“बघूं, आपण विचार करूं. नाहीं तर मी तुमचीं पत्रकं वांटीन. गांवोगांव चिकटवीन. भिंतींवरून, झाडांवरून, सर्वत्र लावीन. चीन देशांत सा-या सजीवनिर्जीव वस्तु प्रचार करीत असतात. विद्यार्थी, स्त्रिया, पुरुष, मुलं सा-यांच्या तोंडावर देशाचीं गाणीं, स्वातंत्र्याचीं गाणीं. त्यांच्या देशांतील भिंतींवरून सार्सापरिलाच्या रक्तदोषांतकाच्या जाहिराती नसतात; तर साम्राज्यशाहीच्या अंताचीं गाणीं लिहिलेलीं असतात. जपानचीं दुष्ट कृत्यें चितारलेलीं असतात. झाडांच्या बुंध्यावरून “जपानी सत्ता नष्ट करा” हे मंत्र चितारलेले असतात. विश्वास, आपल्याकडे तसंच केलं पाहिजे. मी जाईन असं करीत. परंतु मी एकटी जाऊं का ?”

“जा, भीति कसली ? क्रान्तिकारकाला भीति माहीत नसते.”

“विश्वास, अद्याप धैर्य होत नाहीं, परंतु धैर्य केलं पाहिजे.”

इतक्यांत भाईजी बाहेरून आले.

“काय चाललीं आहेत राजाराणीचीं बोलणीं ?” त्यांनीं हंसत विचारलें.

“भाईजी, तुम्ही जाणार ना आम्हांला सोडून ?” हरणीनें विचारलें.

“मी सोडून जाणार यांत आश्चर्य नाहीं. परंतु विश्वासहि तुला सोडून जाणार आहे. हें खरं का ?” भाईजींनीं विचारलें.

“हो, आज ना उद्यां सोडून जाणारच.” हरणी म्हणाली.

“मग लग्न कशाला केलंत ?” भाईजींनीं विचारलें.

“संपूर्णपणें एकमेकांचीं होण्यासाठीं. जगाच्या दृष्टीनंहि एकमेकांचीं होण्यासाठीं. भाईजी, तुम्ही संध्येला भेटून आलेत ?”

“नाहीं; उद्यां जाणार आहें. संध्येला भेटायला अद्याप मला धीर होत नाहीं.”

इतक्यांत विश्वासचे कोणी मित्र आले. विश्वास त्यांच्याबरोबर निघून गेला. कल्याण केव्हांचा बाहेरच गेला होता.

“हरणे, तुला मी काय देऊं ? माग. कांहीं तरी मजजवळ तूं माग. कांहीं तरी तुला द्यावं, असं वाटत आहे.”

“तुमचा आशीर्वाद द्या.”

“असलं शाब्दिक बोलणं नको.”

“मग काय मागूं, भाईजी ? न मागतां तुम्ही सारं देतच आहांत. काय द्यायचं तुम्हीं ठेवलं आहे ?”

“हरणे, माग ना कांहीं तरी.”

“मला रिस्टवॉच द्या. मला फार हौस आहे.”

“खरंच का हौस आहे ? देईन हो.”

“परंतु भाईजी, प्रेमाची भेट जपून ठेवावी लागते. तुमचं घडयाळ राहील का सदोदित मजजवळ ? वेळ आली तर विकूनहि टाकावं लागेल.”

“वीक. परंतु एक माझी आठवण तर राहील ?”

“भाईजी, दुस-या थोडया का आठवणी आहेत तुमच्या ?”

“तें कांहीं असो. मी देईन हो घडयाळ.”

इतक्यांत हरणीची एक मैत्रीण आली.

“भाईजी, मी बाहेर जाऊन येतें हं; तुम्ही कांहीं करूं नका हं; मी येईन लौकरच.” असें म्हणून हरणी गेली. आणि भाईजी एकटेच खोलींत होते. पुन्हां ते लौकरच एकटे निघून जाणार होते. त्यांचें नेहमीचें एकाकी जीवन पुन्हां सुरू होणार होतें. इतके दिवस या मित्रमंडळांत गेले. किती पटकन् गेले दिवस ! किती प्रसंग, किती स्मृति ! ते एकेक गोष्ट आठवूं लागले. त्या तरुण मंडळांत राहून तेहि मनानें जरा तरुण झाले होते. हंसूंखेळूं लागले होते. तेथें राहून त्यांचें कवि-हृदय पुन्हां थोडें जागें झालें होतें. परंतु आतां पक्षी उडून जाणार होता. त्यांना वाईट वाटत होतें. परंतु येथें आतां त्यांना राहवतहि नव्हतें.

दुस-या दिवशी ते संध्येकडे जायला निघाले. जाण्याच्या तयारीनें ते दारांत उभे होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel