मांडव्य नांवाचे एक विद्वान व पुण्यशील ऋषि तपश्चर्येसाठी ध्यानस्थ बसलेले असताना एक चोर त्यांचे आश्रमांत आला. व दडून बसला. पाठलाग करणार्‍या शिपायांनी मांडव्यांकडे चौकशी केली तेव्हा मौनव्रत असल्यामुळे ते काही बोलले नाहीत. चोर आश्रमांतच सांपडल्यावर रागाने शिपायांनी त्याचेबरोबर मांडव्यांनाहि पकडून राजापुढे उभे केले. अविचारी राजाने चोराबरोबर मांडव्यांनाही सुळावर चढवले. सुळावर चढवलेले मांडव्य बराच काळ पर्यंत यातना भोगत जिवंत राहिले. रखवालदारांनी राजाला हे कळवल्यावर त्याने अमात्यांशी चर्चा करून ऋषीना खाली उतरवले व क्षमायाचना केली. सुळावरून उतरवताना त्याचे टोक (अणि), तुटून ते मांडव्यांच्या शरीरात तसेच राहिले. त्यामुळे त्यांचे नाव अणिमांडव्य पडले. ऋषीनी राजाला क्षमा केली पण जेव्हा यमाच्या दरबारात गेले तेव्हा त्यानी यमालाच जाब विचारला कीं माझ्या कोणत्या घोर अपराधामुळे मला सुळावर यातना भोगाव्या लागल्या? यमाने उत्तर दिले कीं तूं लहान असताना एका पाखराला काडीने टोचले होतेस त्याचे फळ तुला भोगावे लागले.!
या विलक्षण कथेचा पुढील भाग महत्वाचा आहे. मांडव्य ऋषीनी हे ऐकून यमधर्माला दोष दिला व शापहि दिला. मूल बारा वर्षांचे होईपर्यंत जें करील त्याला धर्म/अधर्म ठरवता येत नाही. कारण तोंवर त्याच्या बुद्धीला ती ताकद आलेली नसते. तेव्हा मूल १४ वर्षाचे होईपर्यंत त्याच्या कृत्याची पापात गणना करू नये व त्याला शिक्षाही होऊ नये असा दंडक त्यानी यमधर्माला घालून दिला! गुन्हा व शिक्षा यांचेमध्येहि प्रमाण राखले पाहिजे असाहि विचार त्याचेपुढे मांडला व ’माझ्या क्षुद्र पापाला एवढी कठोर शिक्षा तूं कशी दिलीस?’ असा त्याला जाब विचारला!’या गुन्ह्याबद्दल तुला मनुष्यजन्म घ्यावा लागेल’ अशी शिक्षाही फर्मावली! यमधर्माचा मनुष्यावतार म्हणजे पांडु-धृतराष्ट्रांचा भाऊ विदुर होय.
या कथेमध्ये मांडव्यांनी इतक्या पुरातन काळात मांडलेला, गुन्हा व शिक्षा यांमध्ये प्रमाण हवे हा विचार व १४ वर्षांपर्यंत अजाण मानून गुन्ह्याला शिक्षा नसावी हाही विचार आजच्या काळातहि सर्व पुढारलेल्या मानवसमाजांमध्ये न्यायाचे तत्त्व मान्यता पावलेला आहे हें विषेश!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel