भांडग्रामाहून हस्तिग्राम, आम्रग्राम, जंबुग्राम, भोगनगर इत्यादि ठिकाणीं प्रवास करीतकरीत बुद्धगुरु भिक्षुसंघासह पावा नांवाच्या नगराला आला, व तेथें चुंद नांवाच्या लोहाराच्या आम्रवनांत राहिला. चुंदाला बुद्धगुरु आल्याची बातमी समजल्याबरोबर तो त्याच्या दर्शनाला गेला, आणि दुसर्‍या दिवशीं त्यानें आपल्या घरीं बुद्धाला आणि भिक्षुसंघाला निमंत्रण केलें.

दुसर्‍या दिवशीं माध्याह्नकालापूर्वी बुद्ध भिक्षुसंघासह चुंदाच्या घरीं गेला. चुंदानें नानातऱ्हेचीं पक्वान्नें तयार करविलीं होतीं, त्यांत सूकरमद्दव१ नांवाचा एक पदार्थ होता. तो जेव्हां वाढण्यांत आला, तेव्हां बुद्ध चुंदाला म्हणाला "हा पदार्थ तूं दुसर्‍या कोणाला वाढूं नकोस; हा पदार्थ ज्याला जिरेल असा मनुष्य मला या जगामध्यें दिसत नाहीं, म्हणून यांतील जो भाग शिल्लक राहिला असेल, तो जमिनींत गाडून टाक.''

बुद्धाच्या सांगण्याप्रमाणें चुंदानें तो पदार्थ एका खड्ड्यांत पुरून टाकिला.

त्या दिवशीं भोजनोत्तर बुद्धाला अतिसाराचा विकार उत्पन्न झाला. परंतु मरणांतिक वेदना होत असतांना देखील त्या सहन करून बुद्ध शांतपणें तसाच पुढल्या प्रवासाला निघाला. पावेहून कुसिनारा येथें जाण्याचा त्याचा बेत होता. पण वाटेंत ककुत्था नांवाच्या नदीजवळ आल्यावर त्याला फारच थकवा आला, व तो आनंदाला म्हणाला "आनंद, मला थोडें पाणी आणून दे.''

आनंद म्हणाला "भगवन्, आम्ही ककुत्था नदीच्या अगदीं जवळ आलों आहों, तेथें जाऊन आपण पाणी प्यावें, आणि आपले हातपात धुवावे.''
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ हा पदार्थ कोणत्या वस्तूचा बनविला होता, यासंबंधानें टीकाकारांचा मतभेद आहे. या वादग्रस्त प्रश्नांत येथें शिरण्याची आवश्यकता न वाटल्यामुळें मूळ शब्द तसाच कायम ठेवण्यांत आला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुद्धानें आणखी दोनवार पाणी आणण्यास सांगितल्यावर आनंद जवळच्या एका ओढ्यावर पाणी आणण्यासाठीं गेला. त्या ओढ्यांतून पुष्कळ गाड्या गेल्यामुळें त्याचें पाणी अत्यंत गढूळ झालें होतें; परंतु आनंद तेथें पोहोंचल्याबरोबर तें पराकाष्ठेचें स्वच्छ झालें, व त्यामुळें आनंद आश्चर्यानें चकित झाला. पाणी घेऊन आल्यावर त्यानें ती गोष्ट बुद्धाला सांगितली, आणि तो म्हणाला "भगवन्, तथागताच्या महानुभावामुळें हें पाणी देखील स्वच्छ झालें!''

बुद्ध तें पाणी प्याला. इतक्यांत पुक्कुस नांवाचा मल्ल कुसिनारा येथून पावेला जात होता. तो बुद्धाला पाहून त्याच्याजवळ आला. बुद्धानें त्याला कांही वेळ उपदेश केल्यावर त्यानें आपल्याजवळचीएक अत्यंत सुंदर सुवर्णवर्ण वस्त्रांची जोडी बुद्धाला अर्पण केली, व नमस्कार करून तो तेथून निघून गेला.

त्या वस्त्रांनी आपला देह आच्छादून बुद्धगुरु भिक्षुसंघासह ककुत्था नदीवर गेला, व तेथें स्नान करून जवळच्या आमराईंत शिरला, आणि चुंदक नांवाच्या भिक्षूला म्हणाला "हे चुंदक, मला जरा विश्रांति घेऊ दे. माझी कंथा तूं येथें पसर.''

बुद्धाच्या आज्ञेप्रमाणें चुंदकानें ती कंथा चौघडी करून खाली पसरली. बुद्धगुरु तीवर निजला, आणि आनंदाला ह्मणाला "आनंद, मला जेवण दिल्याबद्दल चुंद लोहाराला वाईट वाटण्याचा संभव आहे; पण तुम्ही त्याला असें सांगा, कीं, `चुंद, तुझें मोठें भाग्य समजलें पाहिजे! कांकी, तथागताला शेवटली भिक्षा देण्याची दुर्मिळ संधि तुलाच मिळाली. ज्या दिवशीं तथागत संबोधिज्ञान मिळवितो, आणि ज्या दिवशीं तो परिनिर्वाण पावतो, त्या दोन दिवशीं त्याला दिलेली भिक्षा महत्फलदायक आणि महागुणकारी होय' याप्रमाणें उपदेश करून चुंदाच्या मनांतील शंकेचें तुह्मी निरसन करा.''
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ कुसिनारेंतील आणि पावेंतील महाजनांला मल्ल म्हणत असत. हे वासिष्ठगोत्री क्षत्रिय होते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel