एरंडोलच्या आसपास किती तरी आमराया. एरंडोलचे आंबे फार प्रसिद्ध, रसाळ, गोड, चवदार आंबे. एरंडोल कागदासाठीं प्रसिद्ध होतें, आंब्यासाठी होतें. परंतु न्यायासाठी सर्वात अधिक प्रसिद्ध होतें. एरंडोली न्याय ही म्हणच पडली आहे. एरंडोलचे लोक समतोल, शांत व निश्चयी म्हणून प्रसिद्ध होतें. विचारपूर्वक आचार करणारे अशी त्यांची ख्याति होती. परंतु एरंडोलची पूर्वीची ही ख्याती आतं तितकी राहिली नव्हती.

एरंडोलचीं जुनीं खानदानी घराणीं साफ बसलीं होतीं. तीं कसेतरी दिवस काढीत होतीं. नवीन श्रीमंतवर्ग जन्माला आला होता. पूर्वीच्या श्रीमंत घराण्यांत जे कारभारी, गुमास्ते म्हणून वावरत होते, तेच आज सावकार होऊन बसले होते व ज्या मालकांकडे ते नोकर होते, ते मालक आज लाचार होऊन त्यांच्याकडे कर्ज मागायला येत असत. ज्या मोठमोठ्या वाड्यांतून पूर्वी मेजवान्या झडत, संगीताचे जलसे होत, त्या वाड्यांतून आतां केवळ उपासमार होती. जेथें गडीमाणसें हिंडत, जेथें गाड्याघोडीं असत, तेथें आज केवळ दारिद्र्य दिसून येत होतें.

एरंडोलमध्यें पंढरीशेट शिंपी म्हणून एक असेच नवीन सावकार होते. ते पिढीजात सावकार नव्हते. असेच उपरे सावकार. त्यांनीं कोठेंतरी डल्ला मारला होता असें म्हणतात. कोणी म्हणतात कीं एक मोठा दरोडेखोर डाका घालून त्यांच्याकडे लपला होता. सारी संपत्ती त्यांच्याकडे ठेवून तो गेला. परंतु तो परत आलाच नाहीं. ती जी संपत्ति मिळाली तीवर पंढरीशेटचे घराणें वर आलें. खानदेशांत बहुतेक ठिकाणीं ही डाक्यांची संपत्ति आहे. चोपडें शहरांत अजून खूप संपत्ति आहे म्हणतात. परंतु ही आली कोठून? खानदेशांत बहुतेक ठिकाणी ही डाक्यांची संपत्ति आहे म्हणतात. परंतु ही आली कोठून? खानदेशांत एक जुनी म्हण आहे, “धरणगांव में धन बडा, पारोळे में बाकी साकी; चोपडें में जावे पानी पीनेकू तो बतावे तापी.” चोरीची संपत्ति घरांत. त्यामुळे चोपड्याच्या श्रीमंतांना कोणीं घरांत येऊं नये असें जणुं वाटे. न जाणो उघडकीस काहीं यायचें. खानदेशभर अशा या डाक्यांतील संपत्तीच्या गोष्टी आहेत. त्यांतून गांवोगांवचे सावकार व धनिक वर आले.

पंढरीशेट श्रीमंत होते. परंतु त्यांच्या घरांत खानदानीपणा नव्हता. एक प्रकारची उदार व दिलदार वृत्ति नव्हती. इतकी श्रीमंती होती तरी घरी नीट भाजी खाणार नाहींत. दरिद्र्याप्रमाणे राहतील. दूध व ताकहि विकतील. खेड्यापाड्यावरून कुळें आलीं तर त्यांना गूळपाणी देणार नाहींत, त्यांच्या खाण्यापिण्याची चौकशी करणार नाहींत. पंढरीशेटजींस कोणीहि बरें म्हणत नसे. त्यांना कर्जदारांची कधीं दया येत नसे. पैसा म्हणजे माझा प्राण असें ते म्हणत.

याच एरंडोल शहरांत रामराव म्हणून एक घरंदाज गृहस्थ होते. पूर्वी ते श्रीमंत होते. परंतु आज त्यांना वाईट दिवस आले होते. त्यांना खूपच कर्ज झाले होतें. त्यांना आतां नवीन कर्ज द्यावयास कोणी तयार होतं नसे. परंतु कर्जाशिवाय तर त्यांचें पदोपदीं अडे. कोणाकडे तोंड वेंगाडावयाचें?


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel