तसेच मधूनमधून या परंपरेचे पुनरुज्जीवन होऊन डोळे दिपण्याइतकी ती चमकलेली दिसते.  इतकेच नव्हे, तर हा विजेचा झोत काही प्रसंगी खूप काळपर्यंत झगझगीत टिकून राहिलेला दिसतो.  जे जे नवे, ताजे असेल ते समजून घेण्याचा व ह्या नव्याचा जुन्याबरोबर (सगळ्या जुन्याबरोबर नसले तरी निदान जुन्यातले जे उपयोगी असेल, टिकाऊ वाटेल तेवढ्याबरोबर) मेळ घालण्याचा सारखा सतत प्रयत्न दिसतो.  पुष्कळ वेळा ते जुने बाह्य आकाराने प्रतीक म्हणून राहिलेले दिसते; परंतु आतील खरा गाभा संपूर्णपणे बदललेला असतो.  परंतु स्वत: प्राणमयी व सर्वत्र प्राणदायी अशी काही एक शक्ती सतत अस्तित्व व प्रगती टिकवून धरीत होती.  कोणती तरी एक प्रबळ अशी अंत:प्रेरणा अशा प्रकारे अस्पष्ट अशा कोणत्यातरी दिशेने या राष्ट्राला पुढे नेत होती.  जुने आणि नवे यांचा समन्वय करीत पुढे जाण्याची इच्छा मात्र सदैव दिसून येते.  या प्रेरणेमुळे, या इच्छेमुळे भारतीय जनता पुढे जात होती; बरेचसे जुने ठेवूनही नवीन आत्मसात करायला यामुळेच शक्य झाले.  या शतकानुशतकात एखादे स्वच्छ, स्पष्ट असे स्वप्न हृदयाशी धरून भारत जात आहे, असे दिसते का ?  ते स्वप्न अस्वस्थ व अशान्त झोपेतील कधीकधी बडबडही असेल.  परन्तु असे काही होते का ?  मला कळत नाही.  प्रत्येक राष्ट्राला वाटत असते की, विशिष्ट कार्यासाठी आपले अस्तित्त्व आहे, अमुक एक संदेश द्यायला आपण जगतो, जगत आहोत अशी श्रध्दा, असा एक विश्वास सर्वांना वाटत असतो.  आणि काही अंशी प्रत्येकाच्या बाबतीत ते खरेही असते.  मी हिंदी असल्यामुळे हिंदुस्थानजवळ असा काही उज्ज्वल संदेश आहे, ईश्वरदत्त कार्य आहे, या श्रध्देचा माझ्यावरही परिणाम झालेला आहे.  आणि मला असेही वाटते की, खंड न पडता भारतीय जनतेच्या हजारो पिढ्यांना विशिष्ट वळण देण्याची शक्ती जेथे आहे तेथे ती शक्ती कोणत्या तरी अक्षय व सामर्थ्यदायी विशालसंचयातून आली असली पाहिजे.  आणि त्या त्या युगात कमी होत जाणार्‍या स्फूर्तीला, चैतन्याला, प्राणमय तत्त्वाला पुन्हा तजेला देण्याची, पुन्हा शक्तिशाली करण्याची अद्‍भुत किमयाही त्या अक्षय संचयाजवळ असली पाहिजे.

असा एकदा सामर्थ्याचा अक्षय संचय होता का ?  आणि जर होता तर तो आज आटला आहे काय ?  का त्या विहिरीला गुप्त झरे असून त्यातून सदैव नवजीवन येत राहील, खूट भरून निघत जाईल ?  मग आजचे काय ?  आजही काही झरे नवे जीवन देत आहेत का ?  आपणास नवशक्ती देत आहेत का ?  आपण फार जुन्या मानववंशातले आहोत.  किंबहुना अनेक मानववंशांचे आपण मिश्रण आहोत.  इतिहासाच्या आरंभकालापर्यंत आपल्या वांशिक स्मृती जाऊन पोचतात.  आपल्या भारतीय जीवनाचा ऐन उमेदीचा काळ संपून आता काय तिसरा प्रहर किंवा त्याही पुढची संध्याकाळ झाली काय ?  म्हातारपणी थंड, निर्जीव, वांझ झालेले जीवन कसेतरी जगत असताना काही धडपड नको, नुसते निजून राहण्याची प्रबळ इच्छा असते, ती आपली गत झाली आहे का ?

जगातल्या कोणत्या देशातले लोक, कोणताही मानववंश जसाच्यातसा कायम राहात नाही.  त्याचे इतरांशी सारखे मिश्रण चालू असते, व हळूहळू मूळ रूप बदलत असते.  केव्हा केव्हा मूळ स्वरूपाचा सर्वस्वी लोप होऊन अगदी नव्या रूपाने उदय झाल्यासारखे दिसते किंवा केव्हा केव्हा त्या मूळ स्वरूपाचाच एक प्रकार झाल्यासारखे दिसते.  या रुपांतरामुळे नव्या जुन्याचा संबंध अजिबात तुटलेला आढळतो, किंवा कधी कधी नव्या-जुन्यामध्ये विचार व ध्येये यांच्या चैतन्यमय दुव्यांमुळे संबंध राहिलेला दिसतो.

दीर्घकाळ टिकलेली व चांगली नांदत असलेली संस्कृती हळूहळू किंवा एकदम नाश पावून तिची जागा एखाद्या नव्या जोमाच्या संस्कृतीने घेतल्याची उदाहरणे इतिहासात पुष्कळशी आढळतात.  अशी काहीएक चैतन्यशक्ती, सामर्थ्याचा काही एखादा गूढ उगम आहे की काय ?  की त्याच्यामुळे राष्ट्र किंवा संस्कृती जिवंत राहते व ती नसली तर म्हातार्‍याने तरुणाचे सोंग घेतल्यासारखे सारे निकामी होते ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel