तिसरें दर्शन

वसंता : वेदपुरूषा! डोळे उघडे ठेवून मनुष्य जर वागेल, तर किती निराळ जग होईल!

वेदपुरूष : परंतु सारी आंधळ्यांची माळ जशी जात असते, ज्याला स्वच्छ विचार सुचतो, तोहि जगाला तो विचार देण्यास भितो.

यद्यपि शुध्दं लोकविरूध्दं
नाचचणीयं नाकरणीयम्

असा शंकराचार्यांनी म्हणे दंडक घालून ठेवला आहे. परंतु अशाने हा वक्ततुंड समाज सुधारणार कसा ?

वसंता : नव विचार देणाराची जगांत दगडाधोंड्यांनीं पूजा केली जाते. ज्या देशांत ज्ञानासाठी लोक मरावयासहि तयार होतात, ते देश वर येतात.

वेदपुरूष : बरोबर आहे तुझें म्हणणें. त्यागांतूनच समृध्दि येत असते. पाश्चिमात्य देशांत लोकांची आज भरभराट दिसत आहे. ही भरभराट सद्गुणांतूनच जन्माला आली आहे. टपोर्‍या दाण्यांतूनच सुंदर व तेजस्वी अंकुर वर येतो. उकिरड्यावरहि हिरवागार डोलू लागतो. कचर्‍यांतून अंकुर कधीं वर येत नाहीं. जीवनातूनच जीवनाचा विकास होतो. तेजांतूनच तेजाची वृध्दि होते. पाश्चिमात्यांची प्रगति त्यांच्या पुण्यामुळें आहे. पापांमुळें नाहीं पापानें प्रगति खुंटेल, पुण्यानें पुढे जाईल. पाश्चिमात्य संस्कृतींत ध्येयाला जीवनेंच्या जीवनें देणारे शेकडों लोक निर्माण होत असतात. जें ज्ञान मिळेल, जो विचार स्फुरेल, तो ते निर्भयपणे जगाला देतात. ब्रूनोनें नवीन शास्त्रीय विचार दिला म्हणून त्याला जाळण्यांत आलें. गँलिलिओचा असाच छळ झाला. हुतात्म्यांनी पाश्चिमात्य प्रगतीचा पाया घातला आहे.

वसंता : आमच्याकडे याच्या उलट आहे. ग्रहण कां लागलें तें दीड हजार वर्षांपूर्वी आर्यभट्टानें लिहून ठेवलें. परंतु गिर्‍या गिर्‍या ग्रहण सोड असेंच आम्ही आरेडत आहोंत. आर्यभट्टाचा शोध समाजापुढें मांडला गेला नाहीं. त्यामुळें ज्ञानहि वाढलें नाहीं. लोकांना नवीन विचार सांगण्याचें धाडस आमच्याकडे फारसें कोणीं केलें नाहीं. लोकरंजनानें ज्ञान वाढत नसतें.

वेदपुरूष : तुम्ही तरुण आतां पुढें या आणि निर्भयपणें विचारांचा प्रसार केल्याशिवाय राहूं नका. स्वच्छ विचार ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. भ्रामक पापपुण्यांच्या कल्पनांच्या चिखलांत रूतून बसतां कामा नये. मनांतील शुध्द विचाराला न पटेल तें पाप. मनाला जें पवित्र वाटेल तें पुण्य. ''मन:पूत समाचरेत् '' -- आपल्या मनाला जें पवित्र वाटेल त्याप्रमाणें वागत राहिलें पाहिजे.

वसंता : ''स्वस्य च प्रियमात्मन:'' हाहि एक धर्महेतु सांगितला आहे. स्वत:च्या आत्म्याला, स्वत:च्या सदसद्विवेकबुध्दीला, शेवटीं जें गोड वाटेल, मंगल वाटेल, तें करीत राहिलें पाहिजे व त्यामुळें होणारी निंदास्तुति सहन केली पाहिजे.

वेदपुरूष : श्रीगीतेंतहि कृष्णानें शेवटी हेंच सांगितलें की ''यथेच्छसि तथ कुरु.'' जगाचें सारें ऐकून घेऊन मनाला प्रशस्त वाटेल तेंच प्रत्येकानें केलें पाहिजे.

वसंता : तुकारामांच्या एका अभंगात म्हटले आहे '' सत्या असत्यासि मन केलें ग्वाही'' काय सत्य, काय असत्य, तें माझें मीच ठरवीन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel