित्ताची शांतता, किंवा चित्तसुख), (६) समाधि, आणि (चित्ताची एकाग्रता) आणि (७) उपेक्षा (चित्ताची मध्यस्थावस्था) ही सात ज्ञानाचीं अंगे होत. या सात बोध्यंगांची भावना केली असतां मनुष्याचें चित्त सर्व आवरणांपासून मुक्त होतें.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel