संध्येनें पत्नी शब्द एकदम उच्चारला, ती लाजली व बावरली.

विश्वास सामान आणायला गेला. संध्येनें भांडी नीट घासून स्वच्छ केलीं. तिनें केर काढला. अंथरुणें नीट झाडलीं. तिनें विस्तव पेटवला. तों विश्वास आला. साधा खिचडीचा बेत ठरला. म्हणजे सुटसुटीत काम. चुलीवर खिचडी ठेवून विश्वास व संध्या बोलत बसलीं.

“विश्वास, हरिणीला मघां तुम्ही रागं भरलेत. असं रागानं बोलूं नये. मुलींचं मन तुम्हांला कळत नाहीं. लहानसा शब्दहि आम्हांला दु:ख देतो. तो आम्ही मनांत धरून बसतों. मनांत उगाळीत बसतों.”

“संध्याताई, माझा स्वभावच तापट. आणि या आजारीपणामुळं मी चिरचिरा झालों आहें. आमच्या निराशा. तेंहि एक कारण आहे. मागं भाईजी एकदां मला असंच म्हणाले होते. परंतु माझ्या मित्रांना माझी संवय झाली आहे. ते तेवढं मनावर घेत नाहींत.”

“हरिणी चांगली आहे मुलगी. चपळ व उत्साही. विश्वास, मला नाहीं सायकलवर बसतां येत.”

“मग शिकायचं आहे ?”

“कल्याण मला शिकवील. सध्यां नको. आणि तुम्ही कां नेहमीं आजारी असतां ? “

“मधून मधून ताप येऊं लागला आहे; त्यामुळं अशक्तपणा फार वाटतो.”

“असा ताप येणं बरं नाहीं. जपा हो प्रकृतीला.”

रात्रीं जेवणें झालीं. विश्वास व बाळ बाहेर गॅलरीत झोंपले. संध्या आंत झोंपली. परंतु तिला झोंप येईना. ती विचार करीत होती. ती कल्याणला भेटायला आली होती. परंतु त्याचे मित्र तर येथें उपाशी होते. आजारी होते. जे पैसे कल्याणला पाहायला जाण्यांत मी खर्च करणार, ते येथें यांनाच खर्चाला दिले तर ? कल्याणला त्यानें अधिकच आनंद होईल. संध्या त्यामुळें कल्याणची अधिकच आवडती होईल. देवाला भेटायला जाणा-यापेक्षां, दुष्काळांतील लोकांना आधार देणारा देवाजवळ अधिक लौकर जातो. तीच खरी देवपूजा. त्याप्रमाणें कल्याणच्या आजारी मित्रांची सेवासुश्रूषा हीच कल्याणची भेट. मला त्यागी ना जीवन कंठायचें आहे ? तर मग करूं दे त्याग. प्रेम म्हणजे शेवटीं त्याग. परंतु प्रेम म्हणजे का प्रेमाचाहि त्याग ? परंतु मी कल्याणवरील प्रेमाचा का त्याग करीत आहें ? त्याची मूर्ति पाहणें म्हणजे प्रेम, का त्याला आवडणारें कर्म करणें म्हणजे त्याच्यावरचें प्रेम ? मी प्रेमाचा नाहीं त्याग करीत, तर आसक्तीचा त्याग करीत आहें, मोहाचा त्याग करीत आहें. का आईजवळ आणखी पैसे मागूं ? माझे सारे पैसे चोरीला गेले असें लिहूं ? परंतु आईला का फसवूं ? माझें डोकें मांडीवर घेऊन थोपटणारी, माझे अश्रु पुसणारी आई, तिला का खोटें लिहूं ? परंतु मोघमच लिहिलें तर ? अधिक पैसे पाहिजे आहेत. पाठव. एवढेंच लिहावें. कुणाजवळून घेऊन आई पाठविल्याशिवाय राहणार नाहीं. मुलीला परदेशीं दीनवाणी ती पडूं देणार नाहीं. असे विचार ती करीत होती.

दुस-या दिवशीं संध्येनें विश्वासजवळून एक पाकिट घेतलें व आईला लिहिलें. विश्वास भाईजींच्या पैशांची वाट पाहात होता. परंतु संध्येच्याच घरून ताबडतोब पैसे आले. संध्येला आनंद झाला. आईची अडचण तिच्या ध्यानांत आली. तिला कृतज्ञता वाटली. आईची धन्य आहें असें ती म्हणाली. तिनें विश्वासजवळ पैसे दिले. ते घेऊन विश्वास म्हणाला,

“संध्याताई, कशाला मागितलेत पैसे ?”

“तुम्हांला का मी उपाशी ठेवूं ?”

“किती दिवस तुम्ही आम्हांला पुराल ?”

“शक्य तोंवर.”

त्या दिवशीं होता रविवार. हरिणी दुपारीं जरा लौकर आली होती. मोकळेंपणें बोलणीं झालीं. संध्येनें सायंकाळजी भाजी चिरायला घेतली.

“मी चिरतें, संध्याताई ! “

“हरिणे, तूं बस. नाहीं तर सरबत कर. तुला आवडतं ना ?”

“आवडतं म्हणून का रोज करायचं ?”

“रोज नको करूं. पण आज कर. विश्वासहि घेतील. “

“घेशील का रे विश्वास ?”

“तूं करशील तर घेईन.”

“आणि बाळ रे कुठं गेला ?”

“तो गेला अभ्यासमंडळ चालवायला.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel