"आर्यपुत्र, तुह्मी जरी मला सर्व वैशाली दिली, तरी मीं बुद्धाला आणि भिक्षुसंघाला दिलेलें आमंत्रण माघारें घेणार नाहीं.'' आम्रपालीनें उत्तर दिलें.

लिच्छवी कांही न बोलतां बुद्धाजवळ गेले. त्यांनां दुरून पाहून बुद्ध भिक्षूंना म्हणाला "भिक्षुहो, ज्यांनी तावत्त्रिंशत् देव पाहिले नसतील, त्यांनी या लिच्छवींच्या समुदायाकडे पहावें!''

लिच्छवीराजांनी बुद्धाची भेट घेऊन आपल्याकडे दुसर्‍या दिवशीं भोजनास येण्याविषयीं त्याला आमंत्रण केलें; पण बुद्ध म्हणाला "लिच्छवीहो, उद्यां मीं आम्रपालीचें आमंत्रण स्वीकारलें आहे, तेव्हां तुमचें आमंत्रण मला स्वीकारतां येत नाहीं.''

दुसर्‍या दिवशीं बुद्धगुरु भिक्षुसंघासह माध्याह्न होण्यापूर्वी आम्रपालीच्या घरीं गेला. आम्रपालीनें स्वत: बुद्धाचे आणि भिक्षुसंघाचें संतर्पण केलें, व भोजनोत्तर आपलें उद्यान संघाला दान दिलें. तेव्हां आम्रपालीच्या दानाचें अनुमोदन करून व तिला धर्मोपदेश करून बुद्ध तेथून भिक्षुसंघासह निघून गेला.

वैशालीमध्यें आम्रपालीच्या उद्यानांत कांही काल राहून बुद्धगुरु भिक्षुसंघासह बिल्वग्रामाला गेला. तेथें तो भिक्षूंनां म्हणाला "भिक्षुहो, तुमच्या सोयीप्रमाणें या चातुर्मास्यांत तुह्मी वैशालीच्या आसपास वस्ती करा. मी हें चातुर्मास्य येथेंच घालविणार आहें.''

त्या चातुर्मास्यांत बुद्धाला भयंकर दुखणें आलें; पण त्यानें आपली जागृति ढळूं दिली नाहीं. तो आपणापाशींच ह्मणाला "भिक्षुसंघाला पाहिल्याशिवाय माझें परिनिर्वाण व्हावें, हें मला उचित नाहीं. तेव्हां माझ्या मानसिक उत्साहानें हे दुखणें दाबून टाकून मला माझ्या आयुष्याचे आणखी कांही दिवस वाढविले पाहिजेत.

बुद्ध या दुखण्यांतून बरा झाला. तेव्हां आनंद त्याला ह्मणाला "भगवन्, आपण या दुखण्यांतून बरे झालां, हें पाहून मला समाधान वाटत आहे. आपल्या या दुखण्यांत माझ्या जीवाला अगदीं चैन पडलें नाहीं, मला कोणतेंहि काम सुचलें नाहीं, आणि माझा देह दुर्बळ झाला. पण भगवन्, आपण भिक्षुसंघाला शेवटच्या कांही गोष्ट सांगितल्यावांचून निर्वाणाप्रत जाणार नाहीं, अशी मला आशा असल्यामुळें माझ्या मनाला जरा धीर आला.''

बुद्ध म्हणाला "आनंद, भिक्षुसंघ मजपासून आणखी कोणती गोष्ट समजावून घेण्याची इच्छा करीत आहे? माझा धर्म मीं उघड करून सांगितला आहे, त्यांत मीं गुरुकिल्ली ठेविली नाहीं. आनंद! ज्याला आपण भिक्षुसंघाचा नायक व्हावें, भिक्षुसंघ आपल्यावरच अवलंबून रहावा असें वाटत असेल, तोच शेवटी भिक्षुसंघाला सांगण्यासाठी कांही गोष्टी गुप्त ठेवील; पण आनंद, तथागताची भिक्षुंसंघाचा नायक होण्याची, किंवा भिक्षुसंघ आपणावरच अवलंबून रहावा अशी इच्छा नाहीं. तेव्हां तथागताजवळ अशी कोणतीच गोष्ट नाहीं, कीं, ती त्यानें भिक्षुसंघाला स्पष्टपणें सांगितली नाही. आनंद! मी आतां वृद्ध झालों आहे; मोडक्या खटार्‍यासारखा माझा देह जर्जरित झाला आहे. ज्या वेळीं मी निरोधसमाधीची भावना करितों, त्याच वेळीं माझ्या देहाला सुख होत असतें. म्हणून आनंद, आतां तुम्ही स्वत:वरच अवलंबून रहा. या संसारसमुद्रामध्यें आपल्या मनालाच द्वीप बनवा, धर्माला द्वीप बनवा, आपल्या आत्म्याला शरण जा, आणि धर्माला शरण जा. आनंद, जे चार स्मृत्युपस्थानांची भावना करितात, ते आत्मद्वीप होत, ते धर्मद्वीप होत, ते आत्मशरण होत, आणि तेच धर्मशरण होत.''

चातुर्मास्य संपल्यावर बुद्धगुरु चापालचैत्य या ठिकाणीं येऊन राहिला. तेथें मार त्याला म्हणाला "भगवन्, आतां आपण परिनिर्वृत्त व्हा! मागें आपण म्हणालांत, कीं, भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका यां सर्वांनां माझा धर्म नीट समजल्यावांचून मी निर्वाणाला जाणार नाहीं; पण भगवन्, आतां आपले भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका हे सर्व शिष्य धर्मविचारांत तरबेज आहेत; आपल्या धर्माचा प्रसार सर्वत्र झाला आहे. आतां आपणाला इहलोक सोडून जाण्याला कोणतीच अडचण राहिली नाही!''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel