त्या वेळी संभूत नांवाचा प्रसिद्ध भिक्षु अहोगंग पर्वतावर रहात होता. तेथें यशाच्या आमंत्रणावरून आलेले पावांतील ६० व अवंतीकडील ८८ भिक्षु जमा झाले. त्या सर्वानी सोरेय्य प्रदेशांत राहणार्या रेवत भिक्षूला आपल्या पक्षाचा पुढारी करण्याचा विचार केला. हें वर्तमान रेवतास समजलें, तेव्हां त्यानें आपलें स्थान सोडून दुसरीकडे प्रयाण केलें; कारण त्याला पुढारीपणा नको होता. त्याच्या मागोमाग ते भिक्षु त्या ठिकाणी गेले. अशा रीतीनें चार-पाच ठिकाणी फिरून त्यांनी त्याला गाठलें, व आपला पुढारीपणा त्याला दिला. हें वर्तमान वज्जिपुतक भिक्षुंनां समजलें. तेव्हां त्यांनी उत्तर भिक्षूंच्या मार्फत रेवताचे मन आपल्या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सिद्धीस गेला नाही.

नंतर हे सर्व भिक्षु, जेथें हा वाद उपस्थित झाला तेथेंच तो मिटवावा, या उद्देशानें वैशालीस आले. वैशाली नगरीत सर्वकामी नांवाचा एक अतिवृद्ध भिक्षु रहात होता. आनंदाचा (ज्याला महाकाश्यपानें धर्मसंबंधी प्रश्न विचारले त्याचा) हा शिष्य. याचीही वाद मिटविण्याच्या कामी त्या भिक्षूंनी मदत घेतली. ते सर्व भिक्षु एकत्र जमले. परंतु एका पक्षानें एक म्हणावें, तर दुसर्यानें दुसरें, अशी स्थिती झाली. वाद काही मिटेना, तेव्हां त्यांनीं प्रत्येक पक्षाचे चार चार भिक्षु निवडले, व त्यांनीं बहुमतानें वाद मिटवावा, असें ठरविलें. वज्जिपुत्तकांच्या तर्फे सर्वकामी, खाळह, खुज्जसोभित आणि वासभगामिक या चारांची निवड झाली. पावांतील वगैरे भिक्षुंच्या तर्फे रेवत, संभूत, यश आणि सुमन या चारांची निवड झाली. या आठांनीं वालिकाराम विहारांत एकत्र होऊन वादाचा निकाल यशाच्या तर्फे केला. याप्रमाणें दुसर्या संगीतीचें काम संपलें.

पहिल्या आणि दुस-या संगीतीची हकीगत त्रिपिटकांतील चुल्लवग्गांत आली आहे. तिसर्या संगीतीची हकिगत त्रिपिटकांत सापडत नाहीं. बुद्धघोषाचार्याच्या समन्तपासादिका (विनयट्ठकथा) नामक ग्रंथाच्या आरंभीं ही हकीगत दिली आहे. तिच्या खरेपणाविषयीं पाश्चात्य पंडितांत बराच मतभेद आहे. तथापि अशोक राजा राज्य करीत असतां तिसरी संगति झाली असावी, यात शंका नाहीं.

अशोकानें दूरदूरच्या प्रदेशांत बौद्ध धर्मोपदेशकांला पाठविलें, याला आधार त्याला शिलालेखांतच१ (१ मासिक मनोरंजनाच्या सन १९०९ च्या दिवाळीच्या अंकांतील पृष्ठ १३२ वरील ‘अशोकाच्या शिलालेखांतील वेंचे’ हा लेख पहावा.) सांपडतो. शिवाय दुराचारी भिक्षूंनां सफेत वस्त्रे देऊन संघांतून घालवून दिलें जाईल, अशा अर्थाचा मजकूर सारनाथ (काशी) येथील शिलास्तंभावरील लेखांत आहे. तेव्हां उपदेशक पाठविण्यासाठीं आणि दुराचारी भिक्षु कोणते हें ठरविण्यासाठीं अशोकानें एखादी परिषद भरविली असल्यास त्यांत कांही नवल नाहीं. या तिसऱय संगीतीचें अध्यक्षस्थान मोगलिपुत्त तिस्स याजकडे होतें असें महावंसादि ग्रंथांत सांगितलें आहे. कथावत्थु नांवाचें जे अभिधर्मपिटकांत एक प्रकरण आहे, तें यानेंच रचलें असें म्हणतात. संगीतीचें काम संपल्यावर यानें निरनिराळ्या देशांत भिक्षु पाठविल्याचा उल्लेख महावंसांत आहे, तो असा:-

थेरो मोग्गलिपुत्तो सो जिनसासनजोतको।
निठ्ठापेत्वान संगीतिं पेक्खमातो अनागतं।।१।।
सासनस्स पतिठ्ठानं पच्चन्तेसु अवेक्खिव।
पेसेसि कत्तिके मासे ते ते थेरे तहिं तहिं।।२।।

बौद्ध धर्माचा प्रसार करणारा तो मोग्गलिपुत्त (तिस्स) स्थविर २ (२ स्थविर म्हणजे वृद्ध. संघांत प्रवेश करून दहा वर्षे झाल्यावर भिक्षूस स्थविर म्हणतात.) संगीतीचें काम संपल्यावर भविष्यकालाचा विचार  करून आणि मध्यप्रदेशाबाहेर बौद्धधर्माची प्रतिष्ठा होणार आहे, हें लक्षात आणून कार्तिक, मासांत त्या त्या स्थविरांना त्या त्या ठिकाणीं पाठविता झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel