जन म्हणा हो श्रीहरि । प्रातःकाळीं स्मरण करी ।

तेणें तराल भवसागरीं । हा निर्धार भंरवसा ॥ध्रु०॥

वेद नेले निशाचरीं । मत्स्यरुप झाले हरी ।

कार्य ब्रह्मयाचे करी । शंखासुर वधोनियां ॥१॥

दैत्य मातले भूमंडळी । पृथ्वी नेली रसातळीं ।

कूर्मरुपी हो वनमाळी । पृष्ठीं धरिली मेदिनी ॥२॥

मही डळमळी पहा हो । देव झाले वराह हो ।

मग वधियेले दैत्य दानवो । पृथ्वी दाढे धरोनियां ॥३॥

पुत्र पित्यानें गांजिला । तो हा नरहरि स्मरता झाला ।

स्तंभीं अवतार धरियेला । भक्त रक्षिला प्रह्‌लादा ॥४॥

याग करितां झाला बळी । इंद्र कांपिन्नला चळचळीं ।

वामनरुपी हो वनमाळी । धाली पाताळीं बळीराजा ॥५॥

रेणुके उदरीं भार्गव झाले । राजे समस्त संहारिले ।

राज्य ब्राह्मणा दीधलें । सुखी केले भूदेव ॥६॥

सूर्यवंशी रघुनंदन । वानर सैन्य मिळवून ।

सागर पाषाणीं बांधून । संहारिलें राक्षसां ॥७॥

कारागृहीं अवतरले । श्रीकृष्ण गोकुळीं वाढिन्नले ।

कंसचाणूर मर्दिले । राज्य स्थापिलें उग्रसेना ॥८॥

बौद्ध अवतार धरियेला । जन हा बहुत कष्टी झाला ।

मग कलीस वरा दीधला । आपण राहिले निद्रिस्थ ॥९॥

पुढें कलंकी होणार । ऐसा शास्त्राचा निर्धार ।

मग फिरेल भवसंदेह । या हो विश्वजनाचा ॥१०॥

दशावतारांची भूपाळी नित्यस्मरा प्रातःकाळीं ।

दास म्हणे हो भूमंडळी भाग्यवंत होतील ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel