घाटकोपर रेल्वे स्थानक म्हणजे एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी एकत्र बघायला मिळतात, जसे कि भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारी मध्य रेल्वे, रस्ते वाहतूक करणारी बेस्ट बससेवा, आंतरराष्ट्रीय प्रवासाची धुरा सांभाळणारी विमान वाहतूक घाटकोपर रेल्वेच्या अगदी छतावरून जाते आणि आधुनिक प्रवासाची ओळख म्हणजे मुंबईमधील पहिली मेट्रो तुम्हाला इथेच बघायला मिळते. म्हणजे एकूणच जलप्रवास सोडला कि प्रवासाची इतर साधने तुम्हाला इथेच बघता येतात.

भारत देशाची प्रगती बघत असताना घाटकोपर स्टेशनच्या बाजूलाच एक मोठा नाला वाहत असतो ज्याला लागूनच झोपडपट्टीची एक रांग असते. अब्दुल तिथेच राहत असतो. सहावीच्या वर्गात शिकणारा तो आपल्या आई वडील आणि काकांबरोबर नाल्याजवळच्या झोपडीत राहतो.

“अब्बू, हे पाणी कुठून येतं?” अब्दुल विचारतो.

“तिथे समोर जो मोठ्ठा मॉल आहे ना! तिथून आणि त्याजवळच्या टॉवरमधून येतं हे पाणी.” अब्दुलचे वडील म्हणतात.

“इतकं पाणी? आपल्या नळाला फक्त एक तास पाणी येतं. मग या टॉवरमधल्या लोकांना इतकं पाणी कसं मिळतं?” अब्दुल विचारतो.

यावेळी त्याचे बाबा गप्प बसतात. अब्दुलच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर त्याच्या मनाचं समाधान होतं असं नाही, त्याचा पुढचा प्रश्न तयारच असतो.

“तू शिकून मोठा हो, तेव्हा तुला समजेल असं का होतं ते. आता आत जा आणि अम्मीला विचार जेवण झालं का? मला खूप भूक लागली आहे.” अब्दुलचे वडील म्हणतात.

अब्दुल लगेच धावत घरात जातो. त्याचे वडील त्या वाहणाऱ्या नाल्याकडे बघत विचारांत हरवतात. आम्ही खरंच एक तास जेवढं पाणी मिळेल ते साठवून त्यात समाधान मानतो. मग ही मोठी माणसं नक्की करतात तरी काय? एवढं पाणी ते कशासाठी वापरतात? त्यांच्याही मनात अब्दुलसारखे प्रश्न डोकावू लागतात.

“अब्बू… जेवण झालंय, जेवायला या!” अब्दुल दारातूनच ओरडतो.

“आलो बेटा…” म्हणत ते नाल्याजवळून उठतात.

दुसऱ्या दिवशी अब्दुल शाळेत जात असताना त्याला रस्त्यालगत एक आलिशान गाडी उभी दिसते. त्याने याआधी अशी गाडी फक्त सिनेमांनाध्ये पाहिली होती. कुतूहलाने तो त्या गाडीजवळ जातो आणि गाडीला स्पर्श करून हे स्वप्न तर नाही ना! हे तपासतो. इतक्यात एक व्यक्ती मागून त्याची कॉलर धरते. मागे वळून बघितल्यावर त्याला तिथे हवालदार दिसतो.

“गाडीको क्या कर रहा था?” हवालदार रागाच्या स्वरात त्याला विचारतो.

“क.. क.. कुछ नहीं। बस गाडीको हात लगाकर देख रहा था।” अब्दुल भीत भीत म्हणतो.

“सच बोल, गाडीका लोगो चुराने आया था ना!” हवालदार त्याच स्वरात म्हणतो.

“नहीं सर, अब्बूजान कि कसम, बस हात लगाकर देख रहा था।” अब्दुल गळ्याला हात लावून म्हणतो.

“सच बता नहीं तो…” हवालदार आपले शब्द पूर्ण करणार तोच…

“ओ गायकवाड साहेब, नेहमी इथून जाणारं पोर आहे ते. गाडीला फक्त हात लावला त्याने. जाऊ द्या त्याला...” शेजारचा पानटपरीवाला म्हणतो. हवालदार अब्दुलला सोडत पानटपरीवाल्याला मावा बनवायला सांगतो आणि टपरीवर जाऊन गप्पा मारतो.

काही क्षणांपुर्वी आपल्याबरोबर जे झालं त्याचं अब्दुलला वाईट वाटत होतं. लोक महागड्या गोष्टी विकत घेऊ शकतात, पण आपण त्यांना साधा हात देखील लावू शकत नाही? विचार करत करत तो शाळेत जाऊन पोहोचतो.

मराठी भाषेचे सर आले नसल्याने त्यांचा ऑफ तास घेण्यासाठी दहावीच्या वर्गातील एक शिक्षक येतात. शाळेतील मुलं त्यांना सायंटिस म्हणून चिडवत असत. मुलं काय म्हणतात याकडे ते फारसं लक्ष देत नसत, मुलांना नवनवीन काय दाखवता येईल हे ते बघत. ऑफ तास असल्याने ते सहावीच्या वर्गातील मुलांना वाहत्या पाण्यापासून वीज कशी तयार होते, हे दाखवतात.

अब्दूलच्या मनात वाहत्या पाण्यापासून वीज तयार करण्याबाबत कुतूहल निर्माण होतं. तास संपल्यावर तो त्या सरांची भेट घेऊन ते यंत्र कसं तयार करतात हे विचारतो. सर सुद्धा खूप हौशी असतात. ते अब्दूलला त्या यंत्राचं इंजिनियरिंग चित्र काढून देतात.

शाळा सुटल्यावर अब्दुल धावत आपल्या वडिलांच्या दुकानात जातो. अब्दुलचे वडील सुतार असतात. हाताखाली ३ माणसं घेऊन ते आपलं फर्निचरचं दुकान चालवत असतात.

“अब्बू… मला असच्या असं यंत्र बनवून हवं आहे.” हातातील चित्र त्यांच्यासमोर धरत अब्दुल म्हणतो. चित्र बघून अब्दुलच्या वडिलांना अंदाज येतो, हे काहीतरी वेगळं आहे.

“काय आहे हे बेटा?” अब्दुलचे वडील विचारतात.

“ते मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर सांगेन.” अब्दुल घाईतच म्हणतो आणि बाजूच्या दुकानात जातो. त्याचे वडील ते चित्र हातात घेऊन उभे असतात, दुकानातील कारागीर त्यांच्याजवळ येऊन ते चित्र बघतो.

“क्या है ये?” कारागीर विचारतो.

“पता नहीं.” अब्दुलचे वडील म्हणतात.

“आप ये सच में बनाओगे?” कारागीर विचारतो.

“हमारे शहजादेने पहली बार कुछ काम दिया है, करना तो पडेगा। उसका दिल तोड नहीं सकते.” अब्दुलचे वडील म्हणतात.

संध्याकाळी सगळे कारागीर गेल्यानंतर अब्दुलचे वडील ते यंत्र बनवतात आणि ते घेऊन घरी जायला निघतात तेव्हा, शेजारच्या दुकानातील जिग्नेशभाई त्यांच्या दुकानात येतात.

“आप बाप -बेटो का क्या चल रहा है? सुबह अब्दुल मेरे दुकान से १० मीटर लंबा वायर और एलईडी ले कर गया, और आप ये अजीब सा डिझाईन ले कर जा रहे हो।” जिग्नेशभाई गंमतीच्या सुरात म्हणतात.

“अब्दुलने आप से वायर और एलईडी लिया? मुझे नहीं पता… कितना रुपया हुआ?” अब्दुलचे वडील विचारतात.

“क्या बात कर रहे हो भाई, अब्दुल जैसा आप का वैसा हमारा भी है। पैसे का छोडो, घर जा कर देखो अपना कलाम क्या करने वाला है।” म्हणत जिग्नेशभाई निघून जातात.

अब्दुलने वायर आणि एलईडी घेतल्याने तो नक्की काहीतरी वेगळं करून दाखवणार हे त्याच्या वडिलांना कळलं होतं, घरी पोहोचताच अब्दुल त्यांच्याकडून ते यंत्र घेतो. चरखा व्यवस्थित फिरतो आहे ना! याची खात्री करून घेतो आणि त्याला लगेच वायर जोडतो. ते यंत्र नाल्याजवळ नेतो. मग पुन्हा घरात जाऊन वायरचे दुसरे टोक एलईडीला जोडतो. एलईडी व्यवस्थित जोडला गेल्याची खात्री होताच तो त्याच्या आईवडीलांना तिथे थांबायला सांगतो. धावतच पुन्हा बाहेर जात तो ते यंत्र वाहत्या नाल्याजवळ नेतो. यंत्राचे पाते फिरताच तो पुन्हा धावत घरी जातो.

पाते गोल फिरत असताना त्यातून जसजशी वीज एलईडीकडे जाऊ लागते तशी अब्दूलच्या डोळ्यासमोर आठवणींची छबी एक-एक करून येत असते. डोक्यावरून उडणारे विमान, पाण्याचा सर्रास वापर करणारी प्रतिष्ठित माणसं, रस्त्यावर उभी असलेली ती महागडी गाडी, हवालदारचं त्याच्यावर संशय घेणं, शाळा, शाळेतील शिक्षक, शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेली सरस्वती देवीची मूर्ती, त्याच्या वडिलांचं दुकान, तो पानटपरीवाला, जिग्नेशभाई, घरात जेवण बनवणारी त्याची आई, सगळं त्याच्या डोळ्यासमोरुन जात असतं.

अब्दुल घरात जाण्याआधीच एलईडी चालू झाला होता, त्या उजेडाने संपूर्ण घर प्रकाशमय झालं होतं. तो प्रकाश फक्त त्याच्या घरात पडला नव्हता, त्याच्या भविष्याची ती झलक होती. आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव शब्दांत मंडण्यासारखे नव्हते, हो पण त्यांच्या डोळ्यातून ढसाढसा आनंदाश्रू येत होते, त्या एलईडीसाठी नाही, त्यांच्या प्रामाणिक संस्कारातून जो ‘गरीब घरचा कलाम’ घडत होता, त्याच्यासाठी…
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel