“भाईजी, कपडे काढा ना.” संध्या म्हणाली.

भाईजींनीं कपडे वगैरे काढले. शौचमुखमार्चन त्यांनीं केलें. संध्येनें कपभर दूध दिलें.

“दूध कशाला मला ?” ते म्हणाले.

“घ्या हो. हल्लीं विश्वासला दूध येतं.”

“कोण पाठवतं ?”

“त्याच्या घरीं डेअरी आहे.”

“परंतु दूध कोण पाठवणार ?”

“भाईजी, माझी आई सावत्र असली, तरी सख्ख्या आईहून माझ्यावर तिची माया आहे. ती पाठवते दूध. त्या दिवशीं वडिलांच्या नकळत मला आंबेहि तिनं पाठवले. गोड गोड आंबे. मी एक आंबा एक तासभर खात होतों. आईचं प्रेम पाहून मी उचंबळलों होतों.”

“तुझ्या कोमल भावना तूं मारून ना टाकल्या आहेस ?”

“आजारीपणांत त्यांना पुन्हां पल्लव फुटले आहेत.”

विश्वासला खालीं शौचाला जायचें होतें. तो उठला तों एकदम झोंक गेला.

“विश्वास, थांब; मी तुला घरून नेतों.” भाईजी म्हणाले.

“मी जाईन हळूहळू. मला नाहीं धरलेलं आवडत.” तो म्हणाला.

“इथं आवडनावड कसली आहे, विश्वास ? तूं अगदीं हट्टी आहेस;   थांब.” भाईजी म्हणाले.

परंतु विश्वास निश्चयी स्वरांत नको म्हणाला. तो एकटाच गेला. भाईजी खिन्न होऊन तेथें बसले. थोडया वेळानें ते संध्येला म्हणाले:

“संध्ये, कल्याण, बाळ वगैरे सारे कुठं गेले आहेत ?”

“ते त्या कामासाठीं गेले आहेत. तुम्हींहि त्यांना पैसे दिलेत. होय ना ? भाईजी, पुढं काय काय होईल ?”
“संध्ये, तूं कल्याणला जाऊं कसं दिलंस ? त्याला धरून कां ठेवलं नाहींस ? तुझ्या अश्रूंनीं त्याला खेंचून ठेवलं असतं. तुझे अश्रूहि का दुबळे ठरले ?”

“भाईजी, मीं शांतपणें निरोप दिला. माझ्या मोहांत का मी त्यांना अडकवूं ? त्यांच्या ध्येयाकडे त्यांना जाऊं दे. घरीं त्यांचा रोज कोंडमारा होतो. जवळ पैसे नाहींत. क्रान्तीचं काम वाढत नाहीं. कुठून आणायचे पैसे ? माझ्या अश्रूंचीं माणिकमोतीं झालीं असतीं, तर कल्याण जाता ना. परंतु अश्रु ते अश्रु. गरीब बिचारे अश्रु. ते कल्याणलां कसे रोखूं शकणार ? जाऊं दे कल्याणला. भाईजी, तुम्ही वाईट नका वाटून घेऊं. जें जें होईल तें तें मीं सारं समाधानानं सहन केलं पाहिजे. मीं वाईट वाटून घ्यायचं सोडून दिलं आहे. मग तुम्ही कां वाईट वाटून घेतां ? तुम्ही आतां इथंच राहा. पोटांत बाळ वाढत आहे. मला कधीं भीति वाटते. कसं होईल असं वाटतं. आशानिराशांचा खेळ सुरू आहे. तुम्ही इथं राहा. तुम्ही जाऊं नका. माझं बाळ पाहून मगच तुम्ही जा. तुमच्या हातांनीं त्याला पाळण्यांत घाला. तुम्हीच त्याचं नांव ठेवा. हें काय भाईजी, तुम्ही कांहींच कां बरं बोलत नाहीं ? तुम्हीहि संध्येवर रागावलेत ?”

“संध्ये, तूं आपण होऊन कल्याणला जायला परवानगी दिलीस ?”

“होय भाईजी; मीं खरंच परवानगी दिली. संध्येशीं लग्न लागण्यापूर्वीच कल्याणचं क्रान्तीशीं लग्न लागलेलं आहे. मी कल्याणची आवडती असलें, तरी पट्टराणीचा मान माझा नसून क्रान्तिदेवाचा आहे.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel