"भगवन्, वज्जींच्या राज्यांत स्त्रीजातीचा मान चांगला राखला जातो, असें माझ्या ऐकण्यांत आहे.''
"वज्जींची शहरातील किंवा शहराबाहेरील जीं देवस्थानें असतील, त्यांची ते योग्य काळजी घेत आहेतना?''

"होय भगवन्, ते आपल्या देवस्थानांची योग्य काळजी घेतात, असें मी ऐकिलें आहे.''

"आनंद, आपल्या राज्यांत आलेले अर्हन्त सुखानें रहावे, व न आलेल्या अर्हन्तांनां आपल्या राज्यांत येण्यास उत्तेजन मिळावें, यासाठीं वज्जी अर्हन्तांनां कोणत्याहि प्रकारें ताप पोहोचूं देत नाहींतना?''

"भगवन्, वज्जी साधुसंतांसंबंधानें फार आदर ठेवीत असतात, व त्यांचें योग्य संगोपन करीत असतात, असें माझ्या ऐकण्यांत आलें आहे.''

बुद्ध वस्सकारब्राह्मणाला म्हणाला "हे ब्राह्मण, मीं एकदां वैशालीमध्यें रहात असतां अभ्युन्नतीचे हे सात नियम वज्जींनां घालून दिले होते. या सात नियमांनां अनुसरून जोंपर्यंत वज्जी वागतील, तोंपर्यंत त्यांची भरभराटच होणार आहे, अवनति होणार नाही.''

वस्सकारब्राह्मण म्हणाला "भगवन्, यांपैकी एका नियमाला जरी वज्जी अनुसरले, तरी त्यांची हानि होण्याचा संभव नाही. सर्व नियम पाळण्यांत आले, तर त्यांची अभ्युन्नति होईल, हें सांगावयालाच नको! आमच्या राजानें वज्जींवर स्वारी करूं नये, हें चांगलें!''

वस्सकारब्राह्मण निघून गेल्यावर बुद्धानें आनंदाला पाठवून राजगृहाच्या आसपास रहाणार्‍या सर्व भिक्षूंनां एकत्र जमविलें, व तो त्यांनां म्हणाला "भिक्षुहो, मी तुम्हाला अभ्युन्नतीचे सात नियम घालून देतों, त्यांचे सावधानपणें श्रवण करा. जोंपर्यंत तुह्मी वारंवार एकत्र जमून संघकृत्यें कराल, जोंपर्यंत तुमच्यामध्यें एकी राहील, एकीने तुम्ही सर्व संघकृत्यें कराल; जोपर्यंत तुम्ही संघाचे नियम मोडणार नाहींत; जोंपर्यंत तुम्ही आपल्यापैकी वृद्ध विद्वान भिक्षूंनां मान द्याल; जोंपर्यंत तुम्ही एकांतवासाची आवड धराल; आणि जोंपर्यंत आपल्या साथीदारांनां सुख व्हावें याजबद्दल काळजी वागवाल, तोंपर्यंत तुमची अभ्युन्नतिच होणार आहे, हानि होणार नाही.

"भिक्षुहो, आणखीहि अभ्युन्नतीचे सात नियम मी घालून देतों, त्यांचें सावधानपणें श्रवण करा. (१) घरगुती कामांत आनंद मानूं नका; (२) बोलण्यामध्ये सर्व काळ घालविण्यांत आनंद मानूं नका; (३) निद्रेंत वेळ घालविण्यांत आनंद मानूं नका; (४) आपल्या साथीदारांबरोबर सर्व वेळ घालविण्यांत आनंद मानूं नका; (५) दुर्वासनांला वश होऊं नका; (६) दुष्टांच्या संगतीला लागूं नका; आणि (७) अल्पसमाधिलाभानें कृतकृत्य होऊं नका. जोंपर्यंत मनोभावानें हे सात नियम तुह्मी पाळाल, तोंपर्यंत तुमची अभ्युन्नतिच होणार आहे, हानि होणार नाहीं.

"भिक्षुहो, आणखीहि अभ्युन्नतीचे सात नियम मी सांगतों, त्यांचें श्रवण करा. (१) तुम्ही श्रद्धाळु व्हा; (२) पापकर्माला लाजा; (३) लोकापवादाचें भय ठेवा; (४) विद्वान व्हा; (५) सत्कर्में करण्याविषयीं उत्साह असूं द्या; (६) स्मृति जागृत ठेवा; आणि (७) प्रज्ञावान् व्हा. जोंपर्यंत तुम्ही या सात नियमांचें पालन कराल, तोंपर्यंत तुमची अभ्युन्नतिच होणार आहे, हानि होणार नाही.

"भिक्षुहो, आणखीहि अभ्युन्नतीचे सात नियम मी सांगतों, त्यांचें सावधानपणें श्रवण करा; (१) स्मृतिसंबोध्यंगाची भावना करा; (२) धर्मप्रविचयसंबोध्यंगाची भावना करा; (३) वीर्यसंबोध्यंगाची भावना करा; (४) प्रीतिसंबोध्यंगाची भावना करा; (५) प्रश्रिब्धसंबोध्यंगाची भावना करा; (६) समाधिसंबोध्यंगाची भावना करा; (७) उपेक्षासंबोध्यंगाची भावना करा. जोंपर्यंत तुह्मी हे सात नियम पाळाल, तोंपर्यंत तुमची अभ्युन्नतिच होणार आहे, अवनति होणार नाहीं.''

राजगृहांतील भिक्षूंना शील१, समाधि, प्रज्ञा इत्यादि मुद्द्यासंबंधानें वारंवार उपदेश करून बुद्धगुरु आपल्या भिक्षुसंघासह अंबलठ्ठिका गांवीं आला, व तेथून नालंदा गांवाला गेला. तेथें सारिपुत्त बुद्धाला वंदन करून म्हणाला "भगवन्, माझा आपणावर एवढा विश्वास आहे, कीं, तशा प्रकारचा विश्वास कोणत्याहि श्रमणब्राह्मणांचा असूं शकणार नाहीं!''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel