देशांत स्वातंत्र्याच्या लढयाची टिप्परघाई चाचली होती; आणि भाईजी एके दिवशीं अकस्मात् सुटले ! आश्चर्य. त्यांच्यावर वॉरंट कसें बजावण्यांत आलें नाहीं ? ते कम्युनिस्टांचे मित्र आहेत असें का सरकारला वाटलें ? जोंपर्यंत कम्युनिस्ट लढा लढा म्हणून ओरडत होते, तोंपर्यंत भाईजी त्यांचे मित्र होते. परंतु भारताची मान उंच करणारा तेजस्वी स्वातंत्र्यसंग्राम सुरू असतां, त्या संग्रामाची ज्यांनीं टिंगल चालविली होती, त्यांच्याबरोबर भाईजी कसे राहतील ?

भाईजी सुटले. ते सर्वत्र हिंडूंफिरूं लागले. विश्वास नि कल्याण त्यांना भेटूं इच्छित होते. भाईजींचें मन आपण वळूं असें त्यांना वाटत होतें. परंतु भाईजींचा पत्ता त्यांना मिळेना. शेवटीं एकदां भाईजींना त्यांचा निरोप मिळाला. भाईजी भेटूं इच्छित नव्हते. देशांतील दिव्य बलिदानाचा उपहास करणा-यांना कसें भेटायचें ? देशार्थ मरणा-यांना “बरें झालें; पंचमस्तंभी मेले” असें जे म्हणतात, त्यांचें तोंड कसें पाहायचें ? श्री.महादेवभाई देवाघरीं जावोत, आचार्य भन्साळी प्रायोपवेशन करोत, महात्माजी आगाखान पॅलेसमध्यें तिळतिळ मरोत, तरीहि ज्यांना कांहीं वाटलें नाहीं, त्यांच्याशीं काय बोलायचें ? परंतु प्रेमळ भाईंजी ! ते शेवटीं भेटले. विश्वास नि कल्याण यांनीं त्यांच्याबरोबर खूपच चर्चा केली. शेवटीं भाईजी म्हणाले :

“कल्याण, तुमचं म्हणणं नाहीं रे मला पटत; आणि तुमचा दंभ तर मला चीड आणतो. तुम्ही स्वच्छ सांगा कीं, “आज आम्हांस ब्रिटिशांना दुखवायचं नाहीं.” उगीच लोकयुध्दाच्या थापा कां मारतां ? आपल्या देशांतील प्रांतिक स्वायत्तता ही काय किंमतीची आहे, तें पाहिलंतच. सिंधमधील थोर अल्लाबक्षांना क्षणांत मुख्य प्रधानपदावरून हांकलून देण्यांत आलं; आणि फझलुल हक्कांची तीच दशा. आपणांस काडीचं स्वातंत्र्य नाहीं. हिंदुस्थानची इतकी मानखंडना झाली नसेल. दु:खाचा पेला आज कांठोकांठ भरला आहे. थेंबहि अधिक मावायला जागा नाहीं. यश वा अपयश ! राष्ट्राची प्रतिष्ठा म्हणून कांहीं वस्तु आहे. लढतां लढतां कदाचित् काँग्रेस मरेल, नेस्तनाबूद होईल; परंतु हिंदी स्वातंत्र्यासाठीं लढतांना ती नष्ट झाली असा इतिहास म्हणेल. विश्वास, काँग्रेसपुढा-यांना सोडा अशा अर्जावर तुम्ही सह्या गोळा करतां. सह्यांच्या पाठीमागं संपाचा हातोडा-कोयता उगारलेला नसेल, तर या सह्यांना पै किंमतहि नसते, हें का तुम्हांला माहीत नाहीं ? साधे पगारवाढीचे प्रश्न असतात तिथं सह्यांचे अर्ज न पाठवतां तुम्ही संपाचं हत्यार उगारतां; आणि आज हें सह्यांचं कागदी थोतांड रे कुठून आणलंत ? हा सारा दंभ आहे. महात्माजींसारखे राष्ट्रनिर्माते कोंडले जातात, तरी तुम्ही एक दिवसाचाहि निषेध संप करीत नाहीं. देशांत चिमुरं होतात; आचार्य भन्साळी उपवास करतात; आणि आज महात्माजी दिव्य करीत आहेत. तरीहि तुम्ही स्वस्थ. जा तुम्ही. तुम्ही जणूं या देशाचे नाहीं; मी तुमचा सहकारी होतों, याची मला लाज वाटते. तुम्ही माझा उपयोग करून घेतलांत. तुमचं खरं स्वरूप मीं ओळखलं नव्हतं. काँग्रेसबद्दल तुम्हांला कधींहि आदर नव्हता. ते काँग्रेस सोशॅलिस्ट मला आदरार्ह वाटतात. तेहि मार्क्सवादी आहेत. परंतु रशियाचे ते गुलाम नाहींत. स्टॅलिनच्या धोरणावर त्यांनीं हिंदी धोरण लोंबकळत ठेवलं नाहीं. त्यांनीं काँग्रेसची कधीं अप्रतिष्ठा केली नाहीं. महात्माजींसारख्या जगद्वंद्य विभूतीची त्यांनीं कधीं टिंगल केली नाहीं. काँग्रेसची शक्ति वाढावी म्हणून ते झटले, झटतात. अहिंसेची मर्यादा सांभाळून ते लढत आहेत आणि तुम्ही जयप्रकाशांसारख्या थोर कार्यकर्त्यांविषयींहि “हे जपानला अनुकूल आहेत, यांना पकडा” असं बोलतां; तुम्हांला लाज वाटायला हवी. सरकारलाहि या काँग्रेसच्या लढयात जपानला अनुकूल असं कांहीं आढळलं नाहीं. परंतु तुम्ही वाटेल तें विष वमतां. एवढा तुमचा अध:पात कसा झाला ? आपला प्रतिस्पर्धी म्हटला म्हणजे मग वाटेल त्या मार्गानं, वाटेल तो प्रचार करून त्याला जमीनदोस्त करायचं अशी कम्युनिस्टी नीति असते असं मी ऐकत होतों. परंतु तें प्रत्यक्ष आज माझ्या अनुभवाला येत आहे. अरेरे ! विश्वास, कल्याण, मला माहीत आहे, कीं उद्यां तुम्ही माझ्या विरुध्दहि प्रचार कराल : “भाईजी बारगळले, ते बावळट आहेत, भावनाप्रधान आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय दृष्टि नाहीं, ते चंचल आहेत, फेंका त्यांना दूर,” वगैरे वाटेल तें बोलाल. ठीक. तुमचं कर्तव्य तुम्हांला. माझं मला. या स्वातंत्र्याच्या लढयांत माझा हा देह पडावा व या माझ्या मातीचं सोनं व्हावं अशी मला इच्छा आहे. मला तुमचा राग येतो. परंतु तरीहि प्रार्थनेच्या वेळीं “माझा कल्याण, माझा विश्वास, यांना सुखी ठेव; त्यांना निराश नको करूं.” अशी मी प्रार्थना करीत असतों. तुम्हीहि त्यागी आहांत. उद्यां तुम्हीहि देशासाठी मराल; परंतु आज मरायला येत नाहीं याचं वाईट वाटतं. आज भारतमातेची विटंबना चालली असतां तुम्ही स्वस्थ आहांत याचं वाईट वाटतं. आज भारतमातेसाठीं मरायला कोण उभं आहे ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel