शेताची मशागत झाली , बी उत्तम पेरले , पाऊस चांगला पडला , आणि रोपही जोराने वर आले , तरी काम झाले असे नाही . कारण जसजशी एकेक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते . शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो ; एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील , किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल . यांपैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे , तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे . शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते , आणि त्यांना हाकलताही येते . पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल . शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो , आणि राख , शेण , औषधे , वगैरे टाकून , कीड न लागेल अशी तजवीज करता येते . हे सर्व करताना शेतकर्‍याला सतत जागृत राहावे लागते . म्हणजेच , एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते , हाच नियम परमार्थातही लागू पडतो . साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरुर आहे .

शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण , तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा . कुंपणालाच जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते . तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे . शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते , त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे . अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंतचे काम झाले . पण ‘ पीक हातात आले , आता काय काळजीचे कारण ? ’ असे म्हणून भागणार नाही . पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे . पुढे , दाणे दास्तानांत जपून ठेवले पाहिजेत ; नाहीतर उंदीर , घुशी , धान्य फस्त करतील . नंतर पुढे , जरुर लागेल तेव्हा ते कांडले पाहिजे . कांडतांनासुध्दा , दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते कांडले पाहिजे . अशा तर्‍हेने , आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरुकतेने वागले पाहिजे , तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल . नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे , आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले , तर प्रगती थांबेल . अशी उदाहरणे फार आढळतात . म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे . जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार ; पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे . आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो . खरोखर , परमार्थ ही कठीण शिकारच आहे . शिकार अशी मारली पाहिजे , की आपल्या मीपणाला मारुन आपण जिवंत राहिले पाहिजे , आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel