गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की , जो कोणी काही मागायला येईल त्याला ‘ नाही ’ म्हणू नये ; आपल्याजवळ जे असेल त्यामधले थोडे तरी त्याला द्यावे . अन्न द्यायला कधीही मागेपुढे पाहू नये . पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून , आणि त्याचा हेतू पाहून , तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे ; पण ‘ नाही ’ म्हणणे चांगले नाही . भिकार्‍याला कधीही वेडेवाकडे बोलू नये . आपली नोकरी हीही एक प्रकारची भीकच आहे ! भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही , पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी . आपले पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसर्‍याला द्यावा . वैराग्याचे तेज कधी लपून राहात नाही . अत्तरे वगैरे लावून तेज आणणे निराळे , आणि वैराग्याचे तेज निराळे . वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे .

जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे . जे खोटे आहे ते खरे मानणे , हे अज्ञान , अविद्या होय . खरोखर , मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते . साधूंनाच अंतरंग समजते . म्हणून , तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावे ठेवू नयेत . अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जातो , यावरुन त्याच्या पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते . साधा मनुष्यसुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढतो . अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरले पाहिजे . नामामध्ये फार सामर्थ्य आहे ; कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहात नाही , त्याला काय करावे ? योगाने जे साधते ते नामाने साधते यात संशय नाही . ज्याला नामाची चटक लागली , त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे . परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच उपाय आहे . तसे पाहिले तर प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असल्याचे आपल्याला दिसून येते . त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो . हे कसे शक्य आहे ? अत्यंत निःस्वार्थी बनणे याचेच नाव परमार्थ . तो साधण्यासाठी थोडातरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे . साधुसंतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते . प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कुणीच सांगत नाही , आणि असे सांगितले तरी कुणी ऐकत नाही . पण निदान प्रपंच , म्हणजे आपला स्वार्थीपणा , हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात , ते काही गैर नाही . स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे ; वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे ; भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे ; आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे . म्हणून तुम्ही नाम घेत जावे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel