'देव' ही संकल्पना माणसानं आपल्या एकटेपणावर, अचानक कोसळणाऱ्या संकटांवर मात करण्याचं बळ मिळावं, आपलं दु:ख हलकं करण्यासाठी एक मानसिक आधार हवा म्हणून निर्माण केली. त्याचा तितपतच महत्त्व देणं ठीक. परंतु पुढे त्याचं अवडंबर माजवून काहींनी त्याचा धंदा मांडला, काहींनी तर त्याच्या भीतीनं इतरांचं शोषण, लुबाडणूकच सुरू केली. संकटसमयी देवाचा धावा करून त्याद्वारे त्या संकटाशी सामना करायची शक्ती मिळवणं ठीक; परंतु त्याचं परावलंबित्व पत्करून, त्याच्या नसलेल्या अस्तित्वावर भार टाकून आपलं भवितव्य त्याच्या स्वाधीन करणं कितपत योग्य?

मी एक मध्यमवर्गीय, शहरात वाढलेलं माणूस आहे. ब्राह्मणी मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या सर्वसामान्य धार्मिक रूढी-परंपरा, व्रतंवैकल्यं यांच्या संस्कारांत मी लहानाची मोठी झाले. एवढंच नाही तर जवळपास निम्मंअधिक आयुष्य या सगळ्याचं मी परिपालन आणि जतन करत राहिले. त्यानंतर मात्र माझ्यात काहीतरी बदलवणारी प्रक्रिया सुरू झाली. त्यातून मी आज इथवर पोहचले आहे की, आता मी देव मानत नाही, धर्म मानत नाही. विषमता आणि अंधश्रद्धा जोपासणाऱ्या कर्मकांडांपैकी मी काहीही करत नाही. हा माझा व्यक्तिगत प्रवास आहे. त्याची बढाई मारण्या/ मिरवण्यासाठी मी तो तुमच्यापुढे ठेवलेला नाही. माझ्यापेक्षा वेगळ्या विचाराने आयुष्य जगणाऱ्या माणसांपर्यंत मला पोहचायचं आहे. देव, धर्म, अंधश्रद्धा यामुळे होणारी दिशाभूल, फसवणूक, शोषण, विवेकबुद्धीचा ऱ्हास आणि त्यापायी उद्ध्वस्त होणारी माणसांची आयुष्यं याची मला काळजी वाटते. त्यासाठी त्यांना समजावून घेत, त्यांच्याशी संवाद होण्याची मला गरज वाटते.

मला हेही सुरुवातीलाच सांगायला हवं की, देवाधर्मातल्या काही गोष्टी फारशा उपद्रवी किंवा हानीकारक नाहीत आणि म्हणून त्या करायला हरकत नाही असं मला वाटतं. मात्र, त्या करताना आपण त्या नक्की का व कशाकरता करतो आहोत, याचा स्पष्ट आणि प्रामाणिक विचार आपल्या ठायी जागा हवा. हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ- देवपूजा. माझ्या घरात देव नाही आणि मी देवाच्या दर्शनालाही जात नाही. पण कुणाच्या घरी देव असले, त्याची नेमानं किंवा सोयीनं पूजा होत असली, त्यासाठी देवाला वाहिलेल्या फुलांचा आणि उदबत्तीचा सुगंध दरवळत असला, देवापुढे बारीक रेघांची सुरेख रांगोळी घातली गेली तर त्यामुळे माणसाचं मन आणि वातावरण प्रसन्न होऊ शकतं असं मलाही वाटतं. अशा पूजेत एखादा मित्र समजून जिवाभावाच्या गोष्टी, मनातल्या दुखावणाऱ्या किंवा सुखावणाऱ्या भावना बोलत देवाशी केलेला केवळ संवाद हीसुद्धा एक छान गोष्ट असेल. याच्या पलीकडे देवाकडून बऱ्या-वाईट घटनांबाबत काही कृती घडेल, तो त्यांना अटकाव करेल, किंवा आपल्या उत्कर्षांला तो गती देईल, अशी काही अपेक्षा मनात न ठेवता जर देवाशी असा संवाद होत राहिला तर कोणत्याही औषधोपचारांच्या बरोबरीने तो स्वास्थ्यासाठी एक परिणामकारक उपचार ठरू शकेल. मन मोकळं करण्यासाठीची ती एक स्वत:ची स्वाधीन जागा असेल. देवपूजा करण्याबाबतचा मला वाटणारा धोका एवढाच आहे की, देव आपलं बोलणं ऐकून घेतो, याचा अर्थ त्यावर उपाययोजना करणाराही तोच आहे, असा एक विश्वास मनामध्ये घर करू लागतो. आता बघा- देवाची मूर्ती तर माणूसच घडवतो. आपणच खर्च करून ती विकत घेतो. घरात आणून देव्हाऱ्यात ठेवतो. अशावेळी ही मूर्तीच आपल्या आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या-वाईटाची निर्मिती आणि तारकर्ती आहे, हे कसं मान्य करायचं? एकदा या देवशरण भावनेनं आणि भक्तीनं देवाच्या घरात प्रवेश झाला, की मग सगळं संपलंच! खरं तर ती केवळ एक मूर्ती! आपणच तिची प्रतिष्ठापना केली. तिला ना दिसत, ना ऐकू येत. ना तिच्यात जीव असतो! याचा आपल्याला विसर पडून कसा चालेल?

आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, जोपर्यंत आपलं रोजचं रहाटगाडगं नीट चालत असतं तोपर्यंत देवाची आणि आपली कसोटी लागतच नाही! पण कोणतंही संकट आले, अपयश आलं की त्याचं निवारण देव करील असं वाटणं मात्र घातक आहे. कारण त्यात परावलंबित्व आहे. समजा- आपल्याच व्यावहारिक प्रयत्नांतून आपण संकटातून पार पडलो आणि तरी त्याचं श्रेय कुणी देवाला दिलं तर दिलं! मला काही त्यासाठी देवाचा हेवा वाटणार नाही. पण आपण आटोकाट प्रयत्न करूनही, देवाला साकडं वगैरे घालूनही व्हायचं ते विपरीत घडलंच, तर मग स्वत:ची समजूत कशी घालायची? देवाला आधार मानून त्याच्यावर सगळा भार टाकला आणि संकटनिवारण झालं नाही तर..? जो खरा आधार नाहीच, त्याचाच आधार घेतला तर आपण पडणारच! देव मानून त्यावर विसंबल्यामुळे येणाऱ्या परावलंबित्वाचा धोका फार कोसळायला लावणारा आहे. कारण देवामुळे परावलंबनाची सवय लागली तर स्वत:च स्वत:ला सावरण्याची सवयच नाहीशी होते! त्यापेक्षा भल्या आणि बुऱ्या दोन्ही अनुभवांना सामोरं जाण्याची ताकद मिळवत राहणं, आपल्या निर्णयांची, आपल्या वागण्या-राहण्याची, त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची सवय करणं, हा अधिक भरवशाचा मार्ग आहे, असं नाही वाटतं?

यावर कुणी म्हणेल की, इतका विचार करण्याचा खंबीरपणा कुठे सगळ्यांकडे असतो? मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, आपण स्वत:ला वगळून इतरांना सामान्य माणसं म्हणतो आणि त्यांच्या विचारशक्तीला कमी लेखतो. प्रत्यक्षात आपली ‘चूप बसा’ संस्कृती आपली जिज्ञासा, उत्सुकता यांना वाव न देता खुरटवून टाकते! विशेषत: देव, धर्म, संस्कृती यासंबंधीच्या शंका, प्रश्न विचारणं हा आपल्याला उद्धटपणा वाटतो. देव आणि धर्म यांचं स्थान आपल्यावरच्या संस्कारांतून मनात घट्ट रुतून बसलेलं असतं. त्यांचीच भीती दाखवत आपण मुलांना आणि सगळ्यांनाच चांगलं वागायला सांगतो. माझी एक मैत्रीण सांगत होती की, तिच्या माहेरच्या घरात देवाधर्माचं काहीच प्रस्थ नव्हतं. लग्नानंतर सासरी मात्र देव-देव करीत बऱ्याच गोष्टी करायला लागल्या! ती साऱ्या गोष्टी करत होती. पण त्यामागचं कारण मनात भीती निर्माण झाली. अमूक एक गोष्ट केली नाही तर देवाचं काहीतरी बिनसेल, या भीतीपोटी ती सारी कर्मकांडं मुकाटय़ाने करते आहे! माझ्या मनात आलं- ज्याची भीती वाटते त्याची भक्ती कशी करता येईल?

सर्वसामान्य माणसानं ‘चांगलं माणूस’ म्हणून जगणं हेच कसं चांगलं आहे, हे देवाधर्माच्या कर्मकांडातून पोचवण्याऐवजी विचारातून, कार्यकारणभाव स्पष्ट करत पोचवणं आवश्यक आहे. याचा परिणाम अधिक टिकावू ठरेल. माणसाच्या विचार करण्याच्या सामर्थ्यांनेही हा विचार करायला हवा, की देव आपल्याला बागुलबुवा म्हणून हवा की सखा म्हणून हवा? लहान मुलांना असं सांगितलं जातं की, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस. कारण काय, तर देवाचं सगळीकडे लक्ष असतं आणि तो तुला शिक्षा करेल. पण प्रत्यक्षात कधी कधी खोटं बोलून, चोरी करून मुलांना तात्कालिक फायद्याचा आनंद मिळाला आणि हे वागणं उघडकीला आलं नाही तर देवाचा धाक खोटा असल्याचं त्यांना समजेल आणि कदाचित ती अधिकच निर्ढावतील! त्यापेक्षा चांगलं का वागायचं, हे त्यांना थेट समजावून का सांगू नये? अलीकडेच ‘लोकसत्ता’मध्ये अभय टिळक यांनी त्यांच्या एका लेखात मांडलेला विचार यासंदर्भात समजून घेण्यासारखा आहे. ते लिहितात- ‘देवाशी सोयरीक करणे ही संतांनी तुम्हा-आम्हाला दिलेली एक अत्यंत मोठी देणगी! जबाबदार सदाचाराचे, उचित आणि नैतिक वर्तणुकीचे पाठ शिकवणारा, घरातल्या प्रत्येकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा घरातला सोयरा म्हणजे देव! हे विसरून आज देवाची रवानगी देव्हाऱ्यात झालेली आहे.’ यालाच जोडून मला म्हणावंसं वाटतं की, एक वेळ देव्हाऱ्यातला देव हा फोटोतल्या मित्रासारखा तरी मानता येईल. ते मी समजू शकते. पण आता तर लोक देवाला मनातही नाही, घरातल्या देव्हाऱ्यातही नाही, तर चक्क रस्त्यावर बसवायला आणि उतरवायला लागलेत; आणि वर त्याचा व्यापारही मांडताहेत!

देव दयाळू, कृपाळू आहे, त्याला सगळं दिसतं, समजतं आणि तो सगळ्यांचं रक्षण करतो- असा देवाविषयीचा एक भक्तिभाव आपल्या मनात लहानपणापासूनच सजलेला असतो. त्यातूनच देवावर भार टाकणं, त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होणं सुरू होतं. याचाच परिणाम म्हणून त्याला काही ‘देणं’ सुरू होतं. कधी स्वखुशीनं, कधी बडव्यांच्या मागणीनुसार! अशावेळी वाटतं- देव काय व्यापार करायला बसला आहे? तुमची जेवढी भक्ती, जेवढं दान; त्यानुसार त्याच्या कृपेचा ऐवज तुमच्या पदरात पडणार? म्हणजे श्रीमंताच्या/ गरीबाच्या भक्तीच्या नव्हे, तर दानाच्या प्रमाणात त्याला लाभ होणार? त्यापेक्षा ‘कांदा-मुळा-भाजी’ देवाला अर्पण करणारा सावतामाळी विठ्ठलाशी किती सोयऱ्यासारखा वागता-बोलताना दिसतो! अगदी मनापासून भक्ती करणाऱ्यांवर तरी देव प्रसन्न होतो का? मग एखाद्या आनंदाच्या घटनेनंतर देवाच्या पाया पडायला जाणाऱ्यांच्या गाडय़ांना अपघात का होतात? ही माणसं तर देवाच्या दारी आनंद साजरा करायला गेली होती ना? त्यांनाही जर देव अपघातातून वाचवू शकला नाही तर आणि तरी देवावरचा विश्वास अढळ कसा राहू शकतो? इथे थोडं थांबून विचार व्हायला हवा.
अलीकडेच दिवेआगरच्या देवळातली मौल्यवान अशी देवाची मूर्ती चोरीला गेली! आता म्हणे काही भक्तजन पुन्हा तशीच सोन्याची मूर्ती करून देवळात बसवणार आहेत! देवाला स्वत:चं रक्षण करता आलं नाही म्हणून आता सरकारी सुरक्षा मागून माणसं देवाचं रक्षण करणार! म्हणजे देवापेक्षा सुरक्षारक्षकच भारी ठरणार! आता म्हणे, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दागिन्यांचं मोजमाप करताहेत. मोजलेल्या त्या प्रचंड मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या सोन्याची बातमी प्रसारमाध्यमांतून झळकणार. म्हणजे पुन्हा एकदा चोरांना निमंत्रण! बालाजी काय, तिरुपती काय, शिर्डीचं साईबाबा मंदिर काय; देवाच्या पायी हा सोन्यामोत्यांचा डोंगर कशासाठी उभा करायचा? त्यासाठी मग देवळाचं व्यवस्थापन आलं. विश्वस्त मंडळ आलं. त्यांच्यावरचे खटले आले! सावकाराकडे दागदागिने गहाण टाकतात तशी माणसानं देवाकडे विचारशक्ती गहाण ठेवली आहे का?
शंभर-सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या या देशात पासष्ट टक्के लोक दारिद्रय़रेषेखाली जगताहेत! ना त्यांच्या डोक्यावर छप्पर, ना अंगभर कपडा, ना पोटभर अन्न, ना शिक्षण, ना आरोग्यसुविधा. या साऱ्यांकडे डोळेझाक करत देवांना सोन्याच्या दागिन्यांनी मढवायचं, त्यांच्या जेवणाखाणाचे भोग आणि दुधाचे अभिषेक करायचे, त्यांच्या देवळांचे कळस सोन्याचे करायचे आणि दारांना सोन्याचे पत्रे बसवायचे! देव मानणारे लोक हे काय करताहेत? देवावर विसंबणाऱ्यांचा मला अपमान करायचा नाही; पण मला त्यांची काळजी वाटते. कारण माणसाजवळचं मेंदू नावाचं विचाराचं साधन ते गंजत ठेवताहेत! संकटकाळी त्यांच्या देवानं त्यांना तारलं नाही तर ते कोसळून पडतील याची मला चिंता वाटते आहे!

या सगळ्याच्या पलीकडचा आणखी एक मुद्दाही महत्त्वाचा आहे. देवापर्यंत पोचवण्याचा किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठीचा उपाय सांगण्याचा बहाणा करत जे भोंदू आपल्या नावाला स्वत:च बाबा, महाराज, माँ, देवी इ. उपाधी जोडून लोकांना लुटण्याचा धंदा करतात त्यांचं काय? अध्यात्माची भाषा वापरत, गूढ वातावरणाच्या अंधारात भरमसाठ पैशाची मागणी करून ही मंडळी असंख्य माणसांची फसवणूक करतात! त्यांचं मार्गदर्शन खूपच महागडं असतं! कारण त्यांचा प्रपंच तुकडोजीमहाराज, गाडगेबाबा किंवा नामदेव-तुकारामांसारखा सर्वसामान्यांचा नसतो. तो अत्यंत विलासी आणि पंचतारांकित पातळीवरचा असतो. ते जनतेचे मार्गदर्शक नव्हेतच. सत्यसाईबाबा निधन पावल्यानंतर त्यांच्या वारसाबाबत झालेला वाद आठवतो? महाप्रचंड संपत्तीने भरलेली त्यांची कोठारं? त्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठीची अद्ययावत यंत्रणा? एकीकडे भवसागर तरून जाण्यासाठीचा उपदेश करत भक्तांना हात उंचावून अभय देणारी ही मंडळी.. आणि यांच्या मनात त्यांच्यावर कुणी हल्ला करेल याचं भय?

स्वत:ला देवाचे अवतार किंवा दूत समजणाऱ्या या मंडळींच्या अद्भुत दैवी शक्तीचं आकर्षण वाटून भले भले शास्त्रज्ञ, राजकारणी, डॉक्टर, न्यायाधीश यांना शरण जातात! मग अनेकानेक कारणांनी व्यग्र, ग्रस्त आणि त्रस्त असलेल्या सामान्य माणसांविषयी काय बोलावं! ते तर कर्ज काढून, कधी कधी बाया-मुलींना यांच्याकडे सेवेला पाठवून देतात. कधी अल्पवयीन मुलांना यांच्या आश्रमात ठेवून देतात. केवढी फसवणूक त्यांच्या पदरी येते! इथेच आपल्या मेंदूला गंज चढू न देता कामाला लावण्याची गरज आहे. स्वत:च विचार करूया, प्रश्न विचारूया. आपलं हे सामथ्र्य जागं होऊ नये यासाठीच चमत्कारांतून, शब्दजंजाळातून, निर्थक कर्मकांडांतून, खोटय़ा आश्वासनांतून एक प्रकारची बधीरता आणणारी गुंगी, या मंडळींचं ‘अध्यात्म’ आपल्यावर पांघरूण ठेवते. हेच खोटे आधार तपासून बघायला हवे आहेत.

अशा प्रकारच्या विविध भुलावणाऱ्या वाटेनं जाऊन पस्तावलेले, हरवलेले अनेकजण असतात. पण खरं कुणी कुणाशी बोलायचं? आधी स्वत:च स्वत:शी खरं बोलायला हवं. फसलेले सगळेच सांगत असतात की, ‘मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर खूप गार गार वाटत!’ तिथला विंचू डसल्याचं कोण बोलणार? त्यापेक्षा अशी फसगत झालेल्या किंवा वाट चुकलेल्या काहीजणांनी तरी एकत्र यायला हवं. आपापले प्रश्न, संकट, दु:ख याबाबत एखाद्या स्व-मदत गटासारखे ते एकमेकांना भेटून, बोलून चर्चा करायला लागले तर त्यांची मनं मोकळी होतील. फसवणुकीच्या धक्क्य़ातून त्यांना सावरायला मदत होईल. शेवटी अन्न-वस्त्र काय, वस्तू काय, दुसऱ्याकडून उसन्या घेऊन किती दिवस पुरणार? स्वत:चं म्हणून काही मिळवायलाच लागतं. यासाठी आपणच आपला आधार शोधणं, उभं राहणं, सहप्रवाशांचे हात हाती घेत वाटचाल करणं आणि सत्याला, वास्तवला सामोरं जाणं हेच हिताचं आहे. तो देव बिचारा काही करू शकत नाही आपल्यासाठी, हे एकदा मान्य केलं तरच आपल्याला पर्याय शोधता येतील.

मला कल्पना आहे की, माझी कुणालाही दुखवायची मुळीसुद्धा इच्छा नसली तरी या संवादप्रयत्नामुळे काहीजण दुखावले जातील. आजकाल माणसं फार हळवी झाली आहेत! ती अशावेळी हिंसक, आक्रमकही होतात. माझी विनंती एवढीच, की लाठय़ाकाठय़ांच्या वापराऐवजी विचार करा. संवाद करा.

लेखं - विद्या बाळ

सौजन्य - दै. लोकसत्ता

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel