(२२)
भिक्षूने कधींहि रागावतां कामा नये

मोलिय फल्गुन नांवाच्या एका भिक्षूची आणि कांही भिक्षुणींची मैत्री होती. त्या भिक्षुणींसंबंधानें जर कोणी शब्द बोलला, तर फल्गुनाला फार राग येत असें; व तो तेव्हांच हातघाईवर येत असे. हें वतर्मान बुद्धाला समजतांच फल्गुनाला बोलावून आणून बुद्ध ह्मणाला, ``हे फल्गुन, तूं कांही भिक्षुणींसंबंधानें कोणी वाईट शब्द बोलला असतां त्यावर रागावतोस आणि भांडणाला तयार होतोस, ही गोष्ट खरी आहे काय?''

"होय भदंत,'' फल्गुनानें उत्तर दिलें.

बुद्ध ह्मणाला, "हे फल्गुन, तूं कुलीन मनुष्य असून श्रद्धापूर्वक भिक्षु झाला आहेस. असें असतां अद्यापि तुझे प्रापंचिक संस्कार गेले नाहींत, हें आश्चर्य नव्हे काय? हे फल्गुन, त्या भिक्षुणींलाच नव्हे, तर तुला देखील कोणीं शिवीगाळी दिली असतां, त्यांच्याच नव्हे, तुझ्या स्वत:च्या देखील थोबाडीत मारली असतां, किंवा दगडाने आणि शस्त्रानें त्यांच्यावरच नव्हे, तुझ्यावर देखील प्रहार केला असतांना तुझें चित्त विकारवश होणार नाही, तुझ्या तोंडांतून वाईट शब्द निघणार नाहीं, तुझ्या मनामध्यें त्या वेळीं तुझ्या शत्रूवर अनुकंपा आणि मैत्री राहील, त्याचा त्वेष येणार नाहीं, याजबद्दल तूं खबरदारी घेतली पाहिजे.''

तदनंतर बुद्धगुरु भिक्षूंनां उद्देशून म्हणाला "भिक्षुहो, असा एक समय होता, कीं, त्या समयीं भिक्षु माझ्या सांगण्याप्रमाणे चालण्याला कसूर करीत नसत. मी त्यांना म्हणत असें, कीं, मी दिवसांतून एकच वेळ जेवतो, व त्यामुळे मला फार करून रोगाची बाधा होत नाहीं, माझ्या अंगी हुषारी असते, बल असतें, व मी सुखाने रहातों. त्याप्रमाणें तुम्हीहि दिवसांतून एकदांच जेवीत चला, व त्यामुळें निरोगी, हुषार, आणि बलवान् होऊन सुखाने रहा. त्या भिक्षूंनां मला पुष्कळ उपदेश करावा लागत नसे; केवळ त्यांच्या कतर्व्याची आठवण द्यावी लागत असे- जसे शिकविलेले उत्तम घोडे सरळ मागार्वर रथ ओढीत असतां चाबकावांचून चालतात, त्याप्रमाणें त्या भिक्षूंनां अनुशासन करावें लागत नसे.

``भिक्षुहो, तुम्हीदेखील त्या भिक्षूंप्रमाणे अकुशल धर्म सोडून कुशल धर्माचा अभ्यास करा. गांवाच्या किंवा नगराच्या बाहेर एकादें शालवृक्षाचें जंगल मातलेलें असेल, त्याची सुधारणा करावयासाठी एकादा मनुष्य त्यांत वाढलेलीं कांटेरी झाडें तोडून टाकील व सरळ शालवृक्ष कायम ठेवून वांकडेतिकडे शालवृक्ष कापून टाकून ते जंगल साफ करील. कांही कालानें त्या शालवनाची फारच अभिवृद्धि होईल. त्याचप्रमाणें भिक्षुहो, तुमच्या अंत:करणांतील अकुशल मनोवृत्तीचें निर्मूलन करा, व कुशल मनोवृत्तींची अभिवृद्धि करा. येणेकरून या माझ्या धर्मांत तुमची अभ्युन्नति होईल.

"भिक्षुहो, प्राचीनकालीं या श्रावस्तीमध्यें वैदेहिका नांवाची एक कुलीन स्त्री होती. तीं अत्यंत शांत आणि नम्र असल्याबद्दल तिची ख्याति होती. तिची काली नांवाची एक दासी होती. तिला असा प्रश्न पडला, कीं, `आपली धनीण खरोखरच शांत आहे, किंवा मी सर्व कामें वेळच्यावेळीं करीत असल्यामुळें तिला मजवर रागावण्याचा कधींच प्रसंग येत नाही?'

"एके दिवशीं आपल्या धनिणीची परीक्षा पहाण्यासाठी काली दासी जरा उशिरा उठली. तेव्हां वैदेहिका रागाने कपाळाला आंठ्या घालून कालीला ह्मणाली `कायग काली! उशिरा उठलीस हें काय?`

"'कांही नाही बाईसाहेब, सहज उशीर झाला,' कालीने उत्तर दिलें.

"'कांही नाही! उगाच उशिरा उठलीस? मोठी द्वाड दासी आहेस!` वैदेहिका कालीच्या अंगावर ओरडली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel