रामाचा शोक, संताप व विरहदु:ख यांचे अतिशय सुरस वर्णन रामायणात केले आहे. त्याने लक्ष्मणाला म्हटले कीं ’सीता नाही, आता मी अयोध्येला परत येतच नाहीं तेव्हां तूं परत जा.’ लक्ष्मणाने कशीबशी त्याची समजूत घातली. असे सुचेल त्या दिशेला दोघे भटकत असताना त्यांची अचानक कबंध नावाच्या राक्षसाशी गाठ पडली. हा महाबलवान, पण विकृत शरीराचा होता असे त्याचे वर्णन केलेले आहे. त्याने दोघानाही अचानक पकडले पण प्रसंगावधान राखून दोघांनी तलवारीने त्याचे दोन्ही हात तोडून टाकले. मरण्यापूर्वी त्याने सांगितले कीं रावण लंकेला आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत मिळवावी लागेल. त्यासाठी तुम्ही वानरराज सुग्रीवाला भेटा. तोही राज्यभ्रष्ट व पत्नीभ्रष्ट आहे तेव्हां एकमेकांना मदत करा.’ तो पांपासरोवरानजीक मतंगवनापाशी ऋष्यमूक पर्वतावर भेटेल अशी माहितीहि दिली. हा वेळ पर्यंत रामायणात वानर या समाजाचा उल्लेख केलेला नाहीं त्याअर्थी ते दक्षिण भारतातच असावे असें म्हणतां येईल. हा एक शाकाहारी व अन्न गोळा करणारा पण शेती करण्यापर्यंत प्रगति न झालेला, आर्यांपासून वेगळा, पण ’राक्षसां’प्रमाणे नरमांसभक्षक व यज्ञविरोधक नव्हे, असा बराचसा सुधारलेला मानवसमाज दिसून येतो. पुढे महाभारतकाळापर्यंत हा समाज बदलत जाऊन, आर्याच्यांत मिसळून गेलेला असावा त्यामुळे कोणाही वानरराजाचा उल्लेख महाभारतांत अजिबात दिसत नाहीं.
रामलक्ष्मण दक्षिण दिशेला गेले व पुष्कळ प्रवासानंतर मतंगवनापाशी पोंचले. पंपासरोवर, किष्किंधा वगैरे परिसर आज कर्णाटकांत असल्याचे मानले जाते. पंचवटीपासून येथपर्यंतचा प्रवास करण्यास राम-लक्ष्मणांना, दोन-अडीच महिने लागले असे दिसते. प्रवासांतील सर्व निसर्गवर्णनात वसंतऋतूचा उल्लेख जागोजागीं येतो. सीतेचे हरण माघ व. अष्ट्मीला झाले व सुग्रीवाची भेट होऊन पुढे वालीचा वध ग्रीष्मऋतूच्या शेवटी असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे रामसुग्रीव भेट ग्रीष्म अर्धापाउण संपल्यावर झाली असणार हे उघड आहे. तेव्हा फाल्गुन व चैत्र हे दोन महिने तरी नक्कीच प्रवासात गेले असे दिसून येते. कदाचित रावणहि याच सुमारास लंकेला पोंचला असेल!
मतंगवनात मतंग ऋषींच्या वेळेपासून रहाणारी शबरी यावेळी रामाला भेटली. तिने केलेल्या साध्या-सुध्या सत्काराचा रामलक्ष्मणांनी स्वीकार केला व मग ते पंपासरोवराकडे गेले. मतंगऋषींच्या शापामुळे वाली त्याच्या जवळपासहि फिरकत नव्हता म्हणून सुग्रीव व त्याचे सहकारी, हनुमान व इतर, तेथेच आसरा घेऊन रहात होते. त्याना भेटण्याचा रामाचा बेत होता.
येथे अरण्यकांडातील कथाभाग संपला. पुढील किष्किंधाकांडाची सुरवात राम-सुग्रीवांच्या भेटीपासून होते. ती पुढे पाहूं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel