बुद्ध म्हणाला, "अंगुलिमाल! प्राणिमात्राविषयीं पूर्ण दया असल्यामुळें मी स्थिर झालों आहें, या अर्थानें मी स्थित आहें, आणि प्राण्याविषयीं तुझ्या अंत:करणामध्यें दया वास करीत नसल्यामुळें तूं अस्थिर आहेस, आणि म्हणूनच तुला मी अस्थित म्हणतो.''

या बुद्धवाक्यानें अंगुलिमालाला तात्काल संवेग उत्पन्न झाला. तो म्हणाला "बुद्धाची कीर्ति मी पुष्कळ दिवस ऐकत होतों; परंतु आज त्या सत्यवादी महर्षीच्या दर्शनाची अमोलिक संधी आली आहे. हे मुनिश्रेष्ठ! तुझें हें यथार्थ वाक्य श्रवण करून आजपासून पापाचरणाचा मी त्याग करितों.''

असें बोलून अंगुलिमालानें एका कड्याच्याखालीं आपली ढालतलवार फेंकून दिली, बुद्धाचे पाय धरिले व बुद्धाला आपला भिक्षुसंघांत घेण्यास त्यानें विनंति केली. तेव्हां तो अत्यंत कारुणिक, सर्व जगाचा गुरु महर्षि बुद्ध अंगुलिमालाला `भिक्षु इकडे ये' असें म्हणाला. हात अंगुलिमालाचा प्रव्रज्याविधि झाला.

तदनंतर अंगुलिमाल बुद्धाबरोबर बुद्धाचें पात्रचीवर घेऊन अनाथपिंडिकाच्या आश्रमांत आला.

अंगुलिमालाच्या उपद्रवानें त्रासलेले पुष्कळ लोक पसेनदिकोसल राजाच्या वाड्यासमोर जाऊन त्यांनी अंगुलिमालाला शिक्षा करण्याविषयीं अर्ज केला. तेव्हां राजा मोठें सैन्य बरोबर घेऊन अंगुलिमालाला पकडण्यासाठीं स्वत: निघाला. वाटेंत जेतवनमध्यें बुद्ध रहात आहे, असें वर्तमान समजल्यावरून तो बुद्धदर्शनाला गेला. आपलें सैन्य आरामाबाहेर ठेवून राजा एकटाच आंत गेला, व बुद्धाला नमस्कार करून एका बाजूला बसला.

त्याला बुद्ध म्हणाला "महाराज, तुझी मोठीच तयारी दिसत आहे. मगधदेशाच्या बिंबिसारराजाशीं किंवा वैशालींतील लिच्छवींशी (वज्जींशीं) तुझें वितुष्ट आलें आहे काय? किंवा दुसरा कोणी राजा तुझ्यावर चाल करून येत आहे कीं काय?''
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ पाटलीपुत्राच्या उत्तरेला वज्जी किंवा लिच्छवी यांचे एक बलाढ्य राज्य होतें; तें शाक्यांच्या राज्याच्या धर्तीवरच चालले होतें. बुद्धानें वज्जींना अभिवृद्धीचे सात नियम घालून दिल्याचा उल्लेख महापरिनिर्वाण सूत्राच्या आरंभीच सांपडतो. आमच्या वाचकांनां तो या पुस्तकाच्या शेवटीं आढळेल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पसेनदिकोसल म्हणाला "भगवन्, मला बाहेरचा कोणताहि शत्रु उपस्थित झाला नाहीं. परंतु अंगुलिमाल नावाच्या दरोडेखोरानें माझ्या राज्यांत फारच बंडाळी माजविली आहे. त्यानें मोठमोठालीं गांवें ओसाड पाडलीं आहेत. तो इतका क्रूर आहे, कीं, तो लोकांच्या अंगुलि कापून त्यांची माळ गळ्यांत घालीत असतो.''

बुद्ध म्हणाला, "महाराज, जर अंगुलिमाल मुंडन करून आणि काषायवस्त्र परिधान करून भिक्षु बनला, त्यानें प्राणघात करण्याचें सोडून दिलें, अदत्तादानापासून तो विरत झाला, खोटें बोलण्याचें त्यानें सोडून दिलें; तो ब्रह्मचर्याचें पालन करूं लागला, सर्व प्रकारें तो शीलवान् झाला, तर तूं त्याला काय करशील?''

राजा म्हणाला, "भगवन्, अंगुलिमाल अशा प्रकारें शीलसंपन्न भिक्षु झाला, तर मी त्याला नमस्कार करीन, त्याला बसण्याला आसन देईन, वस्त्रान्नाचे त्याला दान करीन, आणि त्याचें राजधर्माला अनुसरून रक्षण करीन. पण भगवन्, अशा प्रकारच्या अत्यंत पापी मनुष्याला आपण म्हणतां तसला शीलसंयम कोठून असणार!''

अंगुलिमाल बुद्धाच्या जवळच बसला होता. उजवा हात पुढें करून बुद्ध राजाला म्हणाला, "महाराज, हा येथें अंगुलिमाल बसला आहे.''

तें ऐकून पसेनदिराजाच्या अंगावर कांटा उभा राहिला. तो भयचकित होऊन कावराबावरा झाला. तेव्हा बुद्ध म्हणाला, "महाराज, घाबरण्याचे कांही एक कारण नाही. अंगुलिमालापासून तुला मुळींच धोका पोहोंचण्याचा संभव नाही.''

राजाचें भय शमन पावलें, आणि तो अंगुलिमालाला म्हणाला, "भदंत, तूं आर्य आहेस ना?''

"होय महाराज,'' अंगुलिमालानें उत्तर दिलें.

"तुझ्या आईबापाचें नांव व गोत्र कोणते?''

"माझ्या आईचें नाव मन्तानी व बापाचे गोत्र भर्ग.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel