हो जागी प्रतिभे, सलील फिरवी वीणेवरी अंगुली

माझ्या आठवणीवरी तव मती गे पाहिजे रंगली !

होते सांज, करीत किल्‌बिल घरा येते विहंगावली

एकांती बसता तया परतुनी येतात चित्ती स्मृती

ती माझी सहधर्मिणी, सुगृहिणी माझी प्रिया मालती

तारुण्यातच ती कशी करपुनी गेली लता कोवळी ?

या वातावरणात काय फिरतो आत्मा तिचा मोकळा !

माघारा परतून आण; तुजला ती साध्य आहे कला !

झाले फुल मलूल, गंधलहरी हो लीन वायूमधे

पाहे हुंगुनि आसपास, भरुनी श्वासात आणी तिला

डोळ्यांला दिसते अजून हसरी मूर्ती तिची प्रेमला

आत्मा तीत तिचा भरुन, तिजला माझ्यासवे बोलु दे

कांते, ये हसितानने जवळ ये, संकोच का हा वृथा !

मृत्यूनंतर आपला न तुटला संबंध गे सर्वथा

जो षण्मासहि जाहले न करुनी संसार माझ्यासवे

काळाने तुज तातडी करुनि तो बोलावणे धाडिले

होते ऐहिक जन्मबंध जुळले ते सर्व झाले ढिले---

नाही आत्मिक भाव मात्र; मग का मी गाळितो आसवे ?

डोळे हे पुसितो, उगाच तुजला वाईट वाटेल ना !

ही स्वप्नातिल नित्य भेट न तुझी ना भासा ना कल्पना !

डोळे जाति दिपून, तेज किति हे आले अहाहा तुला !

सोन्याच्या पुतळीपरी उजळुनी आलीस तू मैथिली !

आला मंगल भाग्य-योग जुळुनी, की पर्वणी पातली !

देशी भेट फिरुन, खास तुझिया प्रेमास नाही तुला !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel