एक दिवस माणसामधला माणूस होऊन जगेन म्हणतो
मानवतेच्या मारेक-यांशी इथे विद्रोह करेन म्हणतो....

डोळ्यांवर पट्टी बांधून ते खोटा इतिहास लिहितात
कुठल्या कुठल्या अधर्मासाठी देवा तुझे अवतार होतात

रणांगणावर निशस्त्र कर्ण कपटानं मारला जातो
आणि या कृष्णलीलेचा चोहीकडे जयजयकार होतो

स्वतःला गाडून सीता पावित्र्याची परीक्षा देते
आणि तिचा राजा नवरा मर्यादापुरुषोत्तम ठरतो

एकलव्याची गुरुभक्ती त्याचा अंगठा कापून देते
द्रोणाचार्याची शिष्यवृत्ती जरा घरंदाजच असते

क्रांतिकारक तुकाराम जन्मभर कर्मकांडाशी लढतो
आणि पुन्हा तोच सदेह वैकुंठाला कसा जातो?

शिवरायांनी काय केलं काय दिलं हा मुद्दा गौण ठरतो
त्यांचा जन्म केव्हा झाला हाच मोठा प्रश्न पडतो

मी असेन तेली माळी साळी कोळी
धनगर सनगर महार किँवा मराठा
पण मी त्या बळीराजाच वंश आहे
माझा नेमका हाच इतिहास मी विसरतो
पुन्हा वामनाकडून एक बळी मारला जातो

आणि याचसाठी मी इथे विद्रोह करेन म्हणतो....

पोर जन्मा आली म्हणून आजही यांच कुळ बुडतं
पण त्याच माऊलीपोटी कुणाचतरी कुळ वाढतं

फुल्यांची सावित्री वेडी म्हणून दगड शेणाचा मार खाते
मनुस्मृतीच्या दलदलीत शिक्षणाचा वड लावते
इथे मात्र आजची स्त्री सत्यवानाची सावित्री जवळ करते
पण या ख-या सरस्वतीची तिला जाण नसते

हिँदूकोड बिलाचं कोडं एकाएकी सुटत नाही
इथल्या राज्यकर्त्यांना ते हळूहळू सुटत जातं
साधं नामांतरही येथे शेकडोँचा जीव घेतं

ध्यानस्थ ज्वालामुखी सारखं १६ वर्षँ पेटत राहतं

साधुवाण्याचा किस्सा अगदी इत्तंभूत खरा वाटतो
पण कसोटीवर उतरलेलं रिडल्स मात्र पटत नाही

धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यघटना सर्वाँची होते
राज्यघटनेचा बाप दलितांशिवाय कुणाचा होत नाही

मानवतेचा पाईक मी इतका कसा कृतघ्न होतो
आणि याचसाठी मी इथे विद्रोह करेन म्हणतो.....

इथं संघाने फक्त भेदभावच शिकवला जातो
हिरव्या निळ्या झेंड्याखाली माणूस माणूस वाटला जातो

मागेही तेच घडलं आताही तेच घडतय
वर्णव्यवस्थेच जुनच व्यसन पुन्हा नव्याने जडतय

ते मला शिकवून जातात हिँदुत्व म्हणजे काय ते
पण प्रश्न माझ्या भाकरीचा जसा होता तसाच राहतो
एकाच रंगाच्या रक्तासाठी धर्म धर्म पेटून उठतो
डिवचणारा पुढारी मात्र झेडप्लसमध्ये सुरक्षित राहतो

ते म्हणतात हाच देव आहे ते म्हणतात हाच धर्म आहे
आमचं निमूट ऐकायचं एवढच तुमच कर्म आहे
पण तो माझा देव नाही जो रक्त मागतो आहे
तो माझा धर्म नाही जो जातपात सांगतो आहे

मी माणसात देव शोधेन म्हणतो, ते मात्र दगडासाठीच भांडत राहतात

ढवळ्या शेजारी पवळा बसतो वाण नाही पण गुण लागतो

अर्धच सत्य स्विकारुन आपण मात्र पंडित होतो

समतेच्या प्रेतयात्रेत निमूटपणे चालू लागतो

वाघिणीचा गर्भ येथे शेळीचं कोकरु होतो
आणि याचसाठी मी इथे विद्रोह करेन म्हणतो.....

माझी सत्यशोधक बुध्दी कधी कधी पेटून उठते
गुलामगिरीच्या पुस्तकातून महात्मा फुल्यांना भेटून येते

माझी राजमुद्रा सिँहाची अन् लेखणी तलवार आहे
हा जातीँचा सारीपाट नाही हा समतेचा एल्गार आहे

मी खूप लढेन खूप झिजेन पण हे चित्र नक्की बदलेन
भले तो दिवस पहायला मी असेन किँवा नसेन

पण जोवर जीव आहे तोवर समतेसाठीच लढेन म्हणतो
खोल काळजातल्या जातीयतेला पायाखाली ठेचेन म्हणतो

आणि याचसाठी मी इथे विद्रोह करेन म्हणतो
याचसाठी मी इथे विद्रोह करेन म्हणतो !!!!!

कवी - डॉ. आशिष विजय तांबे(मुंबई)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel