देवाचे देणे
“उदंड पडली कामे।” अशी समर्थांची हाकाटी होती. परंतु आता “बुडाला औरंग्या पापी।” असे पाहून स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहून जनतेतील जागृती, कर्तव्यदक्षता, ऐक्य, शिस्त, त्याग, शौर्यधैर्य, ध्येयोत्कटता, चारित्र्य हे सारे पाहून समर्थ संतोषले. त्यांचे ध्येय मूर्त करणारे शिवराय, त्यांच्यासाठी समर्थ तुळजापूरच्या देवीपुढे सद्गगदित होऊन प्रार्थना करते झाले “तुझा तू वाढवी राजा।”

शिवराय ही जणू देवाची देणगी. असा दैवी देण्याचा राजा कोठे पहायला मिळणार? शिवरायात खरोखर दिव्यता होती. ते विरक्त झाले असते तर थोर संत झाले असते. एकदा हंपीजवळ जंगलात जाऊन शिवराय ध्यानात रमले. जणू प्रभूशी ते एकरूप होऊ पहात होते. परंतु जनता तडफडत होती. ते पुन्हा जनतेकडे धावून आले. असा राजा होता.

पकडून आणलेल्या यवनीस पाहून ते म्हणाले, “आई, मी तुझ्या पोटी येतो तर किती सुंदर दिसलो असतो.” किती थोर उद्गार! असे उद्गार काढणारा पुरुष सामान्य नसतो.

असा हा जितेंद्रिय पुरुषसिंह होता. मुसलमानी धर्माची निंदा कधी त्यांनी केली नाही. कुराणाचा अपमान केला नाही मशिदी, दर्गे यांनाही इनामे दिली. परधर्मीयांस राजी राखले. असा राजा इतिहासात कोठे पाहावा, कोठे शोधावा! म्हणून समर्थ जगदंबेला म्हणाले, “तुझा तू वाढवी राजा! हे देवा, शिवछत्रपती तुझे देणे. त्याची भरभराट कर.”

स्वातंत्र्यमूर्ती अंतर्धान पावली
भरभराट होत होती. परंतु आयुष्य कमी झाले. १६८० मध्ये वयाच्या अवघ्या पन्नासाव्व्या वर्षे महाराष्ट्राची ही पुण्यमूर्ती, ही स्फूर्तिदेवता, ही स्वातंत्र्यमूर्ती अंतर्धान पावली! परंतु शिवछत्रपती महाराष्ट्राच्या रोमरोमांत आहेत. ते अमर आहेत.

महाराष्ट्राचे हे मुके किल्ले स्वातंत्र्याचा संदेश देत आहेत! गरिबांचे प्रश्न हाती घ्या, त्यागाची परमावधी करा, नेत्यांचे ऐका, असे आदेश हे किल्ले देत आहेत. लोकमान्य म्हणत, “सिंहगडावर वर्षातून एक महिना राहतो, परंतु येथील ती हवा मला मग वर्षभर पुरते.” अशी ही स्वातंत्र्यप्रेरणा महाराष्ट्रातील किल्ले सदैव देतील. रायगड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, पन्हाळा रांगणा किती नावे! किती अमर आठवणी! किती तेजोवलये या किल्ल्यांभोवती! महाराष्ट्रा, यांचा संदेश नाही का तुला ऐकु येत?

जिवंत शिकवण
शिवछत्रपती गेले! संभाजी महाराजांची ती करूण-गंभीर कारकीर्द संपली. राजाराममहाराज उभे राहिले. औरंगजेब सर्व शक्तिनिशी आला होता. राजाराममहाराज चंदी-तंजावरकडे गेले. महाराष्ट्रात कोण होते? रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी. अनेक वीर व मुत्सद्दी उभे राहिले व शर्थीने लढले. औरंगजेब थकला. शिवाजी महाराज नव्हते. राजाराममहाराज दूर. तरी शिवाजी महाराजांची शिकवण जिवंत होती. त्यांनी दिलेला ध्येयवाद जिवंत होता. आजही ती शिकवण आपणास घेता येईल. ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर, स्पृश्य- अस्पृश्य, हिंदू-मुसलमान, सारे भेद भिरकावून एक भारत डोळ्यांसमोर ठेवून महात्माजींसारख्या
अद्विवीय नेत्याच्या नेतृत्वाखाली प्राण हाती घेऊन अमर आशेने व निश्चयाने जर आपण उभे राहू तर आजही त्वरीत स्वतंत्र्य होऊ.

विशाल दृष्टी

संभाजी महाराजांची कारकिर्द सुरू होती. काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरला. तेव्हा समर्थांनी शेवटचा संदेश पाठविला;

शिवरायाचे आठवा रूप । शिवरायाचा आठवा प्रताप ।
शिवरायाचा कैसा सापेक्ष । आटोपावा ।।

शिवरायाचे कैसे चालणे । शिवरायाचे कैसे बोलणे ।
शिवरायाचे कैसे वागणे । सावधान ।।

अशा आशयाच्या त्या ओव्या मनन करण्यासारख्या आहेत. आजही आपण जर शिवरायांचे रूप, त्यांची शिकवण सारे स्मरू तर सारे करंटेपणे नष्ट होईल. “जो तो बुद्धीच सांगतो ।” असली पाचकळ चर्चा, चावटपणा बंद होईल. जीवनात प्रखरता खोल व उदार बुद्धी, व्यापक व विशाल दृष्टी येईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel