आटपाट नगर होते, तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनीं गौरी आणल्या. रस्तोरस्तीं बायका दृष्टीला पडूं लागल्या. घंटा वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरी आलीं. आईला सांगितलं, “आई, आई, आपल्या घरी गौरी आण.”

आई म्हणाली, “बाळांनो गौर आणून काय करूं? तिची पुजापत्री केली पाहिजे, घावन-घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर कांहीं नाहीं. तुम्हीं बाबांजवळ जा, बाजारांतलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.” मुलें तिथून उठलीं, बापाकडे आलीं “बाबा, बाबा, बाजारांत जा. घावन-घाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील.” बाबानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला

सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांच हट्ट पुरवत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जावं तर मिळत नाहीं. त्यापेक्षा मरण बरं. म्हणून उठला, देवाचा धंवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला, अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीणं भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या.

ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरांत गेली. आंबिलीकरितां कण्या पाहूं लागली, तो मडकं आपलं कण्यांनीं भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळींजणं आनंदानं निजलीं.

सकाळ झाली, तशी म्हातारीनं ब्राह्मणास हांक मारली, “मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग.” म्हणून म्हणाली, “घावनघाटलं देवाला कर नाहीं कांहीं म्हणूं नको. रड काही गाऊ नको.” ब्राम्हण तसाच उठला,घरात गेला. बायकोला हांक मारली, “अग अग ऐकलसं का? आजीबाईला न्हाऊं घाल” असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला.

बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलांबाळांसुद्धां पोटभर जेवलीं. म्हातारीनं ब्राह्मणाला हांक मारली. “उद्यां जेवायला खीर कर” म्हणून सांगितलं, ब्राह्मण म्हणाला, “आजी, आजी, दूध कोठून आणू?” तशी म्हातारी म्हणालीं, “तूं कांहीं काळजी करूं नको. आतां उठ, आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावीं बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नांवं घेऊन हांकां मार, म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ.” ब्राह्मणानं तसं केलं.

गाईम्हशींना हांका मारल्या त्या वांसरांसुद्धां धांवत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनीं भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं, दुसर्‍या दिवशीं खीर केली. संध्याकाळ झाली, तशी म्हातारी म्हणाली,“ मुला मुला, मला आतां पोंचती कर.” ब्राह्मण म्हणूं लागला, “आजी आजी, तुमच्या कृपेनं मला सगळ प्राप्त झालं, आतां तुम्हांला पोंचत्या कशा करूं? तुम्ही गेलां म्हणजे हें सर्व नाहीसं होईल.”

म्हातारी म्हणाली. “तूं कांहीं घाबरूं नको, माझ्या आशीर्वादानं तुला कांहीं कमी पडणार नाहीं. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच. आज मला पोंचती कर.” ब्राह्मण म्हणाला, “हें दिलेलं असंच वाढावं असा कांहीं उपाय सांगा.” गौरीनं सांगितलें, “तुला येतांना वाळू देईन. ती सार्‍या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टांक, पेटींत टाक, फडताळांत टाक, गोठ्यांत टाक. असं केलं म्हणजे कधीं कमी होणार नाहीं” ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली.

गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळीं जावं, दोन खडे घरीं आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशीं घावनगोडं, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवूं घालावं. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत संपत मिळेल.

ही सांठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, देवाच्या दारीं, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel