उन्हाळ्यात एके दिवशी इतके कडक ऊन पडले होते, की त्यामुळे सगळे प्राणी तहानेने अगदी व्याकुळ होऊन गेले. अशा वेळी एक सिंह आणि एक रानडुक्कर एका लहानश्या डबक्याजवळ एकदम पाणी पिण्यास आले, तेव्हा अगोदर पाणी पिण्याचा मान कोणाचा याबद्दल त्याचे भांडण सुरू झाले व दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. काही वेळाने दोघेही थकून विसावा घेण्यासाठी थांबले असता त्या दोघांपैकी जो कोणी लढाईत पडेल त्याच्या प्रेतावर धाड घालावी म्हणून आकाशात घिरट्या घालत असलेली काही गिधाडे त्यांच्या दृष्टीस पडली. त्यांना पाहताच डुक्कर सिंहाला म्हणाले, 'अरे, आपण आपापसात लढून एकमेकांना मारावं अन् या नीच गिधाडांनी आपल्या मांसावर ताव मारावा, त्यापेक्षा हे भांडण आपसात मिटवून टाकावं हेच चांगलं नाही का !' सिंहालाही ती गोष्ट योग्य वाटली व त्याने ती मान्य केली.

तात्पर्य

- 'दोघांचे भांडण आणि तिसर्‍याचा लाभ' ही म्हण लक्षात ठेवून जे वेळेवर भांडणे मिटवतात, ते बर्‍याच वेळा संकटात पडत नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel