आणि एके दिवशी त्या पडवीत ते दोन्ही बैल मरण पावले. त्या स्वच्छ सुगंधी पडवीत त्या उमद्या व दिलदार प्राण्यांनी पवित्र वेदमंत्र ऐकत राम म्हटला. वामनभटजी रडत बसले. त्या बैलांना त्यांनी गडीमाणसे बोलावून वाशाला बांधून उचलून नेले. फरफटत नेले नाही. एका शेतात खोल खोल खड्डे खणून त्यांना त्यांनी मुठमाती दिली आणि पुढे काही दिवसांनी त्या ठिकाणी त्यांनी दोन आंब्याची झाडे लावली. मधून मधून त्या जागेला ते भेट द्यायचे. क्षणभर सदगदित होऊन बसायचे व निघून जायचे.

वामनभटजींच्या ओटीवर बैठकीच्या खोलीत तुम्हाला काय दिसेल? तेथे राजाराणीच्या तसबिरी नाहीत. कसली प्रशस्तीपत्रे नाहीत. ते गोंडे आहेत. त्या आठवणी, ती स्मृतीचिन्हे वामनभटजींनी ठेवली आहेत.

त्या गावात दुसरेही असेच एक एकटे गृहस्थ होते. त्यांची थोडी शेतीवाडी असे. तेही हाताने स्वयंपाक करीत. वामनभटजींना त्या गृहस्थांविषयी सहानुभूती असे. ते कधी कधी त्यांच्याकडे जायचे. तेथे चहा करायचे. स्वत: थोडा घ्यायचे व त्या मित्रासही द्यायचे. कधी उन्हाळ्याच्या दिवसात कच्ची कैरी किसायचे. तिच्यात गूळ, थोडे तिखटमीठ घालून त्या मित्रास द्यायचे व स्वत: खायचे. कधी आंब्याचे पन्हे करायचे. पावसाळ्याच्या दिवसात कोवळ्या कोवळ्या गराच्या अमृताप्रमाणे लागणा-या काकड्या दोघे खायचे. असा वामनभटजींचा व त्या गृहस्थांचा लोभ होता. त्या गृहस्थांचे नाव भाऊराव.

बैल मेल्यापासून वामनभटजी दु:खी होते हे भाऊरावांच्या ध्यानात आले होते. भाऊरावांना वेळ जायला कोर्टकचेरीचे वेड होते; परंतु त्यांच्या मित्राचा वेळ कसा जायचा? भाऊरावांकडे एक गाय होती. ही गाय वामनभटजींस द्यावी असे त्यांच्या मनात आले.

एकदा दोघे बोलत बसले होते. बैलांच्या आठवणी निघाल्या होत्या.

‘वामनभटजी, तुम्हाला एक गोष्ट सांगू?’

‘कोणती?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel