एक म्हातारा उंदीर फार लबाड होता. त्याने एके दिवशी एका चापात खवा घालून ठेवलेला पाहिला. खवा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले, परंतु तो खाण्यासाठी आत तोंड घालावे तर चाप बसून जीव जाणार हे माहीत असल्यामुळे त्याने एक युक्ती केली. एक तरुण उंदीर तिकडून जात होता, त्याला हाक मारून म्हणाला, 'अरे मित्रा, हा खवा पाहिलास का किती सुंदर आहे तो ! मी नुकताच पोटभर जेवलो असल्यामुळे मला आता भूक नाही पण तुला भूक लागली असल्यास हा खवा तू खाऊन टाक.' या त्याच्या कपटी भाषणावर विश्वास ठेवून त्या तरुण उंदराने तो खवा खाण्यासाठी लगेच चापात तोंड घालताच तो चाप पटकन मिटला गेला आणि तो बिचारा उंदीर त्यात सापडून मेला. आता चापाचे भय उरले नाही असे पाहताच तो म्हातारा उंदीर पुढे झाला व त्याने सर्व खवा खाऊन टाकला.

तात्पर्य

- लबाड लोकांच्या लबाडीस बळी पडून स्वतःचा नाश करून घेणारे मूर्ख लोक जगात फार असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel