भाईजी कशासाठी येणार होते ? त्यांना कां बरें बोलावण्यांत आलें ? काय होतें काय ? परंतु त्यांना विश्वासचें पत्र पोंचतांच ते निघाले, ते मुंबईला आले. संध्येला खूप आनंद झाला. तिला भाईजी म्हणजे एक आधार वाटे. कां वाटे तें सांगतां येत नाहीं. तिला त्यांच्याजवळ तिळमात्र संकोच वाटत नसे. ती त्यांच्याजवळ बसे, हंसे, थट्टाहि करी.

“भाईजी, फिरायला येतां ?” विश्वासनें विचारलें.

“चल, कल्याण नाहीं का येत ? “

“त्याला दुसरीकडे जायचं आहे. आपणच जाऊं. मला तुमच्याशीं जरा बोलायचं आहे.”

दोघे फिरायला गेले. वरळीच्या चौपाटीवर ते बसले होते. प्रथम कोणीच बोलेना.

“विश्वास, काय बोलायचं आहे ?”

“नेहमींचींच रडकथा.”

“पैसे का हवे आहेत ?”

“तुमच्याजवळ मागायचे तरी कितीदां ? आणि तुम्ही तरी नेहमीं कुठून आणणार ? देतां आले नाहींत तर तुमच्या मनालाहि त्रास होतो. तुम्ही वाईट वाटून घेतां.”

“विश्वास, मी लक्षाधीश असतों तर !”

“लक्षाधीश असतेत तर आम्हांला कदाचित् तुम्हीं जवळहि केलं नसतंत. भाईजी, आम्ही सदैव पैश्यांच्या अडचणींत असतों. ही रोजचीच रडकथा संपवण्यासाठीं आम्ही एक धाडसी प्रयत्न करणार आहोंत. त्या प्रयोगासाठीं आम्ही एक जुनी मोटर विकत घेणार आहोंत. आमच्याजवळ थोडे पैसे आहेत. तुम्ही चारशें द्या.”

“विश्वास, तुम्ही काय करणार त्याची मला एका क्षणांत कल्पना आली. परंतु माझं तुम्हांला सांगणं आहे कीं, असं कांहीं रोमांचकारी करूं नका. कांहीं तरी आदळआपट करणं बरं नव्हे. कांहीं तरी दिव्य भव्य करावं, साहस करावं, जीवनाचं महाकाव्य करावं, करुण, वीररस निर्मावे, असं तरुणांना वाटतं. मी त्यालाहि नांवं नाहीं ठेवीत. महान् क्रान्तिकारक क्षण येतो, त्या वेळीं सर्वांनीं उठून दिव्य भव्य करावं. परंतु आज का ती वेळ आहे ? आज तयारीचे, संघटनेचे दिवस. होईल तेवढं करा. त्यासाठीं प्राण नका आजच पणाला लावूं. मी तुम्हांला दरमहा दोनशें रुपये देत जाईन. चालेल ?”

“तुमचे दोनशें रुपये कितीसे पुरणार ? आम्हांला मोठा छापखाना काढायचा आहे. वर्तमानपत्र काढायचं आहे. किती तरी योजना, कल्पना आहेत. त्याला लाख रुपये हवेत. तें कांहीं नाहीं. आम्ही करणारच आमचा प्रयोग ! यश आलं तर खूप काम करूं. त्या साहसांत मरण आलं, तरीहि कृतार्थ होऊं. माशा मारीत बसण्यापेक्षां असं मेलेलं काय वाईट ?”

“विश्वास, निराशेमुळं तुम्ही हें करूं पाहात आहांत. जीवनाला तुम्ही कंटाळलां आहांत. आपल्या हातून एकदम कांहीं तरी व्हावं असं तुम्हांला वाटतं. हा अहंकार आहे. तुम्ही खरे क्रान्तिकारकच नाहीं. क्रान्तिकारक असा अधीर होत नाहीं.”

“तुमच्याशीं मला चर्चा करायची नाहीं. वाटेल तें म्हणा. परंतु पैसे द्या. द्याल का ? सांगा.”

“देईन पैसे. परंतु मी देवाची प्रार्थना करीन कीं तुमचा निश्चय बदलो. मी दुबळा आहें. तुला नाहीं म्हणायचं मला धैर्य नाहीं. तुमची निराशा मला बघवत नाहीं. माझं प्रेम तुमच्यावर आहे. परंतु हें प्रेम का मोह ? तुमच्या मोहांत पडून का मी तुम्हांला मदत करणार ? मला कांहीं सांगतां येत नाहीं. माझं जीवन म्हणजे ओढाताण. झगडा. स्वच्छ प्रकाशच नाहीं. ठीक. देईन पैसे. कुठून तरी देतों रक्कम. परंतु विश्वास, माझं तुला सांगणं आहे कीं नको कांहीं असं करूं ? माझ्याबद्दल तुला कांहींच का वाटत नाहीं ? शेवटीं मीच वाटतं तुमच्या इच्छेला सदैव शरण यावं ? एकदांहि तुमच्या मनांत असं कां येत नाहीं, कीं भाईजींची इच्छा प्रमाण.”

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel