विरूपाक्षाच्या मंदिराजवळ गाडया आल्या; तों त्या देवळांत दुसरें एक लग्न उतरलें होतें. आतां काय करायचें ?

“इथं उतरायचा आमचा पूर्वापार हक्क आहे.”

कल्याणचे वडील म्हणाले.

“तुम्ही येणार हें आम्हांला काय माहीत ? आणि या पावसांतून आम्ही जाणार तरी कुठं ?” तें उतरलेलें व-हाड म्हणालें.

भांडण होणार कीं काय ? परंतु गांवचा पाटील आला.

“--आम्ही उद्यां दुपारीं इथून परतहि जाऊं.” कल्याणचे वडील म्हणाले.

“ठीक; तुम्ही गांवांत चला, मी रात्रीपुरती जागा देतों. उद्यां तिस-या प्रहरीं तुम्ही इथ या. लग्नांत विघ्न नको.” पाटील देवळांतील मंडळीला म्हणाला.

शेवटीं ती मंडळी गांवांत गेली. कल्याण, संध्या, रंगा सारीं देवळांत बसलीं. त्यांना भुका लागल्या होत्या. परंतु फराळाचें ज्या गाडींत होतें, ती अद्याप आलीच नव्हती. राहून राहून पाऊस येतच होता. लग्नाला का हें विघ्न ? हें लग्न पुढें का सुखावह होणार नव्हतें ? हें लग्न वधूवरांना पुढें का रडवणार होतें ? कां असा अकस्मात् पाऊस आला ? परंतु हे पावसाचे दिवसच आतां नाहींत का ? आणि या विराट विश्वांतील नाना शक्ति तुमच्या लहान संसाराची का पदोपदीं क्षिति करीत बसणार ? आपण सदैव. आशा राखून जावें. चांगली दृष्टि घ्यावी. हा पाऊस आला म्हणून का विघ्न मानायचें ? उलट हें शुभचिन्ह कां समजूं नये ? तो पाऊस अपशकुनी नव्हता. तप्त पृथ्वीला शांतवायला तो भरभरून येत होता. पृथ्वी आज शांत होत होती. प्रसन्न होत होती. तिच्या अंगावर रोमांच थरारत होते. पृथ्वीचा संसार हिरवा हिरवा होणार होता. सुकलेले झरे वाहूं लागणार होते. सर्वत्र चैतन्यकळा फुलणार होती. नद्यां नाचूं लागणार होत्या. पर्वत हिरवे पोषाख चढवणार होते. मौज, आनंद. तो पाऊस घाण वाहून नेणारा होता. नवसौंदर्य निर्मिणारा होता. पाऊस ! पाऊस म्हणजे सृष्टीचें महाकाव्य आहे, तो पाऊस.

इतक्यांत कानठळया बसवणारा कडाड आवाज झाला. आणि समोरच्या झाडावर विजेचा लखलखीत गोळा पडला. झक् झालें. संध्येनें कल्याणला मिठी मारली; तें झाड देवळावरच पडायचें; परंतु नशीब. नाहीं तर केवढा उत्पात तेथें झाला असता ! सारी मंडळी जागी झाली. आतां कोणालाच झोंपं येईना. देवानें सर्वांची झोंप उडवली.

“विरूपाक्षाची कृपा म्हणून वांचलों.” संध्येची आई म्हणाली.

“वधूवरांचं प्रभु असंच सदैव संकटांत रक्षण करो.” कल्याणचे वडील म्हणाले.

“पुढं का यांच्या आयुष्यांत अशींच वादळं येणार आहेत ? परंतु आलीं तरी त्यांतून निभावून जातील, असं का देवाला सुचवायचं आहे ?” आणखी कोणी म्हणाला.

आतां उजाडलें. सुंदर प्रकाश पसरला होता. रमणीच देखावा. सारी सृष्टि न्हाऊन माखून विश्वंभराच्या पूजेला जणूं उभी होती. आणि प्रेमळ रंगा काय करीत आहे ? त्या पडलेल्या झाडांचे पल्लव त्यानें सर्वत्र लावले. आसपासचीं फुलें आणून मधून गुंफविलीं. हिरवी सुंदर वनशोभा ? आणि लग्नसमारंभ सुरू झाला. संध्या नि कल्याण यांना फुलांच्या सुंदर मुंडावळया बांधण्यांत आल्या होत्या. किती गोड दिसत होती संध्या ! सारे विधि झाले. एकमेकांचे हात एकमेकांच्या हातांत देण्यांत आले. सर्वांनीं मंगल आशीर्वाद दिले. दुपारीं गोड जेवणें झालीं. मंदिर स्वच्छ सारवून मंडळी परत निघाली. गाडया जुंपण्यांत आल्या. संध्या नि कल्याण आतां एका गाडींत होती. तिसरा फक्त गाडीवान. संसारयात्रा सुरू झाली. संध्येचा हात कल्याणच्या हातांत होता. दोघें मुकीं होतीं. मधून मधून मंदमधुर हंसत व एकमेकांना बघत. आतां संध्याकाळ झाली. आकाशांत अनंत रंग पसरले आणि संध्येच्या मुखमंडलावरहि रंगसागर उचंबळला होता. कल्याणचे नेत्रमत्स्य त्यांत नाचत होते. तो मध्येंच आकाशाकडे पाही, मध्येंच संध्येकडे पाही. तो पुढील चरण गुणगुणूं लागला :

“येतांच सूर्य धामीं । रंगे खुले प्रतीची
किति गोड गोड रंग । प्रीती फुले मनींची ॥
अनुराग अंतरींचा । प्रकटे सहस्त्र रंगीं
सूर्यास न्हाण घाली । निज-भावना-तिरंगी ॥
किती गोड गोड दृश्य । किती गोड गोड चित्र
शतवार पाहुनीही । होती न तृप्त नेत्र ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel