“कल्याण, ते भाईजी मला इकडेच राहा असं सांगत होते. किती त्यांचा आग्रह. मीं तुझीहि सारी हकीगत त्यांना सांगितली. आपले कल्हईचे प्रयोग सांगितले. त्यांना वाईट वाटलं. ते म्हणाले, “असे उपाशी नका राहात जाऊं. मला कळवीत जा. माझीं मतं तुमच्याशीं एकरूप नसलीं, तरी आपण मित्र होऊं या. मी जणूं तुमचा वडील भाऊ.” कल्याण, ते प्रेमळ आहेत. परंतु दु:खी आहेत. त्यांना एकटं एकटं वाटतं. ते श्रमजीवींची अधिक उत्कटतेनं बाजू घेतात व आपणांसारख्यांना बहिष्कृत मानीत नाहींत, म्हणून संकुचित गांधीवादी जे आहेत व जे ठिकठिकाणीं आज सूत्रधार आहेत त्यांचा त्यांच्यावर रोष. आणि ते अहिंसा मानतात, देवाला हांक मारून रडतात, म्हणून भाईलोकहि त्यांना हंसतात. ते मला म्हणाले, “मी एकटा आहें. माझा दिवा घेऊन मी जात आहें. थोडाफार जीवनाचा उपयोग झाला तर पुष्कळ झालं.” कल्याण, तूं सुटलास म्हणजे आपण त्यांना बोलावूं.”

“विश्वास, मी आजारी आहें हें संध्येला कळवूं नकोस. उगीच ती चिंता करीत बसेल. मी बरा आहें असंच तिला कळव. समजलं ना ?”

“कल्याण, मी का खोटं लिहूं ?”

“मोठया सत्याचा पुजारी कीं नाहीं तूं ! “

“बरं, तें पाहीन मी. कल्याण, आपण सत्याचे पुजारी नसलों तरी असत्याचेहि नाहीं. सत्याची मर्यादा आपणहि पाळतों. सत्य पाळणं हाच आपलाहि कायदा; असत्य हा अपवाद.”

इतक्यांत वेळ संपत आल्याची सूचना मिळाली.

“विश्वास, मला काय आणलं आहेस !”

“प्रेम. दुसरं काय आणूं, कल्याण ? भाईजींसारख्या नवीन मित्रांच्या प्रेमाची जोड. तूं बरा हो. क्रान्तीसाठीं, संध्येसाठीं, आम्हां सर्वांसाठी प्रकृति सांभाळ.”

“माझी काळजी करूं नको.”

दोघे मित्र हातांत हात घेऊन क्षणभर उभे राहिले. विश्वास गेला. कल्याण पुन्हां दवाखान्यांतील खाटेवर पडला. डोळे मिटून पडला. त्याच्या डोळयांसमोर शतचित्रें येत होतीं. “हे भाईजी कोण ? आपण बाहेर असतों तर त्यांना पाहिलं असतं. आणि विश्वास संध्येला माझ्या आजारीपणाविषयीं कळवील कीं काय ? तिला कळलं तर ती येईल. ती आली तर तिला माझी प्रकृति पाहून वाईट वाटेल. मला लौकर बरं झालं पाहिजे. परंतु तें का माझ्या हातीं आहे ?” अशा विचारांत तो होता.

आणि विश्वासनें खरेंच संध्येला पत्र लिहिलें. काय लिहिलें ?

“प्रिय संध्याताई,

तुम्ही आतां मला ओळखीत असाल. मी कल्याणला भेटायेला गेलों होतों. तो जरा आजारी होता. आतां त्याची प्रकृति सुधारत आहे. काळजी करू नये. तुम्ही आनंदांत राहा. कल्याणनं तुम्हांला आनंदी राहावयास, हंसाखेळावयास सांगितलें आहे.

विश्वास”

संध्येला तें पत्र मिळालें. कल्याण आजारी होता. कितपत आजारी होता ? विश्वास खरें कशाला लिहील ? मी काळजी करूं नये म्हणून मोघम त्यानें लिहिलें असेल. विश्वास भेटून आला आणि मी ? मी जाऊं का भेटायला ? आई देईल का पैसे, देईल का परवानगी ? मी भेटायला गेलें तर कल्याणला बरें वाटेल कीं वाईट ? तो मला विसरूं पाहात असेल का ? कीं माझें स्मरण करीत असेल ? काय करावें ?

तिन्ही सांजा झाल्या. आई बाहेर गेली होती. संध्येनें केरवारा केला व घागरकळशी घेऊन ती विहिरीवर गेली. परंतु घागर विहिरींत सोडून तेथें एका दगडावर ती बसली. समोर एक पक्षी नाचत होता. टुणटुण उडया मारीत होता. तिला त्या पक्ष्याचा आनंद पाहवला नाहीं. तिनें त्याला दगड मारला. तो उडून गेला. तिला त्या वेळेस कोणी जवळ नको होतें. मनुष्य नको. पशुपक्षी नको. कोणी नको. आणि समोर आकाशांत संध्या फुलली. तिनें डोळे मिटून घेतले. कशाला ही संध्या रोज मला लाजवते ? तिला रोज पतिदर्शन आहे. दिवसभर कर्तव्यसेवा करून दुनियेसाठीं जळून सायंकाळीं थकला भागलेला सूर्यनारायण पश्चिम संध्येजवळ येतो; परंतु या संध्येला तिचा सूर्यनारायण भेटत नाही. फुकट माझा जन्म. संध्या डोळे मिटून बसली. ती एक गाणें म्हणूं लागली. कानडी गाणें काय होतें त्या गाण्यांत ? संध्येनें डोळे उघडले. पुन्हा मिटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel