"'हं हं! आमच्या धनिणीला घुस्सा फार येतो. पण शेजार्‍या-पाजार्‍यांनां मात्र ती आपले खरें स्वरूप दाखवीत नाहीं!' काली आपल्या मनाशींच उद्गारली.

"आणखी कांही दिवसांनी आपल्या धनिणीची पुरी परीक्षा करण्यासाठीं काली दासी बर्‍याच उशिरां उठली. तेव्हां वैदेहिकेनें संतापून जाऊन दरवाज्याची खीळ तिच्या कपाळांत घातली. कालीच्या डोक्यांतून रक्तप्रवाह चालला असतां रस्त्यात जाऊन तिनें आरडाओरड केली. तेव्हां शेजारीपाजारी तिच्याभोंवतीं गोळा झाले, व तिचें कपाळ  कसें फुटलें याची त्यांनी चौकशी केली.

"काली ह्मणाली, `आमच्या शांत आणि नम्र मालकिणीचें हे कर्म आहे. घरामध्यें मी एकटीच दासी असतां जरा उठण्यास उशीर झाला, म्हणून दाराच्या खिळीनें तिनें माझें डोकें फोडलें!'

"त्या दिवसापासून वैदेहिका मोठी तापट आणि दुष्ट आहे, अशी तिची अपकीर्ति झाली.

"याप्रमाणे भिक्षुहो, एकादा भिक्षु जोपर्यंत त्याच्याविरुद्ध वाईट शब्द त्याच्या कानीं पडत नाहींत, तोपर्यंत शांत आणि नम्र असतो. पण जेव्हां वाईट शब्द ऐकण्याचा त्याला प्रसंग येतो, तेव्हां तो शांत आणि नम्र आहे किंवा नाहीं याची परीक्षा करितां येते. जो अन्नवस्त्रासाठीं शांत किंवा नम्र होतो, त्याला मी शांत किंवा नम्र म्हणत नाही. परंतु जो धर्माच्या गौरवानें धर्माला पूज्य मानून शांत होतो, नम्र होतो, तोच खरा शांत होय, आणि तोच खरा नम्र होय.

"भिक्षुहो, कोणी योग्य वेळी बोलतो, किंवा अयोग्य वेळीं बोलतो; कोणी घडलेली गोष्ट बोलतो, तर कोणी न घडलेली गोष्ट बोलतो; कोणी गोड बोलतो, किंवा कोणी वर्मी बोलतो; कोणी आपल्या हितासाठी बोलतो, तर कोणी अहितासाठी बोलतो; कोणी मित्रभावाने बोलतो, तर दुसरा कोणी द्वेषबुद्धीने बोलतो. या सर्व प्रसंगी, भिक्षुहो, तुमचें चित्त विकारवश होणार नाहीं, तुमच्या तोंडांतून वाईट शब्द निघणार नाहीं, तुमच्या  अंत:करणांत दया आणि मैत्री राहील, द्वेष राहणार नाही व जो मनुष्य आपल्याविरुद्ध बोलला असेल, त्याला आधार करून सर्व जगावर तुम्हांला मैत्रीची भावना करितां येईल, असा तुम्हीं अभ्यास केला पाहिजे.

"भिक्षुहो, एकादा मनुष्य टोपली आणि कुदळ घेऊन म्हणेल, कीं, ही सर्व पृथ्वी मी खणून टाकीन! दुसरा एकादा लाक्षारस, हरिद्रारस, किंवा मंजिष्ठारस घेऊन म्हणेल, कीं, हें आकाश मी रंगवून टाकीन! तिसरा एकादा गवताची चूड पेटवून म्हणेल, कीं, मी या गंगानदीला संतप्त करून सोडीन! या सर्व मनुष्यांच्या प्रयत्नांचा पृथ्वीवर, आकाशावर आणि गंगानदीवर जसा कांहींच परिणाम होणार नाही, तद्वत् इतर लोकांच्या बोलण्याचा तुमच्या अंत:करणावर कांहींच वाईट परिणाम होतां कामा नये.

"भिक्षुहो, जर दरोडेखोरांनी मोठ्या करवतीने एकाद्या भिक्षूचे अवयव कापावयला प्रारंभ केंला, आणि जर तो त्या प्रसंगी रागावला, तर त्याला माझा खरा अनुयायी म्हणता येणार नाही! अशा प्रसंगीं देखील, भिक्षुहो, तुम्हाला राग येणार नाहीं, तुमच्या तोंडांतून वाईट शब्द निघणार नाहीं, तुमच्या अंत:करणांत दया आणि मैत्री राहील, व तुमच्या शत्रूला आधारभूत करून तुम्ही सर्व जगावर निस्सीम मैत्रीची भावना करूं शकाल, याजबद्दल खबरदारी घ्या.

"भिक्षुहो, या माझ्या उपदेशाला तुम्ही क्रकचोपम उपदेश असें म्हणा, व त्याचें पुन:पुन: मनन करा. असा कोणताहि मोठा किंवा लहान वाईट शब्द आहे काय, कीं, जो तुम्हाला सहन करतां येणार नाही?''

या बुद्धगुरूच्या उपदेशाचें भिक्षूंनीं मुदित मनानें अभिनंदन केलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel