कल्याण आतां वेळ मिळेल तेव्हां वाची. एक क्षणहि तो फुकट दवडीत नसे. गांधीवाद, समाजसत्तावाद, हिंसा, अहिंसा सर्व प्रश्नांच्या तेथें चर्चा होत. खडाजंगी होई. तो सारें ऐके. समाजवादी तत्त्वज्ञान, मार्क्सचें तत्त्वज्ञान त्याला आकर्षू लागलें. त्याच्या मनाचा तिकडे ओढा होताच. आतां नीट शास्त्रीय व चिकित्सक दृष्टीनें ते प्रश्न तो अभ्यासूं लागला. महात्माजींचा “विश्वस्तवाद” त्याला अशक्य वाटे. आपणांजवळची संपत्ति ही गरिबांची ठेव आहे, ती त्यांना परत केली पाहिजे, असें कोणता सावकार, जमीनदार, कारखानदार मानणार ? साधुसंत व पैगंबर हजारों वर्षें सांगत आले. परंतु एकीकडे लक्षाधीश व एकीकडे भिक्षाधीश आहेतच. एकीकडे मेजवान्या व एकीकडे उपासमार आहेच. एकीकडे गोलपोटये व एकीकडे खोलपोटये आहेतच. उपदेशांनी कांहीं होणार नाहीं. सा-या पिळल्या जाणा-या श्रमणा-यांनीं एकजूट करून उत्पादनसाधनें समाजाचीं केल्याशिवाय यांतून मार्ग नाही. हाच नवधर्म. हाच सर्वांच्या सर्वांगीण विकासाचा एकमेव पंथ.

कल्याण अशा त-हेनें विचारानें वाढत होता. त्याला विश्वासची आठवण येई. तो कोठल्या तुरुंगांत असेल, त्याचे हाल झाले असतील का, वगैरे त्याच्या मनांत येई. परंतु विश्वास तिकडे घरीं सुखांत होता. मौज करीत होता. आणि संध्या ? ज्या वर्तमानपत्रांत कल्याणला शिक्षा झाल्याचें तिनें वाचलें, तो अंक तिनें जपून ठेवला होता. ती रोज देवाला प्रार्थना करी व म्हणे, “माझा कल्याण सुखरूप ठेव.” तुरुंग ! तुरुंग हा शब्द भयंकर आहे. तुरुंग म्हणतांच मनासमोर भयानक चित्र उभें राहतें. वर्तमानपत्रांतून तुरुंगांतील हालांच्या हकीगती येत व संध्या रडे. ती देवाच्या पायां पडे.

एके दिवशीं संध्या बाहेर गेली. फिरत फिरत ती त्या झाडाजवळ आली. ज्या झाडाखालीं कल्याणची व तिची भेट झाली होती, जेथें कल्याण झोंपला होता, संध्याहि तेथें आज क्षणभर डोकें ठेवून पडून राहिली. कधीं येईल कल्याण तुरुंगांतून बाहेर ? कधीं भेटेल मला ? कल्याणला भेटायला जाऊं का ? परंतु तो कुठल्या तुरुंगांत असेल ? कसा भेटेल ? संध्या उठली. खिन्न व दु:खी होऊन ती घरीं आली. हातांत जपमाळ घेऊन ती बसली. अल्लड, खेळकर संध्या ! ती आज जणूं योगिनी झाली होती !

संध्या देवाला आळवीत होती व नाशिकच्या तुरुंगांत कल्याण मनांतील असल्यानसल्या देवाला हद्दपार करीत होता. जड प्रकृतींतून कसा तरी व केव्हां तरी जंतु जन्मला. त्या जंतूंतूनच पुढें विकास होत होत शेवटीं मनुष्य जन्मला. जडांतून चैतन्य निर्माण झालें. तें चैतन्य निर्माण झाल्यावर जडाची चैतन्यावर व चैतन्याची जडावर क्रिया-प्रतिक्रिया होत विरोधविकासवादी पध्दतीनें हें सारें विश्व पुढें चाललें आहे. ह्या गोष्टी तो शिकत होता व त्याला त्या पटत होत्या. इतिहासाकडे याच दृष्टीनें तो पाहूं लागला होता. विरोधविकासवाद सर्व विश्वांत भरून राहिला आहे. मानवी जीवनांतहि तो आहे. मानवी जीवनांत पोटापाण्याचे प्रश्न आधीं असतात. यामुळें मानवी इतिहासांत अर्थशास्त्राचा धागा हाती घेऊन विरोधविकासवाद शोधीत गेलें पाहिजे.

कल्याणच्या मनांत शंका येत असत. तो झगडत होता. आपण सदैव विकासाकडेच जात आहोंत का ? जग अधिक उन्नत व सुंदरच होत आहे का ? मनुष्य आहे तेथेंच आहे. काय आहे त्याच्यांत सुधारणा ? अजून माणूस माणसाला छळीत आहे, गुलाम करीत आहे, क्षुद्र भांडणें तो भांडत आहे. त्याची वासना तशीच स्वैर आहे. तेच रागद्वेष थैमान घालीत आहेत. बैलगाडया येऊन विमानें आलीं. परंतु माणसाचे रागद्वेषादि विमानाच्या गतीनें धुडगूस घालूं लागले. सा-या जगाची होळी करूं लागले. पूर्वी मनुष्य जवळच्या वस्तूला आग लावी आणि आतां विमानांतून सा-या जगाला आग लावतो. बाह्य परिस्थितींत मानवानें फरक केला, परंतु त्याच्या मन:सृष्टींत काय आहे फरक ? निसर्गाला तो जिंकीत आहे, दुबळया लोकांना तो जिंकीत आहे. परंतु स्वत:च्या मनाला, स्वार्थाला त्यानें जिंकलें आहे का ? तें जोंपर्यंत होत नाहीं, अखिल मानवी समाजाच्या कल्याणाची भावना जोंपर्यंत मनांत रुजत नाहीं, तोंपर्यंत हे ??उलट माकडाच्या हातीं तें कोलित दिल्याप्रमाणें आहे.

परंतु जगांत कांहींच का सुधारणा नाहीं ? तीन?? पाहिला तर मानवी मनाचा कांहींच विकास झालेला?? नुसते शिक्षांचे प्रकारच पाहिले तरी त्यांत सुधारणा?? भिंतींत चिनून मारीत, डोळे काढीत, तेलांत तळीत, ?? चाकावर घालून भरडीत, पोत्यांत विंचू, सरडे, उंदीर, घुशी घालून त्यांत बांधीत, जिभा डागून त्यांत लोखंडी वळीं बसवीत, सुळावर देत, कु-हाडीनें तोडीत ! काय हा मानव ! परंतु थोडी नाहीं का सुधारणा ?

मनुष्य अशा स्थितींतून वर येत आहे. क्रूरपणा कमी होत आहे. वाईट चाली कमी होत आहेत. थोडें स्वातंत्र्य वाढत आहे. अमेरिकेंत निग्रोंची मान उंच होत आहे. गुलामगिरीची चाल बंद झाली. हिंदुस्थानांतील अस्पृश्यता दूर होऊं लागली.
परंतु गुलामगिरी अन्य रूपानें येतच आहे. वसाहतींतील लोक गुलामच नाहींत का ? हुकुमशहा एक प्रकारे स्वत:च्या लोकांनाहि गुलामच नाहीं का करीत ? कोठें आहे त्यांना बुध्दीचें स्वातंत्र्य ? कोठें आहे त्यांच्या लोकांच्या विचाराला वाव ? आणि एकदां बुध्दि बध्द झाली, म्हणजे ज्ञान-विज्ञानाचा अस्त नाहीं का होणार ? पुन्हां का अज्ञानयुग येणार ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel