४ पृथ्वीमंडळ

पृथ्वी, उदक, तेज, इत्यादिकांची मंडळाकार आकृति डोळ्यांसमोर ठेवून तिचें चिंतन केलें असतां अर्पणा समाधि साधतां येते. या मंडळाचें चिंतन सर्व प्रकारच्या मनुष्यांना हितकारक आहे. ज्याला पृथ्वीमंडळावर ध्यान करावयाचें असेल त्यानें नांगरलेल्या जमिनीत किंवा जेथे गवत वगैरे उगवले नसेल अशा ठिकाणीं जाऊन तेथें जमिनीचा वर्तुळाकार भाग डोळ्यांसमोर ठेवून त्यावर चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. अशानें ध्यान साध्य होत नसेल तर एक वीत चार अंगुले व्यासाचेंॉ अरुणवर्ण मृत्तिकेचें एक मंडळ तयार करावें; व एकांतात बसून त्यांचें ध्यान करावें. उदकमंडळाचें ध्यान करणारानें वर्तुलाकृति तलाव, विहिरी इत्यादिकांवर ध्यान करावें, तेजोमंडळाचें ध्यान करणारास सूर्यमंडळ, चंद्रमंडळ किंवा दिव्याची ज्योति इत्यादिकांवर ध्यान करितां येतें. या मंडलाच्या चिंतनानें अर्पणा समाधीची चारहि ध्यानें साध्य होतात.

समाधीला प्रतिबंधक गोष्टी

वसतिस्थान, आसपासचा प्रदेश, संभाषण, सोबती, भोजन, ऋतु इत्यादि गोष्टी यथायोग्य नसल्यावर त्यांपासून समाधि साधण्याला वारंवार अडथळा येतो. म्हणून दूरवर विचारानें अशा गोष्टींची योग्य निवड केली पाहिजे.

जेथून रम्य भूमिभाग दृष्टीस पडेल अशा उंचवटय़ाच्या, नदीकिनार्‍याच्या किंवा समुद्रकिनार्‍याच्या प्रदेशांत योग्याचें वसतिस्थान असणें समाधीला अनुकूल आहे. कार्ली, कान्हेरी वगैरे ठिकाणी जीं भिक्षूकरितां लेणीं कोरलीं आहेत त्याचें कारणहि हेंच असले पाहिजे. वसतिस्थानाच्या आसपासचा प्रदेश चांगला असला पाहिजे. दारूबाज वगैरे दुराचारी लोकांचा किंवा सर्पव्याघ्रदि हिंस्र प्राण्यांचा योग्याच्या वसतिस्थानाच्या आसपास सुळसुळाट असेल तर त्यांपासून वारंवार समाधीस अंतराय होणार आहे. योग्यानें अधार्मिक संभाषण अगदीच वर्ज्य केलें पाहिजे, व धार्मिक संभाषणातहि परिमितता ठेविली पाहिजे. चंचल मनुष्याची सोबत योग्यानें आरंभी मुळींच करतां कामा नये. त्यानें स्थिर धार्मिक मनुष्याचीच संगति केली पाहिजे. भोजनाची निवड ज्याच्या त्याच्या तब्येतीवर अवलंबून आहे. जेणेंकरून अंगांत हुषारी राहील असें अन्न परिमितपणें आणि नियमितपणें सेवन केलें पाहिजे. योगारंभी योग्याला मानवेल असाच ऋतु असावा लागतो. कोणास उन्हाळा मानवतो, कोणास पावसाळा मानवतो व कोणास हिवाळा मानवतो. ज्यानें त्यानें आपल्या अनुभवानें ही निवड करावी. एकंदरीत,

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्रश्नवबोधस्य योगो भवति दु:खहा।।


"ज्याचे आहारविहार बेताचे असतात, सर्व प्रसंगी ज्याचे व्यापार नियमित असतात. तसेंच ज्यांचे निजणें आणि जगणें बेताचे असतें अशा मनुष्याचा योग त्याच्या दु:खाचा समूळ नाश करतो." भगवग्दीतेंतील हा उपदेश बौद्ध मतास अनुसरूनच आहे.

सभ्यगृहस्थ हो, आतां बौद्धधर्ममार्गाची जी तिसरी पायरी अधिप्रज्ञाशिक्षा किंवा प्रज्ञा, तिचा आपण थोडक्यात विचार करूं,  प्रज्ञा दोन प्रकारची आहे. लौकिकप्रज्ञा आणि लोकोत्तरप्रज्ञा. जिच्या योगानें मनुष्य प्रपंचामध्यें अल्पप्रयासानें परोपकार करण्यास समर्थ होतो किंवा खलांचा कावा चालूं देत नाहीं ती लौकिकप्रज्ञा होय. जातकग्रंथांमध्यें गोष्टींच्या रुपानें तिचीं अनेक उदाहरणें सांपडतात. लोकोत्तर प्रज्ञा म्हटली म्हणजे चार आर्यसत्यें, प्रतीत्यसमुत्पाद इत्यादिकांचे यथार्थ ज्ञान होय. या लोकोत्तर प्रज्ञेलाच येथें अधिप्रज्ञाशिक्षा किंवा प्रज्ञा असें म्हटलें आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel