'म्युनिसिपालिटीचे दिवे लावणारे कृपाकाका ! परंतु सर्वांच्या जीवनात माणुसकीचे दिवे लावणारे ते थोर सद्‍गुरू होते.

'दिलमां दीवो करो' असे म्हणतात ते खरे. जीवनात प्रेमस्नेहाचा, व्यापक सहानु-भूतीचा, मंगलतेचा, श्रध्देचा, विश्वासाचा दिवा नसेल तर हे जीवन किती नीरस, भयाण वाटेल; नाही ? मुरारी, कृपाकाकांचा तो कंदील माझ्या खोलीत आहे. मी तो रोज पुसून ठेवते. जणू माझ्या देवाची तीच मूर्ती.'

'मिरे, आपण आता परत जाऊ चल. भरती सुरू झाली वाटते.'

'माझ्या हृदयातही प्रेमाच्या लाटा उचंबळत आहेत.'

'माझ्याही.'

'मुरारी, परदेशात मला विसरू नकोस. या गरीब मिरीचा तूच आधार आहेस. सुमित्रादेवी आहेतच; परंतु जीवनव्यापी संपूर्ण आधार तूच आहेस.'

'मिरे, तुझ्यावरचे प्रेम मला परदेशात तारील. मी तुला विसरेन का ? अशी शंका तरी तुला कशी येते ?

'तसे नाही रे मुरारी. एखाद्या वेळेस माझे सारे दुर्दैवी जीवन डोळयांसमोर येते नि वाटते की काही वाईट न होवो; अमंगल न होवो. मिळालेले आधार न तुटोत. तू सुखी राहा. तुझ्यासाठी मी प्रार्थना करीत जाईन. इकडची काळजी करू नकोस. तू मोठा हो, कीर्तिमान हो.'

'तुझ्या नि आईच्या प्रेमाला नि विश्वासाला प्रभू पात्र करो हीच त्याला माझी प्रार्थना.'

दोघे परत आली. आज मिरी यशोदाआईकडेच झोपली.
आणि एके दिवशी मुरारी आफ्रिकेला निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel