जयद्रथवधाच्या दिवशी झालेल्या युद्धप्रसंगांचे खुलासेवार वर्णन माझ्या त्या विषयावरील लेखांत पूर्वीच आलेले आहे. त्या दिवशी सहा महारथींना अर्जुनाने वारंवार हरवले, प्रचंड सैन्यसंहार केला व अखेर जयद्रथालाहि मारले. याउलट, अकराव्या दिवसापासूनच्या युद्धांत कर्णाला अभिमन्यु, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न, घटोत्कच या सर्वांनी वारंवार हरवले. भीम हा महाधनुर्धर असे त्याचे वर्णन नाही. तो गदायुद्ध व शरीरबळाच्या सर्व प्रकारच्या युद्धात प्रवीण! मात्र जयद्रथवधाच्या दिवशीं रथयुद्धात त्याने सतरा वेळा कर्णाचे धनुष्य तोडून कर्णाला सळो कीं पळो करून सोडले. भीमाने मला फार मार दिला आहे व केवळ आज युद्धाला उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी उभा आहे असे त्याने स्वत:च दुर्योधनापाशी म्हटले! भीमार्जुनांनी क्वचितच जीव वांचवण्यासाठी युद्धातून पळ काढला असेल. कर्णाने तसे वारंवार केले. अनावर झालेल्या घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णाला अखेर अर्जुनावर वापरण्यासाठी खास राखून ठेवलेली शक्ति वापरावी लागली. इतर बळाने वा अस्त्रविद्येने भागले नाही. द्रोणाला धृष्टद्युम्नापासून कर्ण वांचवूं शकला नाही. दुर्योधनाचे भाऊ रोज भीमाकडून मारले जात होते. कर्ण त्यांना, दु:शासनालाहि, वांचवू शकला नाही.
कर्ण सेनापति होईपर्यंत खरे तर युद्ध दुर्योधनाच्या हाताबाहेर गेलेले होते. दोन दिवसपर्यंत कर्णाने कडवा प्रतिकार केला. अर्जुनाचे व त्याचे अनेक वेळा संग्राम झाले. अर्जुनासमोर हे मोठे आव्हान होते. पण तो त्या कसोटीला पुरेपूर उतरला. अर्जुन उपस्थित नसताना झालेल्या अभिमन्युवधामध्ये कर्णाचा सहभाग होता म्हणून अर्जुनाने चिडून कर्णाला आव्हान दिले होते कीं अभिमन्यूला वांचवायला मी नव्हतो. पण तुझ्या पुत्राला मी तुझ्यासमक्षच मारीन. कर्णपुत्र वृषसेन हाही अभिमन्यूप्रमाणेच महारथी होता. कर्णाला डांबून ठेवून, तो हजर असतानाच, अर्जुनाने वृषसेनाचा वध केला व आपला शब्द खरा केला. कर्ण आपल्या पुत्रालाहि वांचवूं शकला नाही. सतरा दिवसांच्या अखंड परिश्रमांनंतर कर्णाचे रथचक्र रुतून बसले असताना, त्याला पुन्हापुन्हा निसटून जाण्याची संधि न देतां, अर्जुनाने अखेर कर्णाचा वध केला व वैराची अखेर केली. यांत अर्जुनाच्या पराक्रमाला कोठेतरी उणेपणा आला असे काहीना निव्वळ कर्णप्रेमामुळे वाटते पण माझ्या मते त्यांत काडीचाहि अर्थ नाही. युद्धामध्ये आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही तर संधि पुन्हापुन्हा येत नाही. या दोन दिवसांत कर्णालाहि अर्जुनवधाची संधि आली होती पण ती त्याला साधतां आली नाही. शल्याने त्याचे सारथ्य कौशल्याने केले पण युद्धाला उभे राहाण्यापूर्वी बढाईखोर व उद्धट स्वभावाच्या कर्णाने त्याचेबरोबर वितंडवाद घालून त्याचे संपूर्ण सहकार्य मिळण्याची संधि घालवली. शल्याने रुतलेले चाक काढण्याचे माझे काम नाही असे म्हणून सहकार्य नाकारले पण त्याला प्रसंग न ओळखणारा कर्णच स्वत: जबाबदार नाही काय? कर्णाने पराक्रमाची शर्थ करूनहि अखेर तो उणाच पडला व अपयशी झाला.
अद्यापपर्यंतचे १२ भागांमध्ये मी केलेले सर्व कर्णचित्रण महाभारतावरच आधारित आहे. कर्णाचा जन्म सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून याबद्दलचा माझा सप्रमाण तर्क मी वाचकांसमोर ठेवला आहे. सर्व चित्रणाचे समालोचन अखेरच्या भागात वाचा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel