एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली , आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले . पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली , तेव्हा मुलाला ही माझी आई , आणि त्या बाईला हा माझा मुलगा , हे ओळखता आले नाही . तशासारखे आपले झाले आहे . आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत . खरे म्हणजे , आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत ; ते म्हणजे मनुष्यदेहात परमात्म्याची ओळख करुन घेणे , हे होय . परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो , विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो . पण विषयच जर खोटे , तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार ? आणि जे सुख मिळते , तेही अंती खोटेच ठरते ! म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते . जिथे विषयविरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते .

गुरु तरी काय करतो ? तर विषय हे खोटे आहेत , त्यात आपल्याला सुख मिळणार नाही , हेच दाखवितो , म्हणून , तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते . गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल , ते ते फक्त कष्टालाच कारण होईल . साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले , तरी ते व्यर्थ जातील . कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट , ती फारशी उपयोगाची नसते . गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते , म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले ! वास्तविक पाहता , गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे , ही भावना दृढ झाली पाहिजे . ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो , आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते . गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो , आणि नामस्मरणाला आणखी दुसर्‍या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो . नाम हेच साधन आणि तेच साध्य होय , हे अक्षरश : खरे आहे . गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे . ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते , त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे . जो असा अनन्यतेने वागतो , त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते , आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते . कुठेतरी आपले प्रेम असावे , कुणावर तरी आपला विश्वास असावा , कुठेतरी आपलेपणा असावा . आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी . जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी धडपड करतो , तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel