"विलक्षण दिसतें खरें." वासिष्ठ म्हणाला.

बुद्ध म्हणाला "एकादा मनुष्य म्हणेल, कीं, 'या प्रदेशामध्यें जी अत्यंत सुंदर स्त्री, तिला मी शोधीत आहें.' त्याला दुसरे लोक विचारतील 'कायरे बुवा, तूं ज्या स्त्रीला शोधीत आहेस, ती स्त्री ब्राह्मणकन्या आहे, कीं, क्षत्रियकन्या आहे? ती उंच आहे, कीं, ठेंगणी आहे? तिचे केंस सरळ आहेत, कीं, कुरळ आहेत?' असा प्रश्न विचारला असतां तो म्हणेल, कीं, 'मला यांपैकीं कांहीं माहीत नाहीं. मी तिला कधींहि पाहिलें नाहीं; तथापि मी तिला शोधीत आहें.' हे वासिष्ठ, त्या मनुष्याप्रमाणेंच ब्राह्मणांचें म्हणणें विलक्षण दिसत नाहीं काय?"

"होय, विलक्षण दिसतें खरें."

"हे वासिष्ठ, दुसरा एकादा मनुष्य चव्हाट्यावर पायर्‍या बांधण्याला आरंभ करील. त्याला इतर लोक विचारतील, कीं, 'कायरे बुवा, या ज्या तूं पायर्‍या बांधीत आहेस, त्या कोणत्या प्रासादाच्या माडीवर जाण्यासाठी आहेत? ' तो म्हणेल 'तो प्रासाद कोणता हें मला माहीत नाहीं; तथापि त्याच्या माडीवर चढण्यासाठीं या मी पायर्‍या बांधीत आहें.' या मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणें ब्रह्मदेवाला पाहिलें नसतां, त्याच्याशीं सायुज्यता पावण्याचा मार्ग दर्शविणार्‍या ब्राह्मणाचें बोलणें विलक्षण दिसत नाही काय?"

"होय भो गौतम, हें विलक्षण दिसतें खरें."

"हे वासिष्ठ, एकादा मनुष्य ही अचिरवती नदी पाण्यानें तुडुंब भरली असतां, तिच्या पार जाण्यासाठीं या तिरावर येऊन परतीराची प्रार्थना करील, कीं, 'हे तीर, तूं इकडे ये! तूं इकडे ये!' आतां या मनुष्याच्या प्रार्थनेनें किंवा याचनेनें अचिरवतीचें पलीकडील तीर अलीकडे येईल काय?"

"नाहीं भो गौतम."

"त्याचप्रमाणें हे वसिष्ठ, ब्राह्मणांच्या नानाविध प्रार्थनांनीं ब्रम्ह्याशीं ते सायुज्यता पावतील, हें संभवत नाहीं.

"हे वासिष्ठ, दुसरा एकादा मनुष्य या अचिरवतीच्या पार जाण्यासाठीं या कांठावर येऊन आपणाला दोर्‍यांनीं घट्ट बांधून घेईल, तो पलीकडच्या तीराला जाऊं शकेल असें तुला वाटतें काय?"

"नाहीं, भो गौतम."

"हे वासिष्ठ, पंचेंद्रियांच्या विषयामध्यें जी अत्यासक्ति, तिला मी इहलोकींचें बंधन असें म्हणतों. या बंधनानें त्रैविद्यब्राह्मण बद्ध झालेले दिसत आहेत. तेव्हां ते देहावसानानंतर ब्रह्मसायुज्यता पावतील, हें मुळींच संभवत नाहीं.

"हे वासिष्ठ, दुसरा एकादा मनुष्य अचिरवती उतरून पार जाण्यासाठीं या तीरावर येईल आणि डोक्यावरून पांघरूण घेऊन निजेल. हा मनुष्य पार जाऊं शकेल असें तुला वाटतें काय?"

"नाहीं भो गौतम."

"हे वासिष्ठ, कामविकार, क्रोध, आळस, भ्रांति, संशयग्रस्तता, या पांच निर्वरणांला मी बुद्धीचीं आवरणें म्हणतों. या आवरणांनीं आवृत्त झालेले त्रैविद्यब्राह्मण मरणोत्तर ब्रह्मसायुज्यता पावतील, हें मुळींच संभवत नाहीं.

"आतां मी तुला असें विचारतों, कीं, तुझ्या आचार्यप्राचार्यांकडून ब्रह्मासंबंधानें तुला काय माहिती मिळाली आहे? ब्रह्मदेव सपरिग्रह आहे, कीं, अपरिग्रह आहे?"

"भो गौतम, ब्रह्मा अपरिग्रह आहे."

"त्याच्या चित्तांत वैर आहे किंवा नाही?"

"नाहीं, भो गौतम."

"तो द्वेषबुद्धीपासून मुक्त आहे किंवा नाहीं?"

"मुक्त आहे."

"त्याचें चित्त पापमलानें माखलेलें आहे किंवा नाहीं?"

"भो गौतम, त्याचें चित्त पापमलविरहित आहे."

"तो स्वतंत्र आहे किंवा परतंत्र आहे?"

"तो स्वतंत्र आहे."

"हे वासिष्ठ, त्रेविद्यब्राह्मण सपरिग्रह आहेत किंवा अपरिग्रह आहेत?"

"सपरिग्रह, भो गौतम."

"त्यांच्या चित्तांत वैर आहे किंवा नाहीं?"

"आहे."

"ते द्वेषबुद्धि आहेत किंवा अद्वेषबुद्धि आहेत?"

"द्वेषबुद्धि, भो गौतम."

"त्यांचें चित्त पापमलविरहित आहे किंवा पापमलयुक्त आहे?"

"पापमलयुक्त आहे."

"ते स्वतंत्र आहेत किंवा परतंत्र आहेत?"

"भो गौतम, ते परतंत्र आहेत."

"हे वासिष्ठ, ब्रह्मदेवाचे आणि त्रैलोक्यब्राह्मणांचे गुण याप्रमाणें परस्परविरुद्ध आहेत. तेव्हां ब्रह्मदेवाचें आणि त्यांचें जुळेल कसें? ते मरणोत्तर ब्रह्मसायुज्यता पावतील हें तर मुळींच संभवत नाहीं. म्हणून हे वासिष्ठ, त्रैविद्यब्राह्मण ब्रह्मसायुज्यतेसाठीं जे मार्ग सांगतात, ते मार्ग नसून कुमार्ग आहेत. या त्यांच्या मताला त्रैविद्यारण्य किंवा त्रैविद्यकांतार असें म्हणतां येईल."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel