अनुरुद्ध म्हणाला, "गृहस्थहो, देवांच्या प्रभावानें ही चिता पेटत नाही. महाकाश्यप पावा नगराहून तथागताच्या शरीराचें शेवटचें दर्शन घेण्यासाठीं मोठ्या भिक्षुसमुदायासहवर्तमान येथें येत आहे. तो येथें येऊन पोहोंचल्यावांचून ही चिता पेटतां कामा नये, असा देवांचा अभिप्राय आहे.''

इतक्यांत महाकाश्यप तथगताच्या चितेजवळ येऊन पोहोंचला. त्यानें त्या चितेला त्रिवार प्रदक्षिणा केली आणि बुद्धाचे पाय उघडून त्यांवर आपलें मस्तक ठेविलें. महाकाश्यपाबरोबर आलेले भिक्षूहि त्या चितेला त्रिवार प्रदक्षिणा करून तथागताच्या पायां पडले. तेव्हा चिता आपोआप पेटली!

तथागताचें शरीर दग्ध झाल्यावर आकाशांतून एक उदकधारा खालीं येऊन तिनें ती चिता विझविली. मल्लांनींहि गंधोदकाने ती चिता विझविली. बुद्धाच्या अस्थि आपल्या संथागारांत गोळा करून मल्लांनीं त्यांच्या रक्षणासाठीं नागव्या तलवारींचा खडा पहारा ठेविला, व नृत्य, गीत, वाद्य इत्यादिकांनीं त्या अस्थींची पूजा करण्यास सुरुवात केली.

तथागत कुसिनारा येथें पिरनिर्वृत झाला, ही वार्ता लवकरच सर्वत्र पसरली. तेव्हां मगधदेशाच्या अजातशत्रुराजानें, वैशालींतील लिच्छवींनी, कपिलवस्तूंतील शाक्यांनी, अल्लकप्प येथील बुलींनी, रामग्रामांतील कोलियांनी, वेठ्ठद्वीपांतील एका प्रसिद्ध ब्राह्मणानें, आणि पावा येथील मल्लांनीं बुद्धाच्या शरीरावशेषांचा हिस्सा आणण्यासाठीं आपापले दूत कुसिनारेला पाठविलें; पण मल्ल त्यांना हिस्सा देण्यास कबूल होईनात. तेव्हा द्रोण नांवाचा एक विद्वान् ब्राह्मण कुसिनारेंतील मल्लांना म्हणाला "महाजनहो, मी काय बोलतों याजकडे लक्ष्य द्या. आमचा बुद्ध क्षमावादी होता. या थोर पुरुषाच्या शरीरावशेषाच्या हिश्शासाठीं भांडत बसणें योग्य होणार नाहीं. ह्मणून सर्वांनी एकमतानें आठ भाग करावें, हें चांगलें. सर्व दिशांनां बुद्धाचे स्तूप होणें इष्ट आहे. कांकी, पुष्कळ लोकांची बुद्धावर भक्ति आहे.''

नंतर त्या ब्राह्मणानें सर्वांची समजाविशी करून तथागताच्या अस्थींचे बरोबर आठ भाग केले, व ते त्या दूतांनां वांटून देऊन तो म्हणाला "आतां हा जो घडा राहिला आहे, तो तुम्ही मला द्या. बुद्धाच्या स्मारकासाठीं मी या घड्यावर एक स्तूप बांधणार आहें.''

त्या सर्वांनी तो घडा मोठ्या आनंदानें द्रोण ब्राह्मणाला दिला. इतक्यांत पिप्फलिवन येथील मौर्यांचा दूत बुद्धाच्या अस्थींचा हिस्सा मागण्यासाठीं कुसिनारेला येऊन पोहोंचला. पण आतां हिस्सा मिळणें शक्य नसल्यामुळें बुद्धाच्या चितेचे कोळसे त्या दूताच्या स्वाधीन करण्यांत आलें.

अजातशत्रूनें राजगृहामध्यें आपल्या वांट्याला आलेल्या बुद्धाच्या अस्थींवर एक मोठा स्तूप बांधला. लिच्छवींनीं वैशालीमध्ये, शाक्यांनीं कपिलवस्तूमध्यें, बुलींनीं अल्लकप्प येथें, कोलियांनी रामग्रामांत, वेठ्ठद्वीपक ब्राह्मणानें वेठ्ठद्वीपांत, पावेंतील मल्लांनी पावा येथें आणि कुसिनारेंतील मल्लांनी कुसिनारा येथें आपापल्या वांट्याला आलेल्या बुद्धास्थींच्या हिश्शांवर स्तूप बांधिला, आणि पिप्फलिवनांतील मौर्यांनी आपल्या शहरांत आपणाला मिळालेल्या बुद्धाच्या चितेच्या कोळशांवर स्तूप बांधला. याप्रमाणें बुद्धास्थींवर आठ स्तूप बांधले गेले. एक घड्यावर बांधला गेला, आणि एक चितेच्या कोळशांवर बांधला गेला.

समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel