“कल्याण, ठेव हो बांधून तें सारं. संध्या व मीं दोघांनीं बसून तीं स्वप्नं तयार केलीं. ते आशेचे मनोरे बांधले. संध्या म्हणायची, “भाईजी, मला दुसरं कोण आहे ? आपणच सारं करून ठेवायला हवं.” किती हळुवार हृदयानं, हळुवार बोटांनीं व भावनांनीं ती तीं आंगडींटोपडीं शिवीत बसे. तीं दुपटीं शिवीत बसे. आणि या चिमण्या मीं केल्या, मीं शिवल्या. आतां “हंस रे माझ्या मुला” गाणं मी कोणाला म्हणूं ? कोणाला पाळण्यांत घालूं ? कोणाला नांव ठेवूं ? कल्याण, मी दुर्दैवी आहे. मी जिथं जाईन तिथं का असंच व्हायचं ? माझ्या निराशाच का मी सर्वत्र वाटणार, पेरणार ? मी अभागी कशाला इथं आलों, कशाला राहिलों ? माझ्या हाताला यश नाहीं हें मला माहीत होतं. त्या करंटया हातांनीं मी चिमण्या करीत बसलों, संध्येचं बाळ त्या हातांनीं आंदळणार होतों. परंतु देवानं आधींच दोरी तोडली. बाळाच्या आयुष्याची दोरी. अरेरे ! असा कसा हा देव ? संध्येच्या ट्रंकेच्या कोप-यांत तो देव आहे. खरोखरच का ट्रंकेंत एखादा बागुरडा, एखादं झुरळ असावं त्याप्रमाणं कोंप-यांत पडण्याच्या लायकीचा हा देव आहे ? आमच्या सा-या आशांचा तो असा खेळखंडोबा कां करतो ? संध्येचीं स्वप्नं का पापी होतीं ? मातृत्वाचा तो परम पवित्र आनंद, तें सात्त्वि समाधान, त्यांत काय वाईट होतं ? परंतु देवानं त्यांतहि विष कालवलं. अरेरे ! कशी श्रध्दा राखायची, कांहीं समजत नाहीं. सारं जीवन अशा वेळीं अर्थहीन, सारहीन वाटतं. एक कठोर निर्माती विश्वाचा जणूं खेळ करून राहिली आहे ! त्या वैश्विक प्रेरणेला ना भावना, ना कांहीं. तो विश्वाचा कायदा केवळ यांत्रिक आहे. कुणाची पर्वा न करतां तो चालला आहे. नवोढेचा पति मारून तिला तो विधवा करीत आहे; नवमातेचं मूल नेऊन तिला तो रडवीत आहे; लहान मुलांचे आईबाप मारून त्यांना तो पोरकं करीत आहे; मित्रांपासून मित्रांची ताटातूट करीत आहे. कठोर सृष्टीचं कठोर शासन. सारं एकंदरींत फोल आहे. एका क्षणांत सारं नाहींसं होतं. आम्हीं मनोरथ बांधावे, मनोरे रचावे; आणि एकदम कोणी हुकूमशहा येतो व विकट हास्य करीत हें सारं जमीनदोस्त करतो. कल्याण, काय बघत बसलास तें ? ठेव बांधून. आटप.”

भाईजींचे शब्द ऐकून कल्याणचे अश्रु थांबले. तो अधिकच दु:खगंभीर झाला. त्यानें तें गांठोडे बांधलें. ट्रंकेंत आणखी कपडे भरण्यांत आले. भाईजींनीं ट्रंक उचलली व ती घेऊन ते चालले. जणूं ती आशांची, मनोरथांची, सुखस्वप्नांची तिरडीच ते घेऊन जात होते ! अत्यन्त दु:खानें ते जात होते. परंतु वाटेंत त्यांच्या मनांत शेंकडों विचारांची गर्दी उसळली होती. श्रध्दा पुन्हां येऊं पाहात होती. वसिष्ठाचीं शंभर मुलें मारली गेलीं तरी त्याची मांगल्यावरची श्रध्दा अचल राहिली. किती तरी लोक, स्त्रीपुरुष, अनंत आपत्ति आल्या, तरी ईश्वरावर श्रध्दा ठेवतात. आणि संध्येचें एक नुकतेंच मूल जातांच मीं का त्या ईश्वराला झुरळ बनवावें, बागुरडा बनवावें ? ईश्वराचे त्यांतहि हेतु असतील. कल्याण, संध्या यांना त्यानें मोकळें केलें असेल ! डोक्यावर चळवळ आहे. कल्याण वगैरे सारे कदाचित् स्थानबध्द होतील. आणि संध्या मग कुठें जाईल, कुठें राहील ? त्या मुलाचें संगोपन कसें होणार ? आजच खाण्याची पंचाईत आहे. उद्यां आणखीच वाढेल. असे विचार भाईजींच्या मनांत आले. परंतु त्यांना ते आवडले नाहींत. ते त्यांनीं झडझडून दूर केले. मला ति-हाइताला हे विचार ठीक आहेत. परंतु आईबाप कितीहि दरिद्री असले, तरी त्यांना मूल नकोसें वाटत नाहीं. माता आपल्या प्रेमाचें पांघरूण त्याला घालते, आपल्या वात्सल्यानें त्याला नटविते. त्या लहान मुलामुळेंच तें दारिद्रयहि त्यांना सुसह्य होत असेल. दरिद्री पिता मुलाच्या तोंडावरील हास्य पाहून दारिद्रय विसरत असेल, क्षणभर स्वत:ची बाहेरची मानहानि विसरत असेल. संध्या व कल्याण यांच्या डोळयांसमोर त्या मुलाचा आनंद होता. त्यांच्या उभयतांच्या जीवनाला अधिक दृढतर रीतीनें बांधणारें तें प्रेमळ नवबंधन होतें. त्यांच्या जीवनवृक्षाला लागलेलें तें फूल होतें, तें गोड फळ होतें. त्यांच्या संयुक्त व एकजीव झालेल्या जीवनाचें तें मूर्त प्रतीक होतें. मूल म्हणजे पति-पत्नींच्या अभिन्न जीवनाची मंगल खूण, त्यांच्या समरस जीवनाची ती मनमोहन मधु-मधुर अशी मूर्ति ! दारिद्रयांतहि आनंद, प्रकाश, आशा यांचे किरण फेंकणारें तें लहान मूल म्हणजे नवीन सुरू झालेल्या संसारांतील बाल सूर्यनारायण ! भाईजींच्या मनांत परस्परविरोधी विचारांची गर्दी उडाली होती. त्या विचारतंद्रींत ते पुढेंच गेले. ज्या घरी तें सामान न्यायचें, तें घर मागेंच राहिलें !

अजून भाईजी कसे आले नाहींत म्हणून कल्याण, विश्वास, रंगा त्या नव्या घरीं वाट पाहात होते. शेवटी रंगा पाहायला गेला. तों भाईजी पुढें चालले आहेत ती ट्रंक घेऊन असें त्याला दिसलें.

“भाईजी !” रंगानें हांक मारली.

ते थांबले. रंगा धांवत आला. आपण पुढें आलों हें पाहून त्यांना त्या खिन्नतेंतहि हसूं आलें.

“द्या, मी घेतों ती ट्रंक.” रंगा म्हणाला.

“माझ्याजवळच ती असूं दे.” भाईजी म्हणाले.

दोघे आले. सामान सारें आणलें गेलें. सारे मित्र त्या नवीन घरीं त्या सामानाच्या पसा-यांत सुतक्यासारखे बसले होते.  तें सामान नीट लावावें असें कोणाच्याहि मनांत येईना. परंतु वयानें वडील भाईजीच उठले व आवराआवरी करूं लागले. मग सारेच लागले सामान लावायला. सामान लावून झालें. आणि बाहेर पत्र्यांवर आंथरुणें पसरून सारे बसले. आकाशांतील तारे त्यांच्याकडे पाहात होते.

“संध्या काय करीत असेल ? रडत असेल का ? तिच्या दु:खाला भाईजी, सीमा नाहीं. कोंवळया मनाची संध्या.” कल्याण म्हणाला.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel