महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे म्हणजे दाभाडे घराणे. मराठी अंमलात या घराण्यातील पुरूषांनी पराक्रम दाखवून सन्माननीय पदे मिळविली. या घराण्याचे मूळ पुरुष बजाजी हे  पुण्याजवळील तळेगावचे पाटील होते. त्यांचा मुलगा येसाजी हा शिवाजी महाराजांचा हुजऱ्या म्हणून काम करीत असे. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी  त्यास रायगडावर ठेविले. पुढे संभाजी यांच्या  औरंगजेब याने केलेल्या क्रूर हत्येनंतर नंतर ते राजारामा यांच्या बरोबर जिंजीस गेले. त्यांच्या सोबत त्यांची दोन मुले खंडोजी आणि शिवाजी ही होती. 

त्यांपैकी पैकी खंडोजी हे पुढे सेनापती म्हणून प्रसिद्धीस आले.  त्यांची  जिंजी येथील एकनिष्ठ सेवा लक्षात घेऊन राजारामा यांनी  त्यांना दाभाडे गाव इनाम दिले. जिंजीहून परत येताना राजारामा यांचा  कबिला त्यांनी  महत्प्रयत्नाने पन्हाळ्यास पोहोचविला. या कामगिरीबद्दल राजारामा यांनी त्यांना सेनाखासखेल ही पदवी आणि काही गावे इनाम दिली. 

राजारामांनंतर शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर खंडेराव शाहूस. १७१६ मध्ये शाहू यांनी खंडेरावास सेनापतिपद देऊन चाकण आणि पारनेर येथे दोन मोठ्या जहागिऱ्या दिल्या. खंडेराव यांनी  बाळाजी विश्वनाथ यांना सहाय्य केले. उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतावर नजर ठेवावयास त्यांना  नेमले होते.


खंडेराव यांच्या मृत्यूनंतर शाहू यांनी त्रिंबकरावास सेनापतिपद दिले;  परंतु बाजीरावाच्या काळात त्रिंबकराव दाभाडे हे नेमून दिलेल्या कामगिरीपासून थोडे निराळेपणाने वागू लागले. त्याचे आणि बाजीरावाचे फारसे सूत जमले नाही. त्रिंबकरावाचा निजामास जाऊन मिळण्याचा विचार होता. तेव्हा बाजीरावास त्रिंबकरावाशी लढाई करणे भाग पडले त्यात त्रिंबकराव मारला गेला. ही डभईची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

त्रिंबकरावाच्या मृत्यूनंतर उमाबाई दाभाडेला फार दु:ख झाले. तेव्हा शाहू १७३१ मध्ये बाजीरावा यांचेसह  उमाबाई यांना भेटण्यासाठी तळेगाव येथे गेले आणि उमाबाई यांचि समजूत काढून त्रिंबकराव यांचा भाऊ यशवंतराव यांना  त्याने सेनापतिपदाची वस्त्रे दिली. तसेच पिलाजी गायकवाड यांना  दाभाड्यांचा कारभारी म्हणून नेमण्यात आले.

उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरुद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदेत ठेविली.  परंतु उमाबाईने पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले.

यशवंतरावाचे लग्न १२ मे १७५२ या दिवशी शितोळे देशमुखांच्या मुलीशी झाले. त्या वेळी दाभाड्यांचे आणि पेशव्यांचे सलोख्याचे संबंध दिसून आले. नोव्हेंबर १७५३ मध्ये उमाबाई कालवश झाली आणि पुढे १७५४ मध्ये यशवंतराव मरण पावला. यशवंतराव हा व्यसनाधीन असल्यामुळे गायकवाडास राज्यकारभारात पुढे येण्यास वाव मिळाला. यशवंतरावाची मुलगा दुसरा त्रिंबकराव यास सेनापतिपद देण्यात आले;  परंतु आता या पदाचे फारसे महत्त्व उरले नव्हते. १७६६ मध्ये वेरूळ मुक्कामी त्रिंबकराव मरण पावला.
 
दाभाड्यांचा आणि पेशव्यांचा मुख्य झगडा होता तो गुजरात प्रांताच्या मोकाशासंबंधी. गुजरातेत सेनापती दाभाड्याची स्थापना झाली, तेव्हा शाहूने गुजरात प्रांताची निम्मी मोकासबाब चिमणाजी बल्लाळ याजकडे व निम्मी त्रिंबकराव दाभाडे याजकडे पाठवावी, असा ठराव करून दिला; परंतु पुढे सेनापतीनी तो पाळला नाही. 

गुजरातवरील निम्मा हक्क पेशव्यांनी कधीही सोडला नाही. त्यामुळे कलह निर्माण होऊन त्यात दाभाड्यांना अपयश आले. त्रिंबकराव दाभाड्यांनंतर फारसा कर्तबगार पुरुषही त्या घराण्यात निपजला नाही. अशा तऱ्हेने दुसऱ्या त्रिंबकरावाच्या मृत्यूनंतर हे घराणे पेशवाईत अथवा मराठ्यांच्या इतिहासात पुन्हा उर्जितावस्थेस आले नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel