राजपुत्र व त्याची पत्‍नी त्या पाषाणाची रोज पूजा करीत. प्रधानाचा मुलगा कोठे गेला कोणास समजेना. कोणी म्हणे राजपुत्राचे व त्याचे भांडण झाले, म्हणून तो देशांतरी निघून गेला. प्रधानाला दु:ख झाले, प्रधानपुत्राची पत्‍नी दु:खी झाली. म्हातार्‍या प्रधानाला सुनेचे दु:ख पाहवेना. शेवटी सून माहेरी गेली. ती रोज देवीची आराधना करी व म्हणे, 'आई, जगदंबे माझे कुंकू घरी आण, माझे चुडे अभंग ठेव. मी तुझी मुलगी. माझे सौभाग्य तुझ्या हाती. तू ते सांभाळ.'

काही दिवस गेले, काही महिने गेले. राजपुत्राला मुलगा झाला. परंतु तो आनंद टिकणारा नव्हता. मित्र का पुत्र हा प्रश्न होता. पुत्र आणखी होतील; परंतु असा मित्र मिळायचा नाही असा उभयतांनी विचार केला. राजपुत्र व त्याची पत्‍नी ते ताजे फूल, ते नवीन कोवळे मूल घेऊन दिवाणखाण्यात आली. दोघांनी हृदय घटट केले. राजपुत्राने मुलाला मारले व रक्ताची धार त्या दगडावर धरली. दगड खडबडून जागा झाला. मित्र मित्रासमोर उभा राहिला. समोर पाहातो तो मारलेले मूल, कुसकरलेले फूल, प्रधानपुत्राला वाईट वाटले, ते मुलाचे तुकडे त्याने रूमालात बांधून घेतले व म्हणाला, 'याला जिवंत करून आणीन, तेव्हाच तोंड दाखवीन.'

प्रधानाचा मुलगा निघाला. हातात ती मृत मुलाची मोटली होती. तो आपल्या सासुरवाडीस जावयास निघाला. पत्‍नीला भेटण्यासाठी पत्‍नीच्या माहेरी तो जात होता. गाव जवळ आला. प्रधानाच्या मुलाने ती मोटली एका झाडावर लपवून ठेवली व एकटा सडाच सासर्‍याच्या घरी आला. पती सुखरूप आला हे पाहून पत्‍नीस आनंद झाला; परंतु तो तिचा आनंद टिकला नाही. पती हसेना, बोलेना. पती दु:खी व कष्टी दिसत होता. आपले काय पाप आहे ते पत्‍नीला कळेना. आपल्यापासून पतीस सुख नाही तर कशास जगावे असे तिला वाटले. रात्री देवीच्या देवळात जाऊन जीव द्यावा असे तिने ठरविले.

प्रधानाचा मुलगा झोपेचे सोंग घेऊन पडला होता. तो खोटे खोटे घोरत होता ती साध्वी उठली व निघाली आपली पत्‍नी कोठे जाते ते पाहाण्यासाठी पाठोपाठ प्रधानपुत्रही निघाला. त्याची पत्‍नी देवळात शिरली व देवीला हात जोडून म्हणाली, 'आई जगदंबे! आजपर्यंत प्रार्थना ऐकलीस, माझा पती परत आणलास; माझे सौभाग्य सुखरूप आणलेस. परंतु आई! त्यांना मी नको. मला पाहून त्यांना आनंद नाही. त्यांना पाहून माझे हृदय उचंबळते, परंतु मला पाहून ते दु:खीच राहिले. ते हसत नाहीत, बोलत नाहीत. नीट खातपीत नाहीत. मी कशाला जगू? तुझ्या पायांवर डोके फोडते. मुलीला क्षमा कर.'

असे म्हणून ती साध्वी पतिव्रता डोके आपटणार, तो देवीने तिला पोटाशी धरले. देवी म्हणाली, 'बेटा, असे करू नकोस. हा वेडेपणा आहे. पतीला त्याचे दु:ख विचार. बोलल्याशिवाय, विचारल्याशिवाय कसे कळणार? त्यांचे काय दुखते खुपते, ते विचार. जा, त्यांचे दु:ख मी दूर करीन. उद्या त्यांना विचारून ये.'


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel