प्रिय मैत्रीण
हां. आता कसं स्पष्ट आणि सर्व मनात राहिलेलं बोललीस. बरं झालं तरी मला किमान वेळेवर लक्षात आलं की, तू चिंताग्रस्त आहेस. तुझ्या चिंतेचं कारण एकांत आहे. पण आठव जरा की, या एकांतावर मात करण्यासाठीच्या हेतूनेच आपण दोघे भेटलो होतो. तरीही कधीकधी असं होतं की, आजूबाजूला प्रचंड गर्दी असते कुणी नाचत असतो, कुणी गुणगुणत असतो, कुणी काही ना काही करत असतो; पण आपण मात्र एकटे असतो. मनातून कोणाशी चर्चा करावीशी वाटत नाही. मन स्वतःला स्वतःच त्रास करुन घ्यायला लागतं. अगदी जवळच्या व्यक्तीचाही राग यायला लागतो. जे समोर दिसलं ते तसंच का? हा प्रश्नही अशावेळी डोक्यात विचार घेऊन फिरतो...... पण तुला सांगतो, दोन मिनिटे स्वतःचा विचार सोडून बघ. असा विचार कर की, या जगात तू सोडून इतर सर्व आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे, कुणावाचून आजवर कुणाच अडलेल नाही; हे जरी खरं असलं तरी त्या कुणाच्यातरी नसण्याने मानसिक त्रास नक्कीच होतो आपल्याला. हा त्रास फक्त अनुभवायचा. कारण तो व्यक्त करायला आपल्या मनाची प्रतिकृती समोर असायला लागते. जे की अशक्यच....!!!
तुझा मित्र
किरण पवार