आदिपर्वामध्ये धौम्य ऋषि व त्यांचे तीन शिष्य यांची एक छोटीशी कथा आहे. विद्या देण्यापूर्वी धॊम्यांनी आपल्या आरुणी, उपमन्यु व वेद या तीन शिष्यांची कठोर परीक्षा घेतली. शेतात शिरणारे पाणी अडवण्यासाठी बांध घालण्याचे काम आरुणीला सांगितले. त्याला ते जमेना तेव्हा बांधातील भगदाड अडवून तो स्वत:च झोपून राहिला. (आपल्या शरीराचाच बांध केला.) तो बराच वेळ दिसेना तेव्हा त्याला शोधत गुरु स्वत: शेतात आले व त्यानी आरुणीला जोरात हांक मारली तेव्हा तो बांधातून उठून आला.त्याने धोका पत्करून केलेलें आज्ञापालन पाहून गुरु प्रसन्न झाले व मग त्याला विद्या दिली.
दुसरा शिष्य उपमन्यु. त्याला गुरे राखायला पाठवीत पण काही खावयास मिळत नसे. तो गायींचे दूध प्यायचा. वासरांच्या वाटचे दूध तूं पिऊं नको असे त्याला गुरु म्हणाले. मग तो फक्त फेस प्यायचा. त्यालाहि गुरूनी बंदी केली. मग उपासमार झाल्यामुळे त्याने एकदां रुईचीं पाने खाल्ली> त्यामुळे तो आंधळा झाला व विहिरीत पडला. गुरूना कळल्यावर ’अश्विनीकुमारांची स्तुति कर’ असे त्याला सांगितले. त्याना प्रसन्न करून त्यांच्याही परीक्षेला उतरल्यावर त्याला पुन्हा दृष्टि मिळाली. मग प्रसन्न होऊन गुरूनेहि सर्व विद्या दिली.
तिसरा शिष्य वेद नांवाचा होता तो बुद्धीला कमी होता. त्याला गुरुशुश्रूषेचे काम मिळाले. इतर कामाबरोबर गुरु त्याला नित्य बैलाप्रमाणे जोखडालाहि जुंफत. बराच काळ असे कष्ट केल्यावर त्याचेवरहि गुरुकृपा झाली!
या कथेतील शेवटचा भाग लक्षणीय आहे. वेद हा शिष्य ज्ञानसंपन्न होऊन गृहस्थाश्रमी झाल्यावर त्यालही तीन शिष्य मिळाले. वेदाने मात्र त्यांना काहीहि काम सांगितले नाही! गुरुगृहीं वास म्हणजे केवढे विलक्षण कष्ट याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव होता. गुरुशिष्यपरंपरेने विद्या मिळवण्यासाठी गुरुगृहीं राहताना आजच्या युगात भीमसेन जोशी यांनी काढलेल्या अपार कष्टांची आठवण अपरिहार्यपणे येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel