बहुविध देशांतून जिकडे तिकडे जननसंख्येत घट होते आहे ह्या निरीक्षित घटनाचमत्काराचे कारण काय असावे ?  संततिप्रतिबंधक उपायांचा वाढता प्रसार व आटोपशीर नियंत्रण कुटुंब असावे अशी लोकांची इच्छा, यामुळे अंशत: हा परिणाम झाला असेल, पण तेवढ्याने जननसंख्येत एकंदरीत फार मोठासा फरक पडला नाही हे सर्वमान्य आहे.  आयर्लंडमधल्या लोकांचा धर्मपंथ कॅथॉलिक आहे, तेव्हा तेथे संततिप्रतिबंधक साधनांचा उपयोग क्वचितच होत असावा, पण तेथे जननसंख्येत घट होण्याला आरंभ इतर देशांच्या अगोदर झाला.  पाश्चात्य देशांतून लग्नाची वयोमर्यादा वाढली आहे हे एक कारण कदाचित देता येईल.  आर्थिक परिस्थितीतील काही कारणांचा या प्रकाराशी संबंध येत असेल, पण त्यांचा विचार करण्याइतकी ती महत्त्वाची नाहीत.  श्रीमंत वर्गापेक्षा गरीब वर्गात व शहरापेक्षा खेड्यांत, जननप्रमाणे अधिक असते हे प्रसिध्दच आहे.  समाजातला कोणताही विशिष्ट वर्ग संख्येने जितका लहान असेल तितके त्या वर्गाला आपले गुणप्रमाण, समाजातली आपली इयत्ता, वरची ठेवणे अधिक शक्य होते, आणि व्यक्तीला महत्त्वाची मानण्याच्या तत्त्वाचा जसजसा विकास होत जातो तसतसे वर्गाला किवां वंशाला दिले जाणारे महत्त्व संकोच पावते.  प्रोफेसन जे. बी. एस्. हाल्डेन यांचे मत असे दिसते की, समाजातील ज्या वर्गाची माणसे त्या समाजात स्तुस्त्य समजली जातात त्या वर्गाचे जननप्रमाण त्याच समाजातल्या इतर सर्वसामान्य लोकांच्या मानाने कमी असते असा नियम सुधारलेल्या बहुतेक समाजांतून आढळतो.  यावरून असे दिसते की, असले समाज, प्राणिशास्त्रदृष्ट्या स्थिर स्थितीत नाहीत.  खूप भावंडे असलेल्या कुटुंबातून बुध्दिमत्तेचे प्रमाण कमी आढळते असा कार्यकारणसंबंध बरेच वेळा मानला जातो.  आर्थिकदृष्ट्या यश व प्राणिशास्त्रदृष्ट्या यश ही एकमेकांच्या अगदी उलट आहेत असाही एक समज प्रचलित आहे.

जननसंख्येत घट कशामुळे होते याची पुष्कळ किरकोळ कारणे सुचविली जातात खरी, पण महत्त्वाची कारणे काय आहेत याचे ज्ञान अद्यापही फार थोडे झालेले दिसते.  तथापि असेही संभवनीय आहे की, औद्योगिकरणाची खूप वाढ झालेले समाज ज्या प्रकारे ज्या परिस्थितीत आपले जीवन चालवतात, ते प्रकार व ती परिस्थिती त्यांच्यासारखी काही शारीरशास्त्रीय व प्राणिशास्त्रीय कारणे ह्या जननसंख्याक्षयाच्या मुळाशी दडलेली असावीत.  अयोग्य अपूर्ण आहार, दारूबाजी, मज्जातंतूंचे रोग, आणि शारीरिक किंवा मानसिक आरोग्य अगदी बेताबाताचेच, या सार्‍या गोष्टींचा परिणाम जननसंख्येवर होतो.  पण तसे म्हणावे तर रोगाने पोखरलेले, पुरेसे अन्न नाही म्हणून खंगलेले, हिंदुस्थानातल्यासारखे काही समाज पाहावे तर तेथे असे असूनही संख्या-वाढ अगदी वाढत्या वेगाने चालली आहे.  कदाचित असेही असेल की, आधुनिक जीवनक्रमात व्यक्तीवर पडणारा चौफेर ताण, हल्लीच्या जीवनातील सततची चिंता व चढाओढ, यामुळे जननक्षमता कमी होत असेल.  मनुष्याला जीवनरस देणार्‍या धरतीमातेचा संबंध ह्या असल्या सार्‍या प्रकारच्या जीवनाने मनुष्याला पारखा होतो हेही एक महत्त्वाचे कारण बहुतकरून असावे.  अमेरिकेतसुध्दा पांढरपेशी वर्गापेक्षा शेतात राबणार्‍या लोकांची जननक्षमता दुपटीहून अधिक आहे.

एक असाही विचार येतो की, ज्या प्रकारची संस्कृती पाश्चात्य जगात प्रथम उदयाला येऊन तेथे पूर्णावस्थेला पोचून नंतर इतरत्र पसरली ती संस्कृती व विशेषत: तिचे प्रमुख अंग बनलेले नागरी जीवन यांत उत्पन्न झालेले समाज अस्थिर असतात, त्या समाजातले चैतन्य झरत जाते.  ह्या असल्या समाजातून जीवनाची नाना क्षेत्रांतून प्रगती होत असते खरी, पण त्या जीवनाची पकड ढिली होत जाते; ते अधिकाधिक कृत्रिम होता होता, त्याला ओहोटी लागून ते नाहीसे होण्याच्या पंथाला लागते.  उत्तेजक साधनांनी आवश्यकता वाढतच जात असते; झोपेकरिता किंवा इतर नैसर्गिक क्रियांकरिता औषधे जिव्हालौल्याचे क्षणिक सुख देऊन त्या तात्पुरत्या उत्साहापायी शरीराला क्षीणता आणणारी खमंग खाद्ये व पेये, आनंदाच्या उत्साहाचा तात्पुरता आभास निर्माण करण्याकरिता नाना प्रकारच्या युक्तियोजना, हे सारे येते-आणि हा सगळा कृत्रिम उत्साह ओसरून गेला की त्याच्या पाठोपाठ त्याची प्रतिक्रियाही येते.  मनुष्याला सारे जीवन रुक्ष व अर्थशून्य वाटू लागते.  ह्या संस्कृतीत कितीही डोळे दिपवणारा देखावा किंवा काही खरोखरीचेही साधले असते तरी एकंदरीत आपण काढलेल्या ह्या संस्कृतीच्या नाण्यात काही खोटेपणा आला आहे, ते नीट वाजत नाही, कृत्रिक वाटते.  आपण कृत्रिम खताने पोसलेले कृत्रिम अन्न खातो आहोत, कृत्रिम भावनांत रंगतो आहोत, मानवी व्यवहारात औपचारिकपणापलीकडचे अंतरीच्या जिव्हाळ्याचे संबंध आलेले क्वचितच आढळतात. आजकालच्या जगाचा एक नमुना म्हणजे जाहिराती; त्यांचे ते अष्टौप्रहर कर्कश आवाजात आपल्याला फसविण्याचे, आपली बुध्दी बोथट करून सोडण्याचे, आपल्याला न लागणारा, एवढेच नव्हे तर आपल्याला अपाय करणारा मालसुध्दा आपल्या गळ्यात बांधण्याचे प्रयत्न सारखे सुरूच असतात.  ही अवस्था झाली आहे ह्याबद्दल मी इतरांना दोष देऊन मोकळा होत नाही.  आपण सारेच या युगधर्मानुरूप बनलो आहोत, आपल्या पिढीचे गुणावगुण सार्‍यांचेच अंगी बाणले आहेत, त्याबद्दल होणार्‍या निंदास्तुतीत सर्वांचाच वाटा येतो.  ज्या ह्या संस्कृतीतील गुणांची स्तुती व अवगुणांची निंदा मीच करतो आहे त्या संस्कृतीचा इतरांच्याइतकाच मीही वाटेकरी आहे.  माझ्या सवयी, माझ्या विचारांची दिशा त्या संस्कृतीला अनुरूप अशीच बनलेली आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel