तो आभ्यासारखा वाटला म्हणून मी वळून पाहिलं. खात्री झाली नाही म्हणून पुढे चालू लागलो. पुन्हा मनात आलं, हा आभ्याच असावा. म्हणून पुन्हा वळून पाहिलं...दोन पावलं चाललो. परत पाहिलं. अखेर मागे फिरलोच.

त्या इसमाच्या जवळ गेलो. आणि म्हणालो, “मी तुम्हाला कुठेतरी भेटलोय.
तो इसम चक्क नाहीम्हणाला.
ओळखीचा नसला तरी थोड्या वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा होती. म्हणजे, ‘कुठे भेटलोय आपण?” किंवा
री, मी ओळखलं नाही तुम्हालाअशी जनरली येणारी प्रतिक्रिया येईल, असं वाटलं होतं... पण तो चक्क नाहीम्हणाला.

मग मीच म्हटलं, “मी ज्ञानेश्वर फणसाळकर
त्याचा चेहराच बदलला. मी ओळखीचा आहे, अशा एक्स्प्रेशन्सनी तो माझ्याकडे पाहू लागला. तो काही बोलणार एवढ्यात मी पुढे म्हटलं' “तू आभ्या ना?”
तो- काय ज्ञान्या आहेस कुठे?
मी- च्याआयला हा प्रश्न मी तुला विचारायला हवा होता. साला तुच मला विचारतो आहेस.
तो- अरे कुठे नाय.. असतोय इकडचे.

त्याला म्हटलं चल त्या टपरीवर चहा पिता पिता बोलू. खरंतर तो घाईत होता. पण तो माझ्यासमोर काही बोलला नाही. चेहऱ्यावर लवकर निघायचंय अशा एक्स्प्रेशन्स होत्या. मात्र, मी मुद्दाम त्याला थांबवलं. रस्ता ओलांडून वडाच्या झाडाखालच्या टपरीपाशी गेलो. दोन गरमागरम कटिंगसोबत आमच्या पुन्हा गप्पा सुरु झाल्या.

-1-

आभ्या आज लय दिवसांनी भेटला होता. शाळा संपून आता जवळपास 6 वर्षे झाली. सर्वजण मुंबईतल्या गर्दीत आपापलं अस्तित्व शोधण्यात मग्न होतो... एवढे की, कधी कुणाला भेटलोच नाही. कधी एखादा वर्गमित्र भेटतो..पण तेही घाईघाईत. परवा रावल्या भेटला होता दादर स्टेशनला... दोन मिनिटं होत नाही तर म्हणे, “विरार फास्ट आहे. निघतो. नंतर मरणाची गर्दी होते.

...तर आभ्या गेल्या ५-६ वर्षात कधीच भेटला नव्हता. कधी भेटला तर त्याला धारेवरच धरणार होतो. तसं ठरवलंच होतो. आभ्याबद्दल गावी जे काही ऐकलंय, त्यावर विश्वासच बसेना. आभ्या असे करेल, असं वाटलं नव्हतं. त्याच्या आईने जे काही त्याच्याबद्दल सांगितलं, त्याने त्यावेळी अक्षरश: थरकाप उडाला होता. आभ्या कधी भेटलाच तर त्याचा मुस्काट फोडेन, इथवर राग मनात भरला होता.

-2-

आता आभ्या काडीपैलवान झालाय. पुरता काटकुंड्या. शाळेत होता तेव्हा असा नव्हता. शाळेत असताना तो टवटवीत चेहऱ्याचा होता आणि तो लय जबाबदारी-बिबादारीचा बोलायचा. आता ऐन पंचवीशीत तो चाळीशीचा वाटू लागलाय. चेहऱ्यावर रेषा उमटेस्तोव टेन्शन्सचे एक्स्प्रेशन्स. आभ्या पाचवीत होता, तेव्हाचा त्याचा बाप मेला. चिमुरडी बहीण...आणि आई, इतकंच आभ्याचं कुटुंब. आभ्याची आई प्रचंड  मेहनत करायची. त्यातूनच आभ्याचं दहावीपर्यंत शिकला. आभ्या दहावीनंतर मुंबईला येऊन डायरेक्ट कामालाच लागला. शिकायाला पैसा नव्हता त्याकडं. आणि तसंही आभ्याला काय शिकायची आवड वगैरे नव्हती.

-3-

गेल्या महिन्यात भातकापणीला गावी गेलो होतो. तेव्हा आभ्याची आई भेटली होती. एसटी स्टँडवरच आकाची नी माझी भेट झाली. आभ्याची आई आमच्याच गावची माहेरवाशीण. त्यामुळे मी आका बोलत असे. तर आका रडवेल चेहरा करुनच माझ्याशी बोलली, “माझा आभ्या दिसतो काय कुठं वुंबईस?” गावाकडं सारे मुंबईला वुंबईच बोलत असत. आकाच्या प्रश्नाने मी पुरता चक्रावून गेलो. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.
मी क्षणात प्रश्न केला, “आका, असं काय बोलतेय? आभ्या बराय ना?”
आकाचा रडवेला चेहरा आता फुटलाच. तिने रडारड सुरु केली. आम्ही दोघेही एसटी स्टँडवर उभे होते. त
िला रडण्याचं थांबवून मी झालेल्या परिस्थतीची माहिती घेण्याच्या विचारात होतो. पण तीचं रडणं थांबत नव्हतं. अखेर तिने रडण्यातूनच आभ्याचे कारनामे सांगण्यास सुरुवात केली. या मायेकडे दुर्लक्ष करुन आभ्या असं वागेल वाटलंच नव्हतं.

-4-

त्याचं झालं असं की, दहावी झाल्यानंतर आभ्या कामासाठी मुंबईत आला. घरची जबाबदारी, आई आणि आता कुठे चालायला लागलेली बहीण. फार काही नात्यांची गुंतागुंत नव्हती. मात्र, संसाराचा गाडा आता त्याला हाकायचा होता. कारण त्याच्याशिवाय घरात कर्ता-कमविता कुणीच नव्हता. आई आता थकली होती. तीचा अर्धमेला जीव आणखी किती काम करणार होतं. अर्थात आभ्याला याची संपूर्ण जाणीव होतीच. नाही असे नाही.
मात्र मुंबईत आल्यावर त्याला काय झालं की त्याचं टाळकंच फिरलं. साला पूर्ण बदललाच. होत्याचं नव्हतं करुन घेण्याच्या मार्गावर गेला. कुठल्याशा मेडिकलमध्ये आभ्या कामालाल लागला होता आणि तिथल्याच एका मुलीशी याचं जुळलं. बरं प्रेम-बिमाला विरोध नाही. मात्र याचं ज्या मुलीवर प्रेम जडलं तिनं याचं पार तुणतुणंच केलं. प्रेमात कोर्ट मॅरेज करुन गडी राहू लागला. या साऱ्या गोष्टींचा त्याने आईला थांगपत्ताही लागू दिला नाही. जीने जिवाची पर्वा न करता रखरखत्या उन्हाची, गोठवणाऱ्या थंडीची आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता दगड-धोंड्यातून फिरुन याच्यासाठी पै पै गोळा केला, याला शिकवला, त्याला लग्न करताना साधं आईला सांगावसं वाटलं नाही? बरं ज्या मुलीशी लग्न केलं तीही काही चांगली निघाली नाही. ती पोरगी याला गावाला जाऊच देईना. कारण काय होतं माहित नाही… आभ्यानं त्याबाबत कधी कुणाला काही सांगितलंही नाही. पण आभ्या तिच्यामुळे गावी येत नसे, एवढं मात्र बाहेरुन कळलं होतं.

-5-

आता आभ्या कित्येक दिवसांनी भेटला. जे काही आतापर्यंत कळलं त्याबद्दल विचारण्याची मलाही घाई झाली होती. चहाचा कप तोंडला लावण्याच्या आधीच मी त्याला प्रश्न केला, “काय रे आभ्या...लग्न केलंस असं ऐकलं. खरंय का ते? आणि गावी का जात नाहीस?”
चहाचा कप तोंडाला टेकणार तोच माझा प्रश्न त्याच्या कानावर धडकला. त्याने कप खाली घेतला. मी म्हटलं, “अरे चहा पी.. पिता पिता बोल.
त्याचा घाबरलेला चेहरा झाला होता. मात्र, मला त्याच्याबद्दल अजिबात सहानुभूती नव्हती. उलट प्रचंड राग होता.
अखेर त्याने सांगायला सुरुवात केली. म्हणे, जिच्याशी लग्न केलं, ती चांगली आहे रे. लोकांनी काहीही पसरवलंय गावाकडं- पोरगी सोडत नाय, आभ्याला पोरीचा नाद लागलाय वगैरे वगैरे. बायको चांगलीय रे. पण तिचा बाप आता सोडत नाय. गावाकडं जायाला देत नाय. म्हणे तू गावालाच राहशील. घरजावय झालोय. आईला पैसे द्यायला पैसेच राहत नाय. सासऱ्याला द्यावे लागतात.

आभ्या कारणं देतोय असं मला वाटू लागलं. मी त्याला बोलता बोलता थांबवलं. म्हटलं, मला कळलं. तुझं सुरु राहू दे, जसं सुरुय तसंच. तो काही बोलला नाही. त्याला खूप काही बोलायचं होतं. पण त्याची कारणं ऐकून मला राग आला होता.

त्याक्षणी आभ्यावर रागवण्याऐवजी मला आकाचा पोराच्या येण्यासाठी वाटेकडं डोळं लावून बसलेला चेहरा आठवला. तिचा तडफडणारा जीव माझ्या काळजाचा ठोका चुकवू पाहत होता. ज्याला अंगा-खांद्यावर खेळवलं, त्याने बायकोसाठी आईची तडजोड करावी, याशिवाय भयंकर काय असू शकतं, असा विचार करत मी तिथून निघालो. जाताना फक्त आभ्याला म्हटलं, आकाला कधीतरी भेटायला जा. तुझ्यासाठी तिचा जीव तडफडतोय.

-6-

या सर्व घटनेला आता दोन-एक वर्षे लोटली असतील. आता काही दिवसांपूर्वीच कळलं की, आभ्या गावी येतो-जातो. मात्र पाहुण्यासारखा. आभ्याची बहीण मुंबईत कुठेतरी घरकाम करते. तिचंही लग्न ठरलंय. होणारा नवरा चांगला आहे, असं कळलं. थोडं बरं वाटलं. किमान त्या बिचाऱ्या बहिणीचं तरी आयुष्य नीट जाईल.
बाकी मरणाचं वय नसतानाही आका आता मरायला टेकलीय. आभ्याच्या टेन्शनने तिला अगदी खंगाल केलंय. आभ्याची बहीण पैसे पाठवून देते, त्यावर तिचं एकटीची चूल पेटतो. दोन वेळेचं पुरेसं जेवायला मिळतं. बहिणीचं लग्न झाल्यावर आकाला आधार कोण असेल, माहित नाही. नाही असे नाही... गावातील शेजारीही बऱ्यापैकी मदत करतात. बाकी तिकडे आभ्या, त्याची बायको आणि सासू-सासरे मस्त जगत असावेत.

माहित नाही- आकाची आभ्याला आठवण येत असेल का, आकाने त्याच्यासाठी खास्ता खाल्ल्या, त्या आभ्याला आठवत असतील का, बहिणीला एकदातरी भेटावसं वाटत असेल का, गावाकडं काय चाललंय हे पाहून यावं, असं त्याला  वाटत असेल का....

-7-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel