[१६]
चांडाळ कसा होतो?


भगवान् बुद्धगुरू श्रावस्तीमध्यें अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात असतां एके दिवशीं श्रावस्तींत अनुक्रमें भिक्षाग्रहण करीतकरीत अग्निहोत्री भारद्वाज ब्राह्मणाच्या दाराशीं येऊन भिक्षेसाठीं उभा राहिला. भारद्वाजाचें अग्निहोत्र पेटलें होतें, व त्यांत तो आहुति टाकीत होता. बुद्धाला पाहिल्याबरोबर तो मोठ्यानें ओरडला "अरे श्रमणा! मुंडका! चांडाळा! तेथेंच उभा रहा."

बुद्ध म्हणाला "हे ब्राह्मणा, तूं चांडाळ किंवा चांडाळाचे धर्म कोणते, हें जाणतोस काय?"

ब्राह्मण म्हणाला "भो गौतम, मला याची कांहीं माहिती नाहीं. चांडाळ कोण आणि त्याचे धर्म कोणते हें आपण मला सांगाल तर बरें होईल."

बुद्ध म्हणाला "वारंवार रागावणारा, दुसर्‍याचा सूड उगवूं पहाणारा, पापानें माखलेला, आणि नास्तिकदृष्टि असा जो मनुष्य असतो, तो चांडाळ आहे असें जाणावें. जो प्राण्याचा घात करितो, ज्याच्या अंत:करणामध्यें दया वास करीत नाहीं, जो लुटालूट आणि चोरी करितो, त्याला चांडाळ म्हणावें. जो दुसर्‍याचें ऋण घेऊन तें परत मागितलें असतां पळून जातो, किंवा मीं तुला कांहींच देणें नाहीं असें खोटेंच सांगतो, तो चांडाळ आहे असें जाणावें. जो आपल्यासाठीं, परक्यासाठीं किंवा पैशासाठीं खोटी साक्ष देतो, तो चांडाळ होय. जो परदारागमन करितो, वृद्ध आईबांपाची शुश्रूषा करीत नाहीं, आई, बाप, भाऊ, बहीण इत्यादि आप्तलोकांनां शिवीगाळी देतो किंवा मारतो, तो चांडाळ होय. आपण केलेलें पापकर्म झांकून ठेवण्याची जो खटपट करितो, तो चांडाळ होय.

"जन्मानें चांडाळ होत नाहीं, किंवा ब्राह्मण होत नाहीं. कर्मानेंच चांडाळ होतो, आणि कर्मानेंच ब्राह्मण होतो. याला एक उदाहरण आहे. मातंग या नांवानें प्रसिद्ध असलेला ऋषि श्वपाक (कुत्र्याचें मांस खाणारा) चांडालपुत्र होता. परंतु त्याची कीर्ति इतकी झाली होती, कीं, मोठमोठे ब्राह्मण आणि क्षत्रिय त्याची सेवा करीत असत. असें सांगतात कीं, देहावसानानंतर विमानांत बसून तो ब्रह्मलोकीं गेला. ब्रह्मलोकीं जाण्याला त्याची जाति त्याच्या आड आली नाहीं. आतां चांगल्या कुळांत जन्मलेले पुष्कळ ब्राह्मण नानाविध पापें करीत असलेले आम्ही पहातों. इहलोकीं त्यांची निंदा होतेच, आणि परलोकीं ते दुर्गतीला जातात. त्यांची जाति दुर्गतीपासून किंवा निंदेपासून त्यांचें रक्षण करूं शकत नाहीं. म्हणून मी म्हणतों, कीं, जन्मानें चांडाल होत नाहीं किंवा जन्मानें ब्राह्मण होत नाहीं. कर्मानेंच चांडाल होतो आणि कर्मानेंच ब्राह्मण होतो."

हा बुद्धाचा उपदेश ऐकून भारद्वाज फारच संतुष्ट झाला आणि म्हणाला "भो गौतम, आपला हा उपदेश फारच गोड आहे. एकाद्या मनुष्यानें झांकलेली वस्तु उघड करून दाखवावी, किंवा डोळसांनां अंधारांत दिसावें म्हणून मशाल धरावी, त्याप्रमाणें आपण आपल्या धर्माचें उत्तम स्पष्टीकरण केलें आहे. मी आजपासून माझ्या कुडींत प्राण असेपर्यंत आपणाला, आपल्या धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जात आहें. मीं आपला उपासक आहें, या नात्यानें माझा आपण अंगीकार करा."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel