ॐ नमो भगवते वासुदेवाय ।

श्रीएकनाथकृत चिरंजीवपद (सार्थ)

(साधकांस धोक्याची सूचना )

(ओव्या) चिरंजीवपद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी ।

किंचित् बोलूं निश्च्येंसीं । कळावयासी साधकां ॥१॥

येथें मुख्य पाहिजे अनुताप । त्या अनुतापाचें कैसें रुप ।

नित्य मरण जाणे समीप । न मनी अल्प देहसुख ॥२॥

म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो मीं विषयस्वार्थीं लाविला ।

थिता परमार्थ हातिंचा गेला । करी वहिला विचार हा ॥३॥

ऐसा अनुताप नित्य वाहतां । तंव वैराग्य ये तयाच्या हाता ।

त्या वैराग्याची कथा । ऐक आतां सांगेन ॥४॥

तें वैराग्य बहुतां परी । आहे गा हें अवधारीं ।

सात्त्विक-राजस-तामस त्रिप्रकारीं । योगीश्वरीं बोलिजे ॥५॥

नाहीं वेदविधि आचार । नेणे सत्कर्म साचार ।

कर्मधर्मीं भ्रष्टाकार । तो अपवित्र ’तामस’ ॥६॥

त्याग केला पूज्यतेकारणें । सत्संग सोडूनि पूजा घेणें ।

शिष्यममता धरोनि राहणें । तें जाणणें ’राजस’ ॥७॥

हें वैराग्य राजस तामस । तें न मानेच संतांस ।

तेणें न भेटे कृष्ण परेश । अनर्थास मूळ तें ॥८॥

आतां वैराग्य शुद्ध ’सात्त्विक’ । जें मी जगद्वंद्य मानी यदुनायक ।

तें तूं सविस्तर ऐक । मनीं निष्टंक बैसावया ॥९॥

भागेच्छा विषयक । ते तो साडी सकळिक ।

प्रारब्धें प्राप्त होतां देख । तेथोनि निष्टंक अंग काढी ॥१०॥

कां जे विषय पांच आहेती । ते अवश्य साधकां नाडिती ।

म्हणोनि लागों नेदी प्रीती । कवणे रीतीं ऐक पां ॥११॥

जेणें धरिला शुद्ध परमार्थ । त्यासी जनमान हा अनर्थ ।

तेणें वाढे विषयस्वार्थ । ऐक नेमस्त विचार हा ॥१२॥

वैराग्य पुरुष देखोनी । त्याची स्तुति करिती जनीं ।

एक सन्मानें करोनी । पूजेलागोनि पैं नेती ॥१३॥

त्याचें वैराग्य कोमळ कंटक । नेट न धरीच निष्टंक ।

देखोनि मानस्तुति अलोलिक । भुलला देख पैं तेथें ॥१४॥

जनस्तुति लागे मधुर । म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार ।

आम्हांलागीं जाहला स्थिर । तेणें तो धरी फार ’शब्दगोडी’ ॥१५॥

हा पांच विषयांमाजीं प्रथम । ’शब्द’ विषयसंभ्रम ।

मग ’स्पर्श’ विषय सुगम । उपक्रम तो ऐसा ॥१६॥

नाना मृदु आसनें घालिती । विचित्र पर्यंक निद्रेपती ।

नरनारी शुश्रूषा करिती । तेणें धरी प्रीती स्पर्शाची ॥१७॥

’रुप’ विषय कैसा गोंवीं । वस्त्रें भूषणें देती बरवीं ।

सौंदर्य करी जीवीं । देहीं भावी श्लाघ्यता ॥१८॥

रुप विषय ऐसा जडला । ’रस’ विषय कैसा झोंबला ।

जें जें आवडे तयाला । त्या त्या पदार्थाला अर्पिती ॥१९॥

ते रसगोडीकरितां । घडी न विसंबे धरी ममता ।

मग ’गंध’ विषय ओढिता । होय तत्त्वतां त्या कैसा ॥२०॥

आवडे सुमन चंदन । बुका केशर विलेपन ।

ऐसे पांचही विषय जाण । जडले संपूर्ण सन्मानें ॥२१॥

मग जे जे जन वंदिती । तेचि त्याची निंदा करिती ।

परी अनुताप नुपजे चित्तीं । ममता निश्चितीं पूजकांची ॥२२॥

म्हणाल ’विवेकी जो आहे । त्यासी जनमान करील काये’ ।

हें बोलणें मूर्खाचें पाहें । जया चाड आहे मानाची ॥२३॥

ज्ञात्यांसी प्रारब्धगतीं । मान झाला तरी नेघों न म्हणती ।

परी तेथेंच गुंतोनि न राहती । उदास होती तत्काळ ॥२४॥

यापरी साधकाच्या चित्ता । मानगोडी न संडे सर्वथा ।

जरी कृपा उपजेल भगवंता । तरी होय मागुता विरक्त ॥२५॥

तो विरक्त कैसा म्हणाल । जो मानलें सांडी स्थळ ।

सत्संगीं राहे निश्चळ । न करी तळमळ मानाची ॥२६॥

मांडीना स्वतंत्र फड । म्हणे अंगा येईल अहंता वाड ।

धरुनि जीविकेची चाड । न बोले गोड मनधरणीं ॥२७॥

नावडे प्रपंच-जनीं बैसणें । नावडे कोणासी बोलणें ।

नावडे योग्यता मिरवणें । बरवें खाणें नावडे ॥२८॥

नावडे लौकीक परवडी । नावडती लेणीं लुगडीं ।

नावडे परान्नगोडी । द्रव्यजोडी नावडे ॥२९॥

नावडे स्त्रियांत बैसणें । नावडे स्त्रियांतें पाहणें ।

नावडे स्त्रियांचें रगडणें । त्यांचें बोलणें नावडे ॥३०॥

नको नको स्त्रियांचा सांगात । नको नको स्त्रियांचा एकांत ।

नको नको स्त्रियांचा परमार्थ । करिती आघात पुरुषासी ॥३१॥

म्हाणाल ’गृहस्थ साधकें । स्त्री सांडोन जावें कें’ ।

येच अर्थीं उत्तर निकें । ऐक आतां सांगेन ॥३२॥

तरी स्वस्त्रियेवांचोनी । नातळावी अन्य कामिनी ।

कोणे स्त्रियेसी संनिधवाणी । आश्रयो झणीं न द्यावा ॥३३॥

स्वस्त्रीसही कार्यापुरतें । बोलावें स्पर्शावें निरुतें ।

परी आसक्त होऊनियां तेथें । सर्वथा चित्तें नसावें ॥३४॥

नरनारी शुश्रूषा करिती । भक्ति ममता उपजविती ।

परी शुद्ध जो परमार्थीं । तो स्त्रियांचे संगतीं न बैसे ॥३५॥

अखंड एकांतीं बैसणें । प्रमदासंगें न राहणें ।

जो निसंग निरभिमानें । त्यापें बैसणें सर्वदा ॥३६॥

कुटुंब-आहाराकारणें । अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणें ।

ऐसे स्थितीं जें वर्तणें । तें जाणणें शुद्ध वैराग्य ॥३७॥

ऐसी स्थिती नाहीं ज्यासी । तंव कृष्णप्राप्ती कैंची त्यासी ।

यालागीं कृष्णभक्तांसी । ऐसी स्थिती असावी ॥३८॥

या स्थितीवेगळा जाण । कृष्णीं मिळूं पाहे तो अज्ञान ।

तो सकळ मूर्खांचें अधिष्ठान । लटिकें तरी आण देवाची ॥३९॥

हें बोलणें माझिये मतीचें । नव्हे नव्हेचि गा साचें ।

कृष्णें सांगितलें उद्धवा हिताचें । तें मी साचें बोलिलों ॥४०॥

साच न मानी ज्याचें मन । तो विकल्पें न पावे कृष्णचरण ।

माझें काय जाईल जाण । मी तों बोलोन उतराई ॥४१॥

साधावया वैराग्य ज्ञान । मनुष्यदेहीं करावा प्रयत्‍न ।

सांगे एका जनार्दन । आणीक यत्‍न असेना ॥४२॥

ॐ तत्सत्-श्रीगोपाळकृष्णार्पणमस्तु॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel